गुरुवार, २ सप्टेंबर, २०१०

पुलावरली गुपितं,
वाहत्या पाण्यात,
वाहताना, पाहताना,
गोड हसत राहिलीस,
आतल्या-आत…

पुलावरल्या काठावर,
अल्लद विसावलेलं,
इंद्रधनुष्य, पाहताना,
हातांनीही मारली होती,
हळूवार गाठ…

…वाहत राहिला पूल एकटा,
वाहत राहिली नदीही एकटीच,
या अशा सुनसान एकटेपणावरती;
कशी गं तुझी नि माझी घरटी??

बुधवार, २५ ऑगस्ट, २०१०

कोफ्ताकरी


    खरवड-खरवड, मनाची तडफड! नाही, नाही…तडफड म्हणण्याइतकंही काही घडत नाहीये आजकाल. नांगरानं जमीन द्गड-माती-ढेकळं-गांडूळ-साप-विंचू-अंकूरांसकट खरवडत न्यावी, अशी सगळी खरवड. नांगर एकदा फिरल्यानंतर अंगावरून सारी वस्त्रं काढून घेतल्यासारखी उद्ध्वस्त जमीन नि सुन्नसा आवाज…यात तडफड कुठली? पडझड सगळी. क्षणात राहत्या झोपडीवरून बुलडोझर फिरवावा इतकं सहज सोप्पं ते मनाचं वागणं. विव्हळायला त्राणच उरले नाहीत, मित्रा! गाणं नाही, कल्पना नाही, चित्र नाही, काही घडेल याची शक्यताही नाही! अडकल्यासारखी भावना आहे ही! वर्षानुवर्षे बध्दकोष्टता झालेल्या पीडिताचं दु:ख, सहज-सुलभ जगणाऱ्यांना काय? हसण्यासारखी गोष्ट नाहीये ही! उदाहरण काहीही असू शकतं!! पोटातच अडकलेल्या बाळाचं दु:ख कोणाला कळणार? वेदना दोहोंनाही! मातेलाही नि बाळालाही…चूक कुणाची?
      काय माहिती?!! परिस्थितीची? असावी. असावी एखांदवेळेस! परिस्थिती ही काळाचं फ़ंक्शन! म्हणजे काळच जबाबदार म्हणायचा! मला तशीपण या काळानं पुर्वी कित्येकदा अद्दल घडवलीय, वेगवेगळ्या फ्रंट्सवर! त्यावर तर एक पुस्तकच तयार होईल! पण आळस…लिहीणार कोण? जाऊ देत!
      विषय असा होता की तडफड व्हायला काहीतरी असावं लागतं मुळात. आत असलेल्या कल्पनांना ओरडण्याचं त्राणच नसलं तर त्यांना हुडकणार कसं? ढिगाऱ्यातून बाहेर काढणार कसं? याचं एक छानसं उत्तर! काही घडलंच नाही, असं समजायचं! यालाच बहुधा मन:शांती म्हणत असावेत! यावर हाच एक उपाय आहे. कोफ्ताकरी करणे नि खाणे. ज्या गोष्टींत जीव अडकलाय त्यांना कोफ्ते समजून त्यांचा फडशा पाडणे! ढासळणे ही एक कलाय…ती ज्यांना जमत नाही, ते बेघर होतात, आत्महत्या करतात; पण ज्यांना जमते, ते जग विणतात! व्वा, काय लिहीलंय…काय माहिती का लिहीलंय मी हे!! बहुधा, ढासळण्याची सुरूवात झालीय कुठेतरी…   
पंकज २५.०८.१०

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०१०

whoever wins, looses


शेजारील चित्र पहा…पहा, शांतपणे हातातील सर्व कामे बाजूला सारून पहा. त्या फोटोमधील एक ऩ एक गोष्ट व्यवस्थित पहा. डोळे मिटून क्षणभरच थांबा नि आता विचार करा. जो काही विचार डोक्यात येईल, तो इथे मांडा (comments मधे). काहीही असू दे मग…काय वाईट, काय खरं, काय खोटं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बऱ्याचदा अनुभव नि ज्ञान (माहिती) या दोन गोष्टींवरच अवलंबून असते. असू देत; त्याचं कुणाला काय? काय वाटतंय ते लिहा…
रेल्वे-स्टेशनावर या मॅगझिनवर नजर पडली नि ते बॅगेत टाकलं. प्रवासभरात वाचून काढलं. कित्येकांनी त्याचं फ़्रंट कव्हर पाहून ते चाळलही. किती ते कुतूहल? एकानं विचारलं, “काय झालं या बिबळ्याचं पुढे?” think n’ imagine. पुढे मी काय बोलू? हे समोर दिसतंय ते कायंय? म्हणजे हे असं फ्रंट-पेज पाहून सहज तोंडातून शब्द फुटतात…what the hell! मी सुमारे अर्धा तास भर ते एकच पेज पाहत बसलो. हे असं एकटंच चित्र सतत पाहत राहताना कित्तीतरी गोष्टींवर विचार करत बसलो. हा फोटो फक्त report किंवा news फोटो नाहीये…तो Human-animal conflict चा representative फोटो म्हणून बघा. कायंय त्यात? डार्ट लागलेला एक पुर्ण वाढ झालेला बिबट ज्याच्यावर सुमारे पन्नास एक लोक तरी तुटून पडलेत. धूळ, बिबटाच्या पेकाटात लागण्याच्या उद्देशात फेकलेली एक अधांतरी वीट, प्लास्टीक किंवा तत्सम कचरा, बिबटाच्या पाठीमागे २-३ दंडुकाधारी हिरो (सर्वांच्या पायातल्या चपला बघून त्यांचा socio-economic status थोडाफार लक्षात येईल) आणि अजून कित्तीतरी चेहरे (बघे). फोटोच्या सेंट्रल पॉईंटच्या थोडंसं वर एक plain tiger butterfly, बिचारं एकटंच रस्ता क्रॉस करतंय; त्याला आजूबाजूला काय घडतंय याचा काहीही बोध होत नसणार; त्याच्याच पाठीमागे तसंच एक दुसरं उडण्याच्या तयारीत…
बिबट…वेदना, अजून काय म्हणू शकतो आपण? बिबटाची कातडी अशी फिसकारल्या सारखी नसते कधी; त्रास आणखीन काय? मानेत घुसलेला डार्ट…काय म्हणजे काय सुरू कायंय? Okay, काही लोक म्हणतील तुला, तिथे cozy-cozy जागेत बसून प्राण्यांच्या वेदनेवर लिहायला काय जातंय? हा फारच महत्त्वाचा प्रश्नय खरा! म्हणूनच मी म्हटलं, अनुभव नि ज्ञान या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात ते! बिबटाच्या खाली शीर्षक आहे: India’s Leopard Problem: Is this cat vanishing faster than the tiger?
कुणाला माहिती? कुणी कधी बिबटाला प्राधान्य दिलाय भारतात. वाघांना आत्ताशी कुठं भाव द्यायला लागलेत लोक…अभी और वक्त है, जब बिबट भी १४११ बचेंगे, तब देखा जायेगा!!
Follow:


सोमवार, २ ऑगस्ट, २०१०

hands and patches

                चित्रकलेच्या क्षेत्रात  ठसा उमटावा असं कैक दिवसांपासून मनात होतं. ते आज प्रत्यक्षात उतरलं. माझ्या बेडरूमच्या खिडक्यांना पडदे नाहीत; आणि इमारतीचा हा भाग चक्क सुर्यप्रकाशात न्हाऊन निघतो!! तसा मी अंधारात राहणारा प्राणी. या प्रकाशाचा त्रास व्हायचा. मग एके दिवशी ठरवलं की यावर काहीतरी उपाय करावा. पहिला विचार आला तो म्हणजे पुणे टाईम्स मधल्या सेमी-नूड्ज आतल्या बाजूस तोंड करून प्रकाशाचा रस्ता रोकावा. हा आपला टिपीकल बॅचलरी विचार तसा; पण मी राहतो ते घरंय, रूम नाही; याचं मला चांगलंच भान आहे. शिवाय माझ्या या कलाकृतीचे माझ्या घरी फार विपरित परिणाम होतील याचीही जाण होतीच. मग काय करावं? म्हटलं, छानसा रंगीत कागद आणून डकवावा; कुठला फिल्टर? केशरी, हिरवा, निळा?? विचार करत बसलो…

                लॅपटॉपवर गाणी सुरूच होती; त्याच दरम्यान “कट्यार काळजात घुसली” मधली काही गाणी सुरू झाली. बस्स…ती सुरू झाली नि माझी विचार करण्याची पद्धतही पुर्णपणे बदलली. हुरूप आला. कुठल्या-कुठल्या म्युझिअम्स मधे लाल-निळ्या रंगाचे शिशे पाहिलेले आठवले. छंद मकरंद झाला! मग काय? काचच रंगवायला घेतली. अगोदर निळसर बॉर्डर आखू वाटली. तसं केलं. मनात मकरंदासारख्या कल्पना गोंधळ घालत होत्या. बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की, कुठेतरी ठसे उमटवावेतच! शिवाजी महाराजांनी जसा सिंधुदुर्गात उमटवलाय तसा!!
 निदान मी माझ्या घरात तरी उमटवू शकतो; आमचं कर्तुत्वही तसं चार भिंतींएवढंच ओ! मग म्हटलं तसं! ठसे उमटवले नि उरलेला भाग समर्पक नि उपलब्ध रंगांनी रंगवला. लांबून पाहिल्यावर प्रकाशही थोड्या निवल्यासारखा वाटला. अंधारल्या जीवाला अजून एक अंधारली खोली मिळण्याचा आनंद झाला!

बुधवार, २८ जुलै, २०१०

बाप्पा

सकाळी साडेअकरा वाजता बाजारात जाऊन काही रंग विकत आणले. एक निमूळत्या टोकाचा नि दुसरा पसरट तोंडाचा असे दोन ब्रशही आणले. जेवण वगैरे करून म्हटलं एक हात मारावा नि मस्त झोपावं; बाहेर पाऊसही छान कोसळतोय; अशावेळी माझ्यासारख्या जीवाला झोपेशिवाय दुसरं काय सुचू शकतं म्हणा!

मग तसा एक हात मारून घेतला. नि मग पुढे वेळेचं भानच उरलं नाही...चित्र साकारत राहिलो. अधून-मधून कित्तीतरी विचार डोक्यात येत राहिले; एखादी रेष चुकतीय असं वाटलं तरी त्या चुकीचे कित्तीतरी अर्थही निघू शकतात ना?! रंग...रंगांचंही तसंच वाटलं मला. चित्र म्हणजे नक्की काय याचा गंधही नसलेला मी प्राणी! डोळ्याला जे जे चांगलं वाटेल ते ते चांगलं हा किती संकुचित विचारंय; याचाही मस्त चटका बसला मनाला! दुपार झाली; थांबू वाटलं नाही...
मग पुन्हा कित्तीतरी वेळ तिथेच गुंतून पडलो. हे असलं काहीतरी करायला हवं यार! तहान-भूक विसरून. किती वेळा हे मनासारखं घडलंच नाही. कथा लिहीताना होतं ते तेवढंच! त्यावेळी तहान भूकच काय; वेळ, वय नि स्वत:चाही विसर पडतो. इतका साधा बाप्पा; त्याचं ते किती साधंसं रूप. कुणीही, अगदीच शिकाऊ माणसालाही जमेल असं ते चित्र! कुणी बनवलं असेल गणपतीला? त्या चित्राला? हे दैवत इतकं गोड आहे की प्रतिभेचं दैवत असं म्हणताना त्याच्या स्वत:च्याच आकारात कितीतरी आकार आपोआपच प्रगट होताना दिसतात. छान! तसं मला लिहायचं आहे याबद्दल पण मला आता काहीच लिहू वाटत नाहीये! मला माहितीय की मला चित्र काढताना काय वाटत होतं नि ते मी किती enjoy केलं ते!

गुरुवार, २२ जुलै, २०१०

मेणबत्ती

मेणबत्तीच्या आयुष्यातला जळण्याचा क्षण किती अप्रूपाचा असावा? वारा येईल तसं लवलव करायची! आयुष्य असं जळत असतानाही असह्य वेदनांचा टाहो मेणबत्ती किती मूकपणे प्रगट करत जळतीय! मौन धरून बसलीय…सांगायचं नाहीच कुणालाच! कुठे भाजून निघालेलं अंग चरचर करतंय जळतंय. तो मेणबत्तीचा आवाज नाही; तो घटनेचा आवाज! घटनांना आवाज असतो. हिरव्यागार रस्त्यावर मध्यभागी नारळासारखी दोन रक्तमय डोकी नि मूकपणे उताराला लागलेलं रक्त…या घटनेला माझ्या मनात सुरूंगासारखा आवाज झाला होता खरा. पण तेवढ्याच मूकपणे मी माघारीही फिरलो होतो. मेणबत्ती असेच स्वत:चे कान बंद करून घेत असेल एखांदवेळेस. आवाज नाही; तर भिती नाही. ते एकलकोंडं जगणं जरी डोळ्यांनी दिसत असलं तरी तिचा हातात हात धरून असलेला प्रत्येक अणू-रेणू कितपत जीवात जीव अडकून जगला असेल या प्रश्नाला तरी उत्तर काय? वर लागलेली आग खालीपर्यंत पोहोचणारच; या भितीपायी कुठे कुठे कुणी कुणी मिठ्या मारल्या असतील नि कुणी कुणी आत्महत्येचे विचार केले असतील हे सांगणही किती कठीण! मेणबत्ती जळत राहते; तसंच तिचं जगही. अणू-रेणूंना आग स्वत:पर्यंत पोहोचत तोपर्यंत हे जाणवतही नसेल की ते एका जळणाऱ्या मेणबत्तीचे भाग आहेत! म्हणून तर कुठेच टाहो नाही; सर्वच मौनाचा कारभार; चटका लागतोय म्हणून लिहीतोय मी ही…आग आलीय अंगावर!
२१.०७.१०
पंकज

बुधवार, २१ जुलै, २०१०

सांच्याला लई पाय दुखत व्हते. का कुणास ठावं? मरेस्तोवर चाललो व्हतो; तेवढंच. ते बी रोजच घडतंय की. आजच का दुखू राहिले कळंना. तालुक्याला खेटं आमचं रोजवार चालूयंत. हे ना ते; ते नाही तर हे! जीवाला भ्रांत अशी नाहीच. पेरलेलं उगावलंच नाही; आता परत पेरायला पैका नको? पैका आणायला तालुक्याला; बसवारीच पाण्यासारखा पैका जातुया! पेट्रोलबी महागलंय; तिकीटं बी वाढलीयंत! देवाला साकडं घालायला त्यो बी पुर्वीसारखा राहलाय कुटं? इथं जीवाला जीव राहिला नाई; देवळात देव कसा म्हंतो मी? मंडळीला बोललो म्या परवाच जगण्यात काय नाई; जीव देऊ एकजात! “अवं असं का वंगाळ बोलताय?” असं बोलली माजी बायको. आता या बाईलीला सांगणार तर काय? पोरगं नकळतंय; रडारड असतीय नुस्ती घरी; त्याला कसा समजिवनार? सगळाच गोपाळा झालाय! बाईली काल परत म्हटली की, “दोघांपुरतंच उंदराचं औषाध हाये शिल्लक” नि मुसमुसून रडली…

ठिय्या केला मी बी मनाचा. तालुका गाठला; मंगळसूत्र ठेवलं गहाण नि परतलो की पेरणीला; म्हटलं गड्या, आसं हारायचं नाई; कुणाच्या बापाला भ्यायाचं नाई! पावसाची खबरबात मिळतीय रेडूवरनं; पण आपल्या प्रदेशात नाई पडनार असंच लक्षान! झालं बरंच दिस झालं त्यालाबी; बाईलीनं कुठलं व्रत बी केलं; अन्न-पाणी सोडून; आता खायलाच काई नाई म्हटल्यावर उपासमारच व्रतं म्हणून म्हणायची!
आज माझी बायको गेली आबाळात…

रातभर पोरगं रडतंय; म्हणतंय “बा, पाऊस कोसळायलाय; म्हणतुया, इठ़ठल, इठ़ठल! त्याला सांग ना गपायला!”