शनिवार, २९ एप्रिल, २०१७

केव्हा तरी पहाटे

आताशा संध्याकाळची वेळ होते तशी कोमट झुळूक कुठूनशी येते. दुपारी बारा वाजेपासून संध्याकाळी सहापर्यंततरी तापमान चाळीशीच्या उंबरठ्यावर पुढे-मागे झुलत राहिलेले असते. दुपारच्या गरम झळा कंटाळल्यासारख्या माघारी फिरतात संध्याकाळी नि मग कोमट झुळूक वाहत राहते. दुपारी आटलेली नदीकाठची टिटवी अचानकच जागी होते. दिवसभराचं राहिलेलं सगळं ओरडायला सुरूवात करते. रस्त्यावरची वाहतूक थोडी भरल्यासारखी वाटते आणि ट्राफिक सिग्नल्सवरती गाड्यांची गर्दी पाहून जीवन सुरळीत चाललंय याची हमी भेटते.

उन्हाळा सुरू झालाय आता महाराष्ट्रात. तापमान कुठे अधिक कुठे अति-अधिक असंच चाललंय. त्यात नविन ते काय? उन्हाळ्याचा उत्सवच असा. उष्माघाताचे बळी ठरलेलेच मुळी. घामाच्या धारांनी हैराण करून सोडलेलं असतानाही दिवसभर एकाच जागी खपणारे सरकारी किंवा बिगर-सरकारी कर्मचारी आणि घरी परतल्यावरही घामाच्या बिछान्यात लोळणारे हे जीव. भारतातल्या कार्यालयांची परिस्थिती इतकीही चांगली नाही की घाम येणारच नाही. तो येणारच, पण त्याला कितपत समजून घेणारी लोकं आजूबाजूला आहेत त्यावर घाम आला म्हणून लाजायचं की नाही हे ठरवावं लागतं. निसर्गानं आपल्या स्वत:च्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी आखलेली ही योजना आपण कित्येकदाअन-प्रोफ़ेशनल दिसतंया भावनेने दुर्लक्षित केली, करत राहतो. घामाचा वास मारतो म्हणून आपण डिओडरण्टचे फवाऱ्यांवर फवारे मारत राहतो. एवढं सगळं करूनही जेव्हा तापमान चाळीशी ओलांडतं तेव्हा घामांच्या धारांवर काहीच उपाय चालत नाही. माणसानं काम करावं का घाम पुसत रहावा नि डिओ फवारत रहावा?

घामाच्या धारा हा तसा फार खोल विषय आहे. त्यावर बोलत बसलं तरस्नेहदीपचा एखादा अंकही अपुरा पडेल. मी विषय काढला कारण कुणी यावर जास्त चर्चा करत नाही आणि या प्रश्नाला लोक सततवैयक्तिकस्वरूप देऊन टाळतात. घाम हा वैयक्तिकप्रश्न जसा उन्हाळ्यात उदभवण्याची शक्यता असते, तसेच अनेकविध प्रश्न उन्हाळा आपल्यासमोर घेऊन येत असतोदरवर्षीच. आपण आपल्याच व्यापात गुंडाळलेले (किंवा गुंडाळवलेले!) लोक आपल्यावैयक्तिकप्रश्नांपुरतेच मर्यादित राहतो. आपल्या प्रश्नांची झेप कित्येकदाउद्या पाणी येणार नाही तर आता भरून ठेऊइतपर्यंत जातेही, पण त्यापुढे जाऊन सरकारला दोष देणं, हवामान बदलाला दोष देणं इथं कुठंतरी येऊन गाडी थांबते. संध्याकाळची रस्त्यावरची ट्राफिक बघितली की आपल्या जिवात जीव येतो. आपण मनातल्या मनात म्हणतो कीदुपारपेक्षा आता बरं आहेआणि रात्री बिछान्यावर दोनेक वाजेपर्यंत अस्वस्थ लोळत पडतो, कारण त्रास होत असतो. झोप लागत नाही, मानेखाली सतत घाम चिखलासारखा भासत राहतो; कूलर असलाच तर त्याची दमट हवा नाका-कानांत जाऊन नाक चोंदते. रात्री एक किंवा दोन नंतर आपण उठतो, थोडं इकडे-तिकडे करतो. आरशात डोळ्यांतल्या रक्तवाहिन्या चांगल्याच गलेलठ्ठ दिसतात, तोंडावर पाणी मारून पुन्हा आपण लोळण घेतो. दिवसभराच्या कामाच्या ताणाने ताणलेला आत्मा थोडा सैलसर पडतो. रात्र आता थंडेरी झुळूक सोडू लागते आणि केव्हातरी पहाटे डोळा लागतो.  
झोपेचे काही तासच मिळतात पहाटेच्या वेळेस आणि काही तासांतच गोंधळ-गडबड कूलरच्या आवाजाहूनही वाढतो. जाग येते तसं समजतं की पाणी आलंय नि जो-तो जगण्याच्या धावपळीत गुंतलेला आढळतो. हे सगळं बघून वाटू लागतं हे काय जगणंय?’

बरं, हे नको; मग कसं जगणं हवंय तुम्हाला?’ हा प्रश्न खरं तर आपल्याला नाही पडत, पण उन्हाळा हा प्रश्न दररोज विचारत राहतो, एवढंच की कुणी लक्षच देत नाही बिचाऱ्याकडे. उन्हाळ्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन किती कोता आहे याची जाणीव मला पदोपदी होत राहते, पण आपण नळाला आलेल्या पाण्याने समाधानी होण्यावरच अडकलोय ही खेदाची बाब आहे.

उन्हाळा दरवर्षी हेच विचारतो – “Is this what you want?”

घामाची पर्वा करता कुण्या अनोळख्या व्यक्तींसाठी पाण्याची सोय करणारे कित्येक राबणारे हात महाराष्ट्रात आज काम करताहेत. त्यांचं काम प्रशंसनीय आहे, त्यात शंकाच नाही. हे लोक, पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन, आणि असे कित्येक, आज जी पाण्याची कमतरता जाणवतीय ती भरून काढण्यासाठी अतिशय तळमळीने काम करताहेत. गावकऱ्यांच्या जागृतीचं काम करत, त्यांच्या खांद्याला खांदा लावूनपाणी अडवा, पाणी जिरवाचा घोष करत ही मंडळी उन्हाळ्याला त्यांच्या परीने उत्तर देत आहेत आणि दुसरीकडे आपल्यासारखे ते च्या नोकरीत अडकलेले आणि संसाराच्या व्यापात गुंगलेले जीवआज नळाला पाणी येतंय की नाहीया प्रश्नावर गुंजन करत राहिलेत. याव्यतिरिक्तही आजच्या घडीला जुनाट झालेले सण-उत्सव साजरे करून उन्हाळ्याची थट्टा आपण चालूच ठेवलीय. अगोदर जंगलं जाळून मनातल्या दु:इच्छांचं दहण करायचं, नंतर पाण्याची रंगपंचमी खेळून आपल्या मनातलाजगाचे आम्ही राजेअसा सुप्त अहंकार जागृत करायचा. हे दरवर्षीचं आहेच. दिवाळीत फटाके फोडून स्वत:च्या आजूबाजूचं वातावरण दुषित करायचं नि ‘Smoking Kills’ च्या जाहिराती करत फिरायचं.

उन्हाळा दरवर्षी, दररोज हाच एक प्रश्न माझ्यासमोर उभा करत येतो. “Is this what you want? हे असं जगणं तुम्हाला हवंय का? तुम्हाला तुमच्या आजूबाजूला नैसर्गिक हिरवळ, झाडं नको आहेत का? तुमच्या आजूबाजूचे स्वच्छ पाण्याचे साठे तुम्हाला मारून टाकायचे आहेत का? तुम्हाला हवामान बदलाला अजून हातभार लावायचा आहे का? तुमच्या पाणी नि वीज तुटवड्यात तुम्हाला भर टाकायची आहे का?

उन्हाळ्याचे हे सारे प्रश्न आजचे नाहीत. हे माणूस जेव्हा जग जिंकण्याएवढा समजूतदार झाला तेव्हाचे आहेत. जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून जगाविषयी आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. जरी या जबाबदाऱ्या तुम्ही झटकल्या तरी स्वत:च्या नि स्वत:च्या पुढच्या पिढीच्या जगण्यासाठी काही गोष्टी करणं अतीव गरजेचं आहे. आजचे भारताचे प्रश्न उद्या जाऊन जगाचे प्रश्न बनणार आहेत कारण जीवन आणि जल सर्वत्र आहे. आपल्याला मिळालेली बुद्धी, ताकद, मुबलक प्रमाणात उपल्ब्ध असलेली नैसर्गिक साधन-संपत्ती आपण गमावली तर आपल्याएवढा दु:खी जीव या जगात कुणी नसेल.

उन्हाळा चिडचिडीचा, त्रासाचा नाहीये. तो आपण करून बसलोय आता. जंगलात फिरताना उन्हाळ्याची कितीतरी साजरी रूपं पाहिली आहेत मी. हिवाळ्यासारखाच उन्हाळाही आल्हाददायक सण आहे. पिवळट झालेल्या शुष्क पानगळीच्या वनात फुललेली लालभडक पळस (Butea monosperma) बघितलीय का तुम्ही कधी? `Flame of the Forest’ म्हणतात तिला. आता ही गुलाबीसर लाल पळस आपला नैसर्गिक जलवा दाखवत असताना वणव्यांची नि होळीची काय गरज आहे? त्या पळसेवरती चरणारे विविध जातींचे पक्षी बघूनहे resource utilization आपण करू शकलो नाहीया विचाराला वाचा तरी फुटेल; आगीभोवती नुसतंच बोंबा मारत फिरण्यात काय तथ्य आहे?

उन्हाळयाने जन्मच नाही घेतला तर पिवळं झुलदार गवत कसं अनुभवणार तुम्ही?

मध्य-भारताच्या तळपत्या उन्हात फिरलात तर सकाळच्या वेळेस एक मंद हवाहवासा वाटणारा गंध वेडावून जाईल तुम्हाला. मोहाच्या प्रचंड झाडांच्या फुलांचा हा गंध, उन्हाळ्याव्यतिरिक्त कधी सापडणार? अगदीच नशिबवान असाल तर मोहाची (Madhuca longifolia) फुलं खाऊन झिंगलेलं एखादं वानरही दिसेल आसपास. उन्हाळ्याव्यतिरिक्त कधी तुम्हाला फळांचा राजा चाखता येणार? उन्हाळयाने जन्मच नाही घेतला तर पिवळं झुलदार गवत कसं अनुभवणार तुम्ही? पळस नि मोह सोडा, नुस्ता बहरलेला बहावा (Cassia fistula) जरी तुम्ही बघितलात तर रंगपंचमी खेळल्याबद्दल तुमची तुम्हालाच लाज वाटेल. उन्हाळ्यानं रंगपंचमी वर्षानुवर्षांच्या उत्क्रांतीने आपल्या अगोदरच सुरू केली आहे. उगाच नाही बहाव्याला ‘Golden Shower Tree’ म्हणत. नीलमोहोर (Jacaranda mimosifolia) पाहिलाय कधी? हे माझ्या जिव्हाळ्याचं झाड. त्या नीलमोहोराच्या सड्यावर कित्येक तळवे उदार झालेत आजवर! जर उन्हाळ्याचा हा आफ्रिकन, but very much Indian, अविष्कार तुम्ही पाहिला नसेल तर पुणेरी भाषेत बोलायचं झालं तर, ‘तुमच्या जगण्याला काय अर्थय?भारतात उन्हाळ्यात फुलणाऱ्या झाडांची नावं घेऊ तेवढी थोडीच आहेत, पण जर झाडांसारखी झाडं उन्हाळ्यात स्वत:ला फुलवतात तर एक नऊ ते सहाच्या चक्रात अडकलेला बुद्धिवान माणूस का नाही?

तापमान वाढू दे, ते वाढणारच आहे. ते वाढतंय कारण आपण वाढू दिलं. आता त्याला दुषणं देण्यात आणि केव्हा तरी पहाटे झोप लागेल अशी वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. झालंच तर पुढच्या वर्षीचा उन्हाळा आणखीन सुसह्य होण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा. कामाच्या चक्रात अडकला असाल तर निदान ऑनलाईन पाण्यासाठी काम करण्याच्या स्वयंसेवी संस्थांना आर्थिक हातभार लावा. जर अंगात उन्हाळ्याएवढीच धग असेल तर जिथे गरज आहे तिथे जाऊन श्रमदान करा. एखाद्या वीकेण्डला बाहेर पडा. काय काय कुठे कुठे फुललंय ते बघा. किती रंग आहेत उन्हाळात हे एकदा तरी मोजाच म्हणतो मी. एखाद्या रात्री, घराच्या गच्चीवरती किंवा असलंच तर फार्म हाऊसवर उघड्यावर झोपा. अशावेळी डोळे उघडले तर चांदण्या दिसतील आणि कानही उघडे ठेवले तर आजूबाजूचे वन्यजीवही दिसतील. उन्हाळ्याचा मनमुराद आनंद घ्यायला शिका आणि इतरांनाही शिकवा

उन्हाळ्यापासून दूर पळू नका, ते शक्य नाही. येऊ दे घाम, भिजू दे अंग थोडं. जिममधे जाऊन काय गाळतो आपण? इथे तर आपसूकच सोय केलीय!
- पंकज कोपर्डे
स्नेहदीप April 2017