बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

डास

गोष्ट लिहायला लागलो तेव्हा मनात आलं तसं लिहीलं, मग मागे वळून पाहण्याचं धैर्य झालं नाही आणि कारणही उरलं नाही. एक क्षण मनात विचार आला कुठेतरी, कधीतरी, आणि आलं ते कागदावर उतरत राहिलं, उडत, मनसोक्त! एकेक ओळ लिहीताना जाणवणारा वारा आणि मनातले कारंजे थांबता थांबले नाहीत. एकेक ओळ लिहीताना मनात जुळणारी लय, कविता, गाणी काही थांबली नाहीत. त्या आनंदात मी जे लिहीलं ते लिहीलं. ते तेवढ्यावरच माझं मन भागलं कारण त्या-त्या वाक्यांमधे अजून काही उत्कृष्ट करावंसं जाणवलं नाही. जे जसं लिहीलं तेवढ्यावर पोट भरलं माझं आणि त्याहून अधिक काहीच नाही. ही प्रक्रिया किती सोपी आहे? जणू उडणारं फुलपाखरू किंवा गाणारा पक्षी एखादा. जणू उन्हात पडलेली मगर आs वासून किंवा वाहणारी नदी निवांत. घडणारं घडतं आणि तो क्षण तेवढाच अधांतरी उरतो. त्याला मागे-पुढे काही नाही. त्या-त्या कल्पनांची कादंबरी होत नाही की त्यांचं लोणचं घातलं जात नाही. एकलकोंड्या अशा कित्येक कल्पना विस्ताराशिवाय पडून राहिल्यात आणि त्याबद्दल विशेष विवंचनाही कुणाला नसावी! या कल्पनांना पिल्लं होत नाहीत, त्यांची भूतं होऊन आम्हाला झपाटत नाहीत. त्यांचे लागेबांधे आम्हाला रहात नाही आणि त्यांचे पत्ते…त्यांना घरं नसतात; भौतिक परिमाणांमधे खिजगणती नसते त्यांची!  

शनिवार, २४ मार्च, २०१८

पानगळ

तू नसताना
लागते पानगळ
मनाच्या साग-वनाला.
पाचोळ्याचा आवाज
दऱ्या-दऱ्यांमधून
घुमतो केविलवाणा!

झळा उन्हाच्या
करपवत जातात
उरला-सुरला चारा.
विचारांची गुरं-ढोरं
दुष्काळ नसून
असल्यासारखी!

पायवाटा झाकलेल्या
बोडके डोंगर
पिवळसर धरती.
झरे आटलेले
हळद्याच्या गाण्यात
माझेच स्वगत!

तळपत्या उन्हात
वणवा पेटतो एखादा
भस्मसात क्षणात!
तू नसताना
नाही थंड वारा
फुलांच्या गारा!

तू नसताना
पळस उगाच फुललेली
सावर लाले-लाल!
तू नसताना
शुष्क ओढ्याकाठी
रातवी पौर्णिमा!

तू नसताना
लागते पानगळ
मनाच्या साग-वनाला
ये ना अशी इकडे
ऋतू-बदल
अधीर मनाला!

- पंकज (०८.०३.२०१८)

बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

पाखरे


तुझ्या गंधाळलेल्या शब्दांची पाखरे,
आज कोवळ्या ऊन्हात तारेवर बसलेली.
काही जुनी, कधी पाहिलेली आणि चारेक नवी दिसली.

काळी-पिवळी-निळी-हिरवी-लाल-गुलाबी
गुबगुबीत-झोपाळलेली-स्वप्नाळलेली-टकमक
चिवचिवाटांत त्यांच्या, मनाचा गुंता, जुना-नवासा!

त्यातलीच उडाली काही, घरटं बांधायला पसार झाली.
काही आपसूकच आली जवळ, चोचीत चोच घालू लागली.
काही उरली शून्यात, मग माझ्याकडे पाहत राहिली.

काय करावे उरलेल्यांचे, कोवळ्या ऊन्हात चकाकला प्रश्न.
दगड मारावा, उडवून लावावे, की दाणे टाकावे; बोलवावे इथे?
कसलं काय करतेस वेडे, उघडला मनाचा पिंजरा नि गेले आत सारे!
                                                           

                                                            - पंकज (२६ डिसेंबर २०१७)