शनिवार, २३ जुलै, २०११


कागदावर एक रेघ ओढायला निमित्त लागत नाही.
पाऊस पडला – तुझी आठवण आली
किंवा तुझी आठवण आली (नि पाऊस पडला!)
इतकंही अमाप होतं.
आभाळातून कोसळणाऱ्या थेंबांचा कैक सेकंदांचाच प्रवास!
गर्भ – जन्म – उत्साह – आनंद – वेग आणि अकस्मात मृत्यु – दफन!
ही सारी गोष्ट जेवढी मी उपभोगतो; तेवढीच क्लेषदायक?
जीव कातरत जाणारी बासरी, निळ्या रात्रीत पागोळ्यांचं पाणी!
दूरदूरवर दिसायला प्रकाश नाही; थंडीला सारायला ऊब नाही!
ऊब नाही, पण खूप घट़्ट आहे तुझ्या आठवणींची मिठी!
गात्र-गात्र थंड करणारी…

सोमवार, १३ जून, २०११

काहीतरी


   काहीतरी कमीय असं नेहमीच वाटतं; पण ते काय अजून कळलं नाही. “भाजीत मीठ कमीय गं” हे वाक्य कितीदा तरी कानांवर पडलं; पण ते मीठ काही कमी पडायचं थांबलं नाही! मला सतावण्यासाठी नि माझे तेच तेच शब्द पुन:पुन्हा ऐकण्यासाठी तिचे हात शांतपणे सतत तेच करत राहिले…सवय झालीय का आता?
   हा प्रश्न भयंकर आहे. हृद़्यात कळ मारावी; इतपत! सवय झालीय का? तिच्या हातांना मीठ कमी टाकण्याची की मला ते अन्न तसंच ग्रहण करण्याची!! आता चवीतही काही रस उरला नाही? असं म्हणावं का? माणसांना एकमेकांची सवय झाली की काय होतं पुढे? प्रयोग करून पाहण्यासारखा आहे…आहे; पण तो सुरू आहे का? हेच कळत नाहीये! सवय झाली असेल तर नाविन्य नाही; नाविन्य नसेल तर कुतूहल नाही; कुतूहल नसेल तर गोष्टी नजरेआड होतात. सवय लागते. आमच्या अपार्टमेंटच्या बाहेर सदाफुलीचं झाड नि शेजारीच एक मनीप्लांट; या दोहोंवर उडणारा शिंजीर. दिसतो न दिसतो; सकाळी दारातून बाहेर पडलं की नजर जातेच तिथे; कारण तो दिसतोच असं नाही ना! शोधावं लागतं त्याला! तो सवय लावू देत नाही…
   तिची सवय झाली; म्हणजे मग सगळ्याच गोष्टींची सवय झालीय की काय? हा दुसरा प्रश्न अजूनच भयंकर नाही का? एकापाठोपाठ एक वेस उपटत जावी; तसंय हे! उरणारा कोवळा-लुसलुशीत प्रेम नावाचा गाभा कितपत संरक्षित राहणार आता? 

रविवार, ८ मे, २०११

दुपार


झोपाळा हलतो. वारा वाहतो.
बाभळीचा काटा उन्हाने तापतो.
पाचोळ्यातून खुसपूस
क्षणभरच आणि शांत…
स्तब्ध मुखातून, जीभ लवलव.
चिरकाच्या हाळ्या, दगडावरून घराकडे
कानाजवळच उडताहेत,
म्हाताऱ्या लिंबाच्या चिरफाकळ्या.
सुन्न दुपार, कानात हुशार कुई…

आंब्याचा रस टेबलावर,
कूलरची हवा अंगावर.
वाढलेल्या शरीराला वेढलेला पसारा
पाचोळ्याचा जीव पाचोळाच उरलेला.

रविवार, १ मे, २०११

BIPOLAR


रस्ता असा चालता चालता घड्याळाकडे नि तिथून नजर रस्त्याच्या उन्हात तळपत्या टोकाकडे जाते, त्यापुढे समुद्र. डोक्यावर सुर्य. गोलाकार डोक्याच्या पाठीमागून ढगाकडे tangent टाकला की तो सुर्याच्या मध्यबिंदूला छेदणारा. पावलं थकतात नि मनाचा गोळा छातीला जड होतो. डोळे मुद्दाम बारीक करून अंतर कमी होतंय का ते मेंदू एकदा तपासून पाहतो. डाव्या हाताला वडाचं झाड, उजवी काख डाव्या हाताने खाजवणाऱ्या मांडी घालून बसलेल्या पन्नाशीच्या खुरट्या दाढीच्या काकासारखं. रस्ता…झाड. सुर्य…सावली. थांबूयात का थोडं? वाटतं हे खरं. रस्त्याच्या टोकाला कुणीतरी वाट पाहत थांबलंय ही जाणीव चालायला सुरूवात केल्यापासूनच आहे मला. कोण थांबलंय खरं? त्याचं मूळ मनात कितवर गेलंय आत याची कल्पनाच उथळ आहे फ़ार पण. वड.
      रस्त्याची सुरूवात होऊन फक्त २ मैल झालेत. २ मैल…म्हणजे अंतर कापलं ते ही एक चतुर्थांश! अजून ३ बाय ४ चा रस्ता आ वासून पडलाय. सावली इतकी प्रेमळ वाटते की तिथे बसण्यापेक्षा तिच्या आत आत जाऊ वाटतं. अंग आखडून बसलो की आजूबाजूला पडलेले ऊन्हाचे तुकडे चावत नाहीत अंगाला. भिती वाटते त्यांची! मी जाऊ शकतो का रस्त्यावर पुढे? मी एवढा रस्ता कसा काय पुर्ण केला? नाही बाबा, नाही जमत हे आपल्याला! त्या टोकाला कुणी या टोकाला कुणी, मधे मी एकटा…एकटा? मुद्दामुनच सोडलेला. हा कोंडमारा असह्य आहे. मला टाकून दिलं लोकांनी, आवडत्या जागांनी नि चंद्र-सुर्य-समुद्राने!! डोळ्यातला पाऊस थांबता थांबत नाही…उपाय एकच दिसतो…वडाची डावीकडे उन्हात पसरलेली एकुलती एक फांदी नि तिच्यावरच्या जाडयाभरड्या दोरखंडावर फास घेऊन वाळत पडलेलं एक प्रेत. अंगात ताकद नाही; मन तेवढं निर्ढावलेलं नाही की बाकीची सगळी व्यवस्था करेल…त्याला फक्त त्या कल्पनेतच रमायला आवडतं. डोळ्यांसमोर चार रानकुत्री हरणाचं एक पाडस पकडतात, ते वेदनेनं किंचाळतं, पाणी इथे पाझरतं. त्याच्या शरीरावर ओरबाडणं, लचके इकडे मनाचे तुटतात. तळहातांनी डोळे पुसून तळहात ओले नि डोळे लाल झालेत, बाकी वेळ हवा तसा चाललाय पुढे…
      दुपार ढळत आलीय. पाय जोर करून शरीराला तोलत उठवतात. अंगातलं पाणी संपेल असंच रडत राहिलं तर ही जाणीव होते नि वळलेली वाट रस्त्याला लागते पुन्हा हळूहळू. दहा-वीस पावलं अंतर निवांत जातं. मन आकाशासारखं निरभ्र होतं…किंचीत जांभळसरही. रस्ता अर्धा कापला जातो…संध्याकाळ आता शरीराने छान भरलेली दिसते. आकर्षक नि स्पर्श करावी अशी. त्या स्पर्शाने काय होणारेय तसं खास? हा प्रश्न त्यावेळी जन्मच घेत नाही, हे अनुभवलंय मी कित्येकदा! ती केशरी नि जांभळट दिसू लागते. कपाळावरती घामाचे चार थेंब थेट पायाच्या नखाच्या प्रवासाला निघतात. रस्त्याचं टोक हातभर लांब दिसू लागतं, अशे चार रस्तेतरी आरामात कापेन मी न थांबता असं छातीतलं मन आनंदाने ओरडतं. रस्त्याच्या टोकावर परिचित हात दिसू लागतो…अंगात प्रचंड ताकद आहे या अभिमानाने मी भरभर चालू लागतो. रस्ता संपतो, हवं ते मिळतं…पण आता काय करायचं? कोणता रस्ता पार करायचा? या विचारात मी अस्वस्थ होऊन नुस्ता सैरभैर पाहत राहतो. दरी नि शिखरांचा रस्ता सपाट कधी होणार, याची सध्या वाट पाहतोय!

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११

जेट़्टी, जर्मन, जपानी नि समुद्रावरच्या रात्री


मायाबंदरच्या गावात फिरताना कुठल्यातरी ओळखीच्या गावात फिरल्यासारखं वाटतं. छोटंसं गाव. गरजेचं सर्व काही मिळतं इथे. रोटी, कपडा, मकान इतक्याच गरजा आहेत ना? नाही नाही! एवढंच कसं? Mobile range, internet access हवा मगच research होणार ना!! मायाबंदरच्या जेट़्टीचं नाव आहे जर्मन जेट़्टी. जपानी लोकांच्या खुणा अजून आहेत इथे. परवाच लहान लहान मुलांना खड़्डा खोदताना जपानी लोखंडाचा बॉंब सापडला! मला या गावात फिरायला आवडतं. गावाच्या दोन्ही बाजूच्या समुद्रानं गावाला बरोबर कोंडीत पकडलंय, हे romantic नाहीये का?
दोन दिवसांपासून आम्ही सगळे इथेच आहोत. पुढे कुठे कुठे नि का जायचंय मला कल्पना नाही. दिवसभर आम्ही project मधल्या महत्त्वाच्या व्यक्तींना भेटतो नि परत तळावर येऊन कामं करत बसतो. तो Rest house मागचा समुद्र बघून मी हावऱ्यासारखा फोटो काढत बसतो त्याचे दररोज. घर दुरवणारी हीच गोष्ट सकाळच्या उन्हात स्वर्गाहून छान भासते, हेच काय ते दु:खंय मला!
आम्ही चौघं आहोत. मी, लला (माझा कलिग), राजन (SACON मधला अजून एक SRF) नि शिरीष. चालीस एक नि इंटरव्हूव आयलॅंडवरचे swiftlet camps होतील काही दिवसांतच. Rest house मधल्या Nature Information Centre मधे मी अंदमानचा नकाशा कितीतरी वेळा सतत डोळ्याखालून घालतो, मला काहीच लक्षात राहत नाही त्यातलं. मी कुठे आहे ते दिसतं, कळतं…पण त्या नकाशात फक्त अंदमान नि निकोबार आहे…माझा उरलेला भारत कुठंय?? मी वीतभर तरी अंतर मोजलं असतं महाराष्ट्रापासून माझ्या राहण्याच्या जागेपर्यंत!
दिवसभर काम करून भरपेट जेवण करून आम्ही चौघे रात्री जर्मन जेट़्टीपर्यंत चालत येतो. छान वारा वाहतो. शिरीष त्याच्या Ph.D. च्या आठवणी सांगतो, project मधल्या कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. एक scientist म्हणून माणसानं कसं जगावं? या प्रश्नाचं उत्तर मला सुटत नाही. जेट्टी मधे पोलीस दलाच्या मोटार बोटी असतात. तुरळक लोक असतात. शांत समुद्र असतो; मधेच माशांच्या आवाजामुळे हलणारं, डचमळणारं पाणी असतं. माझी रात्र किती गुंडाळली जाते, कल्पना नाही…ती गुंडाळत जाते नि मी चुरगळत राहतो आतल्या-आत. सुंदर गोष्टी एकट्यानं पहायचा शाप लागलाय का मला?
समुद्रावरच्या रात्रीला कोण येतं जातं याचा पत्ता असतो का?   

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

मायाबंदर


सकाळी सकाळीच पोर्ट ब्लेअर सोडलं. भलामोठ्या बोटेत बसून मायाबंदरकडे. नकाशात पाहिलं होतं मी पुर्वी. उत्तरेकडे. North Andaman. अंदमानचे तीन प्रमुख भाग आहेत: उत्तर, मध्य नि दक्षिण/ little अंदमान. मायाबंदरकडूनही काहीच अपेक्षा नव्हत्या माझ्या. खेड्यापेक्षा काय जास्त असू शकतं? याचाच विचार करत राहिलो. तो समुद्र, बेटं सारं एका बाजूलाच राहिलं. बाहेर येऊन उभा राहिलो तर दूर जाणारी जेट़्टी दिसते…मग हळूहळू काहीच दिसत नाही; समुद्राची एक किनार तेवढी उरते. ती पाहून काय काय अर्थ लावत बसायचे मी? तिथे किती आकार रेखाटत रहायचे? उजव्या हाताला झाडांनी भरगच्च काठ दिसतो तो ही दूरवर. तो शेवटपर्यंत साथ सोडत नाही; मी काठ सोडून गेलोय असं वाटत नाही इतकंच. त्या काठावरून बसचा रस्ता आहे मायाबंदरला जाण्यासाठी…
माझ्या उदासीला चीर पाडत जाणारी समुद्र-गरूडांची जोडी किंचाळत जाते. मी आत मधे जाऊन सीटवर डोळे मिटून पडतो. शांतता कधी कधी किती बोलकी असते. नाही?
दुपारी एकच्या सुमारास मी मायाबंदरला पोहोचतो. गाव शांत वाटतं. मनात बसतं. खेडं नसतं ते गाव असतं, बऱ्यापैकी मोठं असतं. मला नक्की काय हवं काय नको तेच कळत नाही कित्येकदा. झोपायला मऊ गादी हवी की कुणाशीतरी बोलायला फोन असावा? अंगावर पांघरूण हवं की गावात पोस्ट-ऑफिस हवं?
मी forest rest house मधे उतरतो नि गावार फेरफटका मारून येतो. माझा PI माझी काही लोकांशी ओळख करून देतो. Rest house शेजारचं पोस्ट-ऑफिस पाहून मी आनंदून जातो. तो माझ्या internet facility ची सोय करून देतो. माझ्या अनिश्चिततेच्या चिंतेला किती तो आराम! फोन आहे; पैसे काढण्याचं मशिन आहे; पोस्ट-ऑफ़िस आहे; इंटरनेट आहे. याहून अजून काय luxury असू शकते?? 
पुढचे कितीतरी दिवस मी जमिनीवरच स्लिपींग बॅग टाकून झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी एक वळवळ दारातून आत-आत बॅगकडे सरकताना माझा PI बघतो. साप. खाड़्कन जाग येते. बाकी काहीच होत नाही; आपसूकच कॅमेरा बाहेर येतो. एक डोळा अजून झोपलेलाच असतो दुसरा कसाबसा उघडलेला असतो. पहिले तीन-चार shots पार आंधळे जातात (camera सुरूच नसतो. मेंदू तरी कुठे सुरू असतो?!) 
मग पार त्या सापाचं व्यवस्थित photo session होतं. Andaman Wolf Snake. सकाळ झालेली असते; ऊनं येऊ घातलेली असतात. समुद्र शांत असतो. Rest house च्या परसात शांत पहुडलेला असतो.
मायाबंदर माझ्या मनात घर करू लागलेलं असतं…

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

अंदमान_१


काय हे किती दिवस काही लिहीलंच नाही…
अंदमानात येऊन महिना उलटून गेलाय. माझं काम सुरू होऊनही कित्येक दिवस झाले. पण मी अजून काहीच लिहीलेलं नाहीये…
अंदमानात आलो ते ३० डिसेंबरच्या दिवशी. रात्रभर चेन्नईच्या विमानतळावर नि सकाळी डोळे उघडतो तर बेटं, धुकाळलेला की ढगाळलेला समुद्र. छोटी छोटी खेडी, पाडे म्हणावेत अशी एकमेकांना बिलगलेली घरं, नारळाची झाडं. वाटलं, संपलं इथच आता अंदमान. इतकंच काय ते दिसणार सगळीकडे. जास्तीत जास्त पोर्ट ब्लेअरवर काही दुकानं वगैरे. पण प्रत्यक्षार तसं काहीच नाहीये. हवं तसं मनासारखं सुंदर वाटावं असं पोर्ट ब्लेअरही नाही, हे ही तितकंच खरं. Airport वर उतरलो रिक्षातून थेट लॉजमधे. मग थोडा बाहेर पडलो कानोसा घेत. छान मोठे रस्ते, चौकाचौकात लेडी ट्राफीक पोलिस. शिस्तीत चालणारा कारभार. Cars, trucks, rikshaw सारं काही आहे. एवढं पेट्रोल/डिझेल कुठून येतं?? दूरवर ते Mainland दिसतंय का? तिथून. Mainland म्हणजे तोच तो…अंदमान सोडून उरलेला भारत, ज्याची आठवण खोलवर रूजलीय आत मनात. दोन दिवसांची ओळख नि पुढचे सारे दिवस…अगदी आजही अंदमान परकंच वाटतंय मला! हा भारताचा तुकडा आहे का? राजकीय दृष्टया असला तरीही…? मला नाही वाटत. फिरत फिरत सेल्युलार जेलकडे आलो. जबरदस्त मोठं धूड आहे ते. समोर समुद्र खळाळतो. हे सारं आता पाहताना आश्चर्य वाटत असेल खरं पण पुर्वीच्या काळी भितीशिवाय कोणती भावना निर्माण केली या प्रदेशानं भारतीयांच्या मनात??
एवढं मोठं ते पोर्ट ब्लेअर. बंगाली, तमिळ, रांची (मुळचे छत्तीसगढ्चे राहणारे) नि करेन्स (थाई नि इंडोनिशयन लोकांचं ब्रीड) या लोकांचा भरणा सगळा! इथले aboriginals कुठे आहेत? Great Andamanese, Jarawas, Sentinels वगैरे लोकं. कुणी म्हणतं ग्रेट अंदमानीज आता फक्त ४० उरलेत त्यातले काही सरकारी नोकरीत आहेत. जरवा लोक बरेच आहेत. आफ्रिकन जमात. कपडे घालत नाही! तिला protection आहे, जसं Schedule I प्राण्यांना असतं ना तसं!! मी अजून तरी पाहिले नाहीत; पण दिसतात बरेच…त्या area त अजून जास्त जाणं नाही झालं माझं. अंदमानच्या south west ला Sentinel island आहे तिथे हे सेंटिनल्स राहतात. तिथे कुणी जात नाही; गेलं तर माघारी येत नाही! Helicopters वरही भाले फेकले जातात. काठाला डुंगी टेकली की पाय जमिनीवर टेकायच्या अगोदरच भाले आरपार झालेले असतात. हे ही सारं इतरांकडून ऐकलेलं…पण reliable sources कडून. प्रत्यक्ष अनुभव नाही!
पोर्ट ब्लेअरला almost सर्वकाही मिळतं. Rate थोडा जास्त असतो पण मिळतं सारं. प्रचंड प्लास्टीक कचरा कुठे जातो? त्याच त्या अथांग समुद्रात…जातो तिथे नि या त्या सुंदर सुंदर islands च्या किनाऱ्यावर लागत राहतो! एका दिवसात पोर्ट ब्लेअरमधेही बरंच काही पाहिलं मी.
दोन मित्र भेटले. मराठी. Scientists. Corals नि Dugong (समुद्र-गाय) वर काम करणारे. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते; इथल्या scientific community मधे जवळपास ७०-८० टक्के मराठी लोकं आहेत. अभिमानाची गोष्ट आहे; नाही का?? ती रात्रही अशीच गेली. हुरहुरीत. किती दूर ते उरलं माझं राज्य…लोकं…भाषा.
जेलपासून जवळच मोठं ठोक्यांचं घड्याळ आहे. त्याच्या एका-एका ठोक्यात त्या तुरूंगाचं एकटेपण मन कातरत राहिलं रात्रभर…