शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०१०

मैत्रिणीचा गाव

माझ्या मैत्रिणीच्या गावात बांधावर उगवलेल्या गवतात वाट काढणाऱ्या शेळ्या नि काठी मानेवर टाकून बीटल्सची गाणी गुणगुणत चाललेला मेंढपाळ. लहानपणापासून आकाश वेढायला वेडं झालेलं एक अतिउंच अतिविचित्रसं झाड. त्याचं सारं लक्ष एकट्या आकाशाकडे नि अंगाखाद़्यावर लगडलेली फुलं-फळं-पानं-झोपाळे…साऱ्यांसाठी ते अनभिज्ञ! बांधावर एकटीच बसलेली ती गोगलगाय नावाची संथ गुंडाळी. किती निक्षून बघतीय; तिला रस्ताच माहिती नाही…जायचंय कुठे ते! एक सुंदरसं तळं नि तळ्याशेजारी ते तेजोगोल झाड. त्याचं स्थानही तसंच अढळ. त्यावर सुगरणींची घरटी. वाऱ्यावर निवांत लगडलेली. वादळाची-पावसाची-ऊनाची नि कुणाकुणाचीच भिती नसलेली. तळ्यात मासे, कासवं नि काठावरती कोवळं ऊन, गारगोटीसारखा वारा नि हवाहवासा वाटणारा एकांत! तो मैत्रिण चितारत नाही; हे फक्त आपण समजून घ्यायचं! मैत्रिणीच्या गावात आसमंतभरून गाणी नि हवं ते हव्या त्यावेळेस ऐकता येतं. ज्याला हवं ते! पाऊस नसताना ऐन भरात आलेला मोर पाहिलाय का कधी? मैत्रिणीच्या गावात आहे खरा.
मैत्रिणीच्या घरात कोंबड्यांची पिल्लावळ. चिवचिवाट नि कामं करून घराला डोकं टेकवून निजलेली बैलगाडी. अगदी तिच्या घरामागेच वारल्यांचे डोंगर. डोंगरावर मध्यभागी गणेशाचं देऊळ. नि नुस्ती नाचगाणी, भरल्या दुपारी! मैत्रिणीच्या गावात सुर्य नाही, ढगही नाहीत; नाही पाऊसही…हे फक्त आपण समजून घ्यायचं!
मैत्रिणीच्या गावात चक्रावलेला वावर; कुठं जायचं कळत नाही म्हणून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलाय खरा; पण आता गावाच्याच प्रेमात पडून हलण्याचं भानही उरलं नाहीये!

बुधवार, २० ऑक्टोबर, २०१०

      मी अरूणाचलमधे दहा दिवस काय केलं याचा अजूनही कित्येक लोकांना संशय आहे!! तसा मलाही थोडा आहेच म्हणा…मी बऱ्याच काही गोष्टी ठरवून गेलो होतो; त्यातल्या काही अंशत: पुर्ण झाल्या, बऱ्याच अपूर्ण राहिल्या नि अजून काही न ठरवलेल्या गोष्टींचीही भर पडली त्यात. मी इथून निघण्यापासून काहीतरी कुठल्यातरी प्रकारे document करायच्या प्रयत्नात होतो; बहुधा त्यामुळेच काही करू शकलो नाही. Document करायचेही किती मार्ग आहेत. फोटोग्राफी, लिखान, डायरी, व्हॉईस लॉग, व्हिडीओ लॉग. यातली प्रत्येक गोष्ट थोडीफार केली, त्यामुळे आता सगळी भेळ झालीय. पण ठीकंय मी सध्यातरी लिखान नि फोटोग्राफ्स publish करून माझ्या एकंदरीत ट्रिपबद्दल माहिती देऊ शकतो…
      अरूणाचलमधे तसं माझं काहीही काम नव्हतं; टाईमपास करणं, जंगलात भटकणं नि पक्षी-निरीक्षण करणं; झालंच तर मॉथिंगच्या कामात थोडी मदत करणं, इतकंच. जंगल समजून घेणं हेच काम होतं मला. ते चांगलंच झालं. आसाम सोडून माणूस एकदा का अरूणाचलमधे शिरला की शक्यता-अशक्यांतांचा नुस्ता प्रवास सुरू होतो. एकतर तिथे सेल्युलार नेटवर्क काम करत नाही. तिथलं लोकल सिम किंवा मग BSNL चं पोस्टपेड सिम तिथं काम करतं. Even आसाममधेही तोच सिन आहे; पण आसाममधे transport आणि इतर सोयीही उपलब्ध आहेत, अरूणाचलमधे तसं नाही. म्हणजे अरूणाचल मधे गेलो तर तिथल्या बऱ्यापैकी शहरांशिवाय STD इतर जास्त कुठे उपलब्ध नाहीत. पण काहीही असो; इतक्या दिवसांनंतर हे सेल्युलर फोनला सरावलेलं मन STD मधे चांगलंच घुटमळत राहिलं; कारणंही तशीच होती!
      अरूणाचल मधे रस्ते खराब आहेत; सगळेच नाही; पण अधे-मधे जर एखादा खराब पॅच लागला तर तो चांगलाच वेळ खातो. असा पॅच भालुकपॉंग ते सेस्सा च्या मधे लागतो; जवळपास दहा किलोमीटर्सचाच हा रस्ता पण तासभर तरी खातो. इथे बऱ्याच ठिकाणी मिल्ट्रीचे कॅम्प्स आहेत. त्यामुळे जरा बरं वाटतं. अरूणाचलवर मिल्ट्रीची चांगलीच पकड आहे, हे जाणवत राहतं. बऱ्याच गोष्टी आहेत, चांगल्या वाईट; पण एकंदरीतच अरूणाचल मधली लोकं प्रामाणिक वाटली.
लामा कॅम्प
      ईगलनेस्टच्या पायथ्याला हा कॅम्प आहे. सुंदर कॅम्प. तिथल्या लामामधे बसा किंवा केवली मधे, समोर दूरवर हिमाच्छादित शंकर पर्वत दिसतो. ‘लामा’, ‘केवली’ नि ‘शंकर’ पर्वत हे सगळे माझे शब्द आहेत; प्रत्यक्षात त्यांची नावं वेगळीच आहेत. ही नावं कुठून आली यामागची गोष्ट तशी काही गूढ नाहीये; ज्या-ज्या गोष्टीला जे-जे समर्पक वाटलं, ते नाव दिलं; बस्स इतकंच. लामाला थांबलो होतो, त्यावेळी थंडी वाढली होती. एके दिवशी पाऊसही झाला. जबरदस्त पाऊस. हत्तींचे चित्कार खालच्या दरीतून ऐकू यायचे नि मी दररोज आज इथून आवाज आला, आता इकडून आला असं म्हणत हरखून जायचो. लामाच्या आसपास बरेच पक्षी पाहिले. मी जे काही पाहत होतो, ते पुर्वी पाहिलेलंच नव्हतं; त्यामुळे माझ्यासाठी excitement नावाचा काही प्रकारच नव्हता उरला! हा प्रकार जरा वेगळाच असतो. ठीकंय. अरूणाचल मकाक पाहिले. हा एक दुर्लक्षिलेला प्राणी. इतके दिवस होता, पण ही मकाकची वेगळी जात आहे, हे कुणाच्या ध्यानात नव्हतं आलं! लामाजवळच बुगून लायोचिचला या नव्याने शोध लागलेल्या पक्ष्याची कोवळी शीळही ऐकली मी. लोकं जगभर फिरून या एका पक्ष्यासाठी इथे येतात, भरघोस पैसे खर्च करतात नि शेवटी हातातल्या बर्डलिस्ट मधे टिक करून निघून जातात; हा प्रकार काय असतो, हेसुद्धा नव्यानंच अनुभवलं.
      लामामधले तीन दिवस भारी गेले. पक्षीच पक्षी पाहिले नि रात्री कित्तीतरी प्रकारचे पतंगही पाहिले. पिकासो मॉथ नावाचा एक सुंदर पतंग पाहिला; त्याच्या पंखांवर झाडाच्या फांदीवर एक पक्षी बसलाय अशी नक्षी. हे कुणाला कळतं नि कोण बनवतं? की आपणच आपल्याला मुर्ख बनवत असतो?
बोंपूचा कॅम्प
     लामावरून बोंपूला गेलो एके दिवशी. बोंपू ईगलनेस्टमधे आहे. लामा बाहेर आहे अभयारण्याच्या. बोंपू समुद्रसपाटीपासून ३६०० मीटर उंच तर लामा २६०० मीटर. लामाच्या पायथ्याचं गाव (टेंगा) ९०० मीटर उंच. लामापेक्षा बोंपू भारी वाटलं. लामासारखी छान व्यवस्था जरी नसली तरी बोंपूचा कॅम्प पक्षी पाहण्यासाठी मस्त जागाय. बोंपूच्या कॅम्पवर भेकर (Barking deer) दिसलं, yellow throated martin (मुंगूसासारखा प्राणी), हत्ती, मलायन जायंट स्क्विरल नि फार सुंदर, निरागस असा दिसणारा ‘चिंटू’ (Tesia) पक्षी! हत्ती लांबून पाहताना फार छान वाटतं. निवांत चरत असतात बिचारे. बोंपूचा कॅम्प लामापेक्षा बऱ्यापैकी गरम होता; दोन दिवस छान कोवळी ऊनं पडत होती नि त्यामुळे फुलपाखरं नि पक्षीही दिसत होते बरेच. भुतान ग्लोरी नावाचं एक सुंदर फुलपाखरू पाहिलं तिथं…त्याची तर पुर्ण एक वेगळीच गोष्ट होईल; पण लिहायचा कंटाळा आहे!
सेस्सा
      सेस्सा हे छोटंसं खेडं. Population 110. सुंदर गाव. गावावर वळणावळणाने गेलेला बऱ्यापैकी रहदारीचा रस्ता. एका वळणावर काजूचं हॉटेल. या काजूमधला ‘ज’ हा ‘जहाल’ मधल्या ‘ज’ सारखा. ‘जहाज’ मधल्या ‘ज’ सारखा नाही! तिचं नाव काजल. सोईसाठी काजू. तिच्या त्या हॉटेलात एका कोपऱ्यात जागा बळकावून सकाळी सहाच्या कॉफीबरोबरचा माझा वेडसर माऊथ ऑरगन नि काजूचं लाडकं हॉटेलात घुटमळणारं शेळीचं पिल्लू! सेस्साच्या प्रेमात पडलोय मी. भुरळ पडलीय त्या गावाची. अशी भुरळ पाडणारी गावंच मुळात कमीयंत भारतात. जी क्षणभर छान वाटतात ती काही दिवसांतच नकोशी वाटू लागतात. सेस्साबद्दल मला तसं नाही वाटतंय. सेस्साला ऑर्किड सॅन्क्च्युरी आहे. तिथे मला ऑर्किड्स दिसले नाहीत पण. सेस्सामधे पिवळ्या गळ्याचा सरडा सापडला मात्र नि त्याचे छान फोटोग्राफ्सही मिळाले. सेस्साची आठवणही चांगलीच गडद आहे नि अजून काही दिवस तरी जाणार नाही मनातून.  
          

गुरुवार, २ सप्टेंबर, २०१०

पुलावरली गुपितं,
वाहत्या पाण्यात,
वाहताना, पाहताना,
गोड हसत राहिलीस,
आतल्या-आत…

पुलावरल्या काठावर,
अल्लद विसावलेलं,
इंद्रधनुष्य, पाहताना,
हातांनीही मारली होती,
हळूवार गाठ…

…वाहत राहिला पूल एकटा,
वाहत राहिली नदीही एकटीच,
या अशा सुनसान एकटेपणावरती;
कशी गं तुझी नि माझी घरटी??

बुधवार, २५ ऑगस्ट, २०१०

कोफ्ताकरी


    खरवड-खरवड, मनाची तडफड! नाही, नाही…तडफड म्हणण्याइतकंही काही घडत नाहीये आजकाल. नांगरानं जमीन द्गड-माती-ढेकळं-गांडूळ-साप-विंचू-अंकूरांसकट खरवडत न्यावी, अशी सगळी खरवड. नांगर एकदा फिरल्यानंतर अंगावरून सारी वस्त्रं काढून घेतल्यासारखी उद्ध्वस्त जमीन नि सुन्नसा आवाज…यात तडफड कुठली? पडझड सगळी. क्षणात राहत्या झोपडीवरून बुलडोझर फिरवावा इतकं सहज सोप्पं ते मनाचं वागणं. विव्हळायला त्राणच उरले नाहीत, मित्रा! गाणं नाही, कल्पना नाही, चित्र नाही, काही घडेल याची शक्यताही नाही! अडकल्यासारखी भावना आहे ही! वर्षानुवर्षे बध्दकोष्टता झालेल्या पीडिताचं दु:ख, सहज-सुलभ जगणाऱ्यांना काय? हसण्यासारखी गोष्ट नाहीये ही! उदाहरण काहीही असू शकतं!! पोटातच अडकलेल्या बाळाचं दु:ख कोणाला कळणार? वेदना दोहोंनाही! मातेलाही नि बाळालाही…चूक कुणाची?
      काय माहिती?!! परिस्थितीची? असावी. असावी एखांदवेळेस! परिस्थिती ही काळाचं फ़ंक्शन! म्हणजे काळच जबाबदार म्हणायचा! मला तशीपण या काळानं पुर्वी कित्येकदा अद्दल घडवलीय, वेगवेगळ्या फ्रंट्सवर! त्यावर तर एक पुस्तकच तयार होईल! पण आळस…लिहीणार कोण? जाऊ देत!
      विषय असा होता की तडफड व्हायला काहीतरी असावं लागतं मुळात. आत असलेल्या कल्पनांना ओरडण्याचं त्राणच नसलं तर त्यांना हुडकणार कसं? ढिगाऱ्यातून बाहेर काढणार कसं? याचं एक छानसं उत्तर! काही घडलंच नाही, असं समजायचं! यालाच बहुधा मन:शांती म्हणत असावेत! यावर हाच एक उपाय आहे. कोफ्ताकरी करणे नि खाणे. ज्या गोष्टींत जीव अडकलाय त्यांना कोफ्ते समजून त्यांचा फडशा पाडणे! ढासळणे ही एक कलाय…ती ज्यांना जमत नाही, ते बेघर होतात, आत्महत्या करतात; पण ज्यांना जमते, ते जग विणतात! व्वा, काय लिहीलंय…काय माहिती का लिहीलंय मी हे!! बहुधा, ढासळण्याची सुरूवात झालीय कुठेतरी…   
पंकज २५.०८.१०

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०१०

whoever wins, looses


शेजारील चित्र पहा…पहा, शांतपणे हातातील सर्व कामे बाजूला सारून पहा. त्या फोटोमधील एक ऩ एक गोष्ट व्यवस्थित पहा. डोळे मिटून क्षणभरच थांबा नि आता विचार करा. जो काही विचार डोक्यात येईल, तो इथे मांडा (comments मधे). काहीही असू दे मग…काय वाईट, काय खरं, काय खोटं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बऱ्याचदा अनुभव नि ज्ञान (माहिती) या दोन गोष्टींवरच अवलंबून असते. असू देत; त्याचं कुणाला काय? काय वाटतंय ते लिहा…
रेल्वे-स्टेशनावर या मॅगझिनवर नजर पडली नि ते बॅगेत टाकलं. प्रवासभरात वाचून काढलं. कित्येकांनी त्याचं फ़्रंट कव्हर पाहून ते चाळलही. किती ते कुतूहल? एकानं विचारलं, “काय झालं या बिबळ्याचं पुढे?” think n’ imagine. पुढे मी काय बोलू? हे समोर दिसतंय ते कायंय? म्हणजे हे असं फ्रंट-पेज पाहून सहज तोंडातून शब्द फुटतात…what the hell! मी सुमारे अर्धा तास भर ते एकच पेज पाहत बसलो. हे असं एकटंच चित्र सतत पाहत राहताना कित्तीतरी गोष्टींवर विचार करत बसलो. हा फोटो फक्त report किंवा news फोटो नाहीये…तो Human-animal conflict चा representative फोटो म्हणून बघा. कायंय त्यात? डार्ट लागलेला एक पुर्ण वाढ झालेला बिबट ज्याच्यावर सुमारे पन्नास एक लोक तरी तुटून पडलेत. धूळ, बिबटाच्या पेकाटात लागण्याच्या उद्देशात फेकलेली एक अधांतरी वीट, प्लास्टीक किंवा तत्सम कचरा, बिबटाच्या पाठीमागे २-३ दंडुकाधारी हिरो (सर्वांच्या पायातल्या चपला बघून त्यांचा socio-economic status थोडाफार लक्षात येईल) आणि अजून कित्तीतरी चेहरे (बघे). फोटोच्या सेंट्रल पॉईंटच्या थोडंसं वर एक plain tiger butterfly, बिचारं एकटंच रस्ता क्रॉस करतंय; त्याला आजूबाजूला काय घडतंय याचा काहीही बोध होत नसणार; त्याच्याच पाठीमागे तसंच एक दुसरं उडण्याच्या तयारीत…
बिबट…वेदना, अजून काय म्हणू शकतो आपण? बिबटाची कातडी अशी फिसकारल्या सारखी नसते कधी; त्रास आणखीन काय? मानेत घुसलेला डार्ट…काय म्हणजे काय सुरू कायंय? Okay, काही लोक म्हणतील तुला, तिथे cozy-cozy जागेत बसून प्राण्यांच्या वेदनेवर लिहायला काय जातंय? हा फारच महत्त्वाचा प्रश्नय खरा! म्हणूनच मी म्हटलं, अनुभव नि ज्ञान या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात ते! बिबटाच्या खाली शीर्षक आहे: India’s Leopard Problem: Is this cat vanishing faster than the tiger?
कुणाला माहिती? कुणी कधी बिबटाला प्राधान्य दिलाय भारतात. वाघांना आत्ताशी कुठं भाव द्यायला लागलेत लोक…अभी और वक्त है, जब बिबट भी १४११ बचेंगे, तब देखा जायेगा!!
Follow:


सोमवार, २ ऑगस्ट, २०१०

hands and patches

                चित्रकलेच्या क्षेत्रात  ठसा उमटावा असं कैक दिवसांपासून मनात होतं. ते आज प्रत्यक्षात उतरलं. माझ्या बेडरूमच्या खिडक्यांना पडदे नाहीत; आणि इमारतीचा हा भाग चक्क सुर्यप्रकाशात न्हाऊन निघतो!! तसा मी अंधारात राहणारा प्राणी. या प्रकाशाचा त्रास व्हायचा. मग एके दिवशी ठरवलं की यावर काहीतरी उपाय करावा. पहिला विचार आला तो म्हणजे पुणे टाईम्स मधल्या सेमी-नूड्ज आतल्या बाजूस तोंड करून प्रकाशाचा रस्ता रोकावा. हा आपला टिपीकल बॅचलरी विचार तसा; पण मी राहतो ते घरंय, रूम नाही; याचं मला चांगलंच भान आहे. शिवाय माझ्या या कलाकृतीचे माझ्या घरी फार विपरित परिणाम होतील याचीही जाण होतीच. मग काय करावं? म्हटलं, छानसा रंगीत कागद आणून डकवावा; कुठला फिल्टर? केशरी, हिरवा, निळा?? विचार करत बसलो…

                लॅपटॉपवर गाणी सुरूच होती; त्याच दरम्यान “कट्यार काळजात घुसली” मधली काही गाणी सुरू झाली. बस्स…ती सुरू झाली नि माझी विचार करण्याची पद्धतही पुर्णपणे बदलली. हुरूप आला. कुठल्या-कुठल्या म्युझिअम्स मधे लाल-निळ्या रंगाचे शिशे पाहिलेले आठवले. छंद मकरंद झाला! मग काय? काचच रंगवायला घेतली. अगोदर निळसर बॉर्डर आखू वाटली. तसं केलं. मनात मकरंदासारख्या कल्पना गोंधळ घालत होत्या. बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की, कुठेतरी ठसे उमटवावेतच! शिवाजी महाराजांनी जसा सिंधुदुर्गात उमटवलाय तसा!!
 निदान मी माझ्या घरात तरी उमटवू शकतो; आमचं कर्तुत्वही तसं चार भिंतींएवढंच ओ! मग म्हटलं तसं! ठसे उमटवले नि उरलेला भाग समर्पक नि उपलब्ध रंगांनी रंगवला. लांबून पाहिल्यावर प्रकाशही थोड्या निवल्यासारखा वाटला. अंधारल्या जीवाला अजून एक अंधारली खोली मिळण्याचा आनंद झाला!

बुधवार, २८ जुलै, २०१०

बाप्पा

सकाळी साडेअकरा वाजता बाजारात जाऊन काही रंग विकत आणले. एक निमूळत्या टोकाचा नि दुसरा पसरट तोंडाचा असे दोन ब्रशही आणले. जेवण वगैरे करून म्हटलं एक हात मारावा नि मस्त झोपावं; बाहेर पाऊसही छान कोसळतोय; अशावेळी माझ्यासारख्या जीवाला झोपेशिवाय दुसरं काय सुचू शकतं म्हणा!

मग तसा एक हात मारून घेतला. नि मग पुढे वेळेचं भानच उरलं नाही...चित्र साकारत राहिलो. अधून-मधून कित्तीतरी विचार डोक्यात येत राहिले; एखादी रेष चुकतीय असं वाटलं तरी त्या चुकीचे कित्तीतरी अर्थही निघू शकतात ना?! रंग...रंगांचंही तसंच वाटलं मला. चित्र म्हणजे नक्की काय याचा गंधही नसलेला मी प्राणी! डोळ्याला जे जे चांगलं वाटेल ते ते चांगलं हा किती संकुचित विचारंय; याचाही मस्त चटका बसला मनाला! दुपार झाली; थांबू वाटलं नाही...
मग पुन्हा कित्तीतरी वेळ तिथेच गुंतून पडलो. हे असलं काहीतरी करायला हवं यार! तहान-भूक विसरून. किती वेळा हे मनासारखं घडलंच नाही. कथा लिहीताना होतं ते तेवढंच! त्यावेळी तहान भूकच काय; वेळ, वय नि स्वत:चाही विसर पडतो. इतका साधा बाप्पा; त्याचं ते किती साधंसं रूप. कुणीही, अगदीच शिकाऊ माणसालाही जमेल असं ते चित्र! कुणी बनवलं असेल गणपतीला? त्या चित्राला? हे दैवत इतकं गोड आहे की प्रतिभेचं दैवत असं म्हणताना त्याच्या स्वत:च्याच आकारात कितीतरी आकार आपोआपच प्रगट होताना दिसतात. छान! तसं मला लिहायचं आहे याबद्दल पण मला आता काहीच लिहू वाटत नाहीये! मला माहितीय की मला चित्र काढताना काय वाटत होतं नि ते मी किती enjoy केलं ते!

गुरुवार, २२ जुलै, २०१०

मेणबत्ती

मेणबत्तीच्या आयुष्यातला जळण्याचा क्षण किती अप्रूपाचा असावा? वारा येईल तसं लवलव करायची! आयुष्य असं जळत असतानाही असह्य वेदनांचा टाहो मेणबत्ती किती मूकपणे प्रगट करत जळतीय! मौन धरून बसलीय…सांगायचं नाहीच कुणालाच! कुठे भाजून निघालेलं अंग चरचर करतंय जळतंय. तो मेणबत्तीचा आवाज नाही; तो घटनेचा आवाज! घटनांना आवाज असतो. हिरव्यागार रस्त्यावर मध्यभागी नारळासारखी दोन रक्तमय डोकी नि मूकपणे उताराला लागलेलं रक्त…या घटनेला माझ्या मनात सुरूंगासारखा आवाज झाला होता खरा. पण तेवढ्याच मूकपणे मी माघारीही फिरलो होतो. मेणबत्ती असेच स्वत:चे कान बंद करून घेत असेल एखांदवेळेस. आवाज नाही; तर भिती नाही. ते एकलकोंडं जगणं जरी डोळ्यांनी दिसत असलं तरी तिचा हातात हात धरून असलेला प्रत्येक अणू-रेणू कितपत जीवात जीव अडकून जगला असेल या प्रश्नाला तरी उत्तर काय? वर लागलेली आग खालीपर्यंत पोहोचणारच; या भितीपायी कुठे कुठे कुणी कुणी मिठ्या मारल्या असतील नि कुणी कुणी आत्महत्येचे विचार केले असतील हे सांगणही किती कठीण! मेणबत्ती जळत राहते; तसंच तिचं जगही. अणू-रेणूंना आग स्वत:पर्यंत पोहोचत तोपर्यंत हे जाणवतही नसेल की ते एका जळणाऱ्या मेणबत्तीचे भाग आहेत! म्हणून तर कुठेच टाहो नाही; सर्वच मौनाचा कारभार; चटका लागतोय म्हणून लिहीतोय मी ही…आग आलीय अंगावर!
२१.०७.१०
पंकज

बुधवार, २१ जुलै, २०१०

सांच्याला लई पाय दुखत व्हते. का कुणास ठावं? मरेस्तोवर चाललो व्हतो; तेवढंच. ते बी रोजच घडतंय की. आजच का दुखू राहिले कळंना. तालुक्याला खेटं आमचं रोजवार चालूयंत. हे ना ते; ते नाही तर हे! जीवाला भ्रांत अशी नाहीच. पेरलेलं उगावलंच नाही; आता परत पेरायला पैका नको? पैका आणायला तालुक्याला; बसवारीच पाण्यासारखा पैका जातुया! पेट्रोलबी महागलंय; तिकीटं बी वाढलीयंत! देवाला साकडं घालायला त्यो बी पुर्वीसारखा राहलाय कुटं? इथं जीवाला जीव राहिला नाई; देवळात देव कसा म्हंतो मी? मंडळीला बोललो म्या परवाच जगण्यात काय नाई; जीव देऊ एकजात! “अवं असं का वंगाळ बोलताय?” असं बोलली माजी बायको. आता या बाईलीला सांगणार तर काय? पोरगं नकळतंय; रडारड असतीय नुस्ती घरी; त्याला कसा समजिवनार? सगळाच गोपाळा झालाय! बाईली काल परत म्हटली की, “दोघांपुरतंच उंदराचं औषाध हाये शिल्लक” नि मुसमुसून रडली…

ठिय्या केला मी बी मनाचा. तालुका गाठला; मंगळसूत्र ठेवलं गहाण नि परतलो की पेरणीला; म्हटलं गड्या, आसं हारायचं नाई; कुणाच्या बापाला भ्यायाचं नाई! पावसाची खबरबात मिळतीय रेडूवरनं; पण आपल्या प्रदेशात नाई पडनार असंच लक्षान! झालं बरंच दिस झालं त्यालाबी; बाईलीनं कुठलं व्रत बी केलं; अन्न-पाणी सोडून; आता खायलाच काई नाई म्हटल्यावर उपासमारच व्रतं म्हणून म्हणायची!
आज माझी बायको गेली आबाळात…

रातभर पोरगं रडतंय; म्हणतंय “बा, पाऊस कोसळायलाय; म्हणतुया, इठ़ठल, इठ़ठल! त्याला सांग ना गपायला!”

बुधवार, ९ जून, २०१०

हत्तीणबाईंची quest

पाखरानं कसं भिरभिरायचं, फिरायचं, मजेत उंडारायचं नि मनात आलं तर कुठल्याशा फांदीवर क्षणभर विसावायचं...मग परत भिरभिरायचं! पण एकदा किनई गंमतच झाली, चिंगीच्या बागेत धावपळ झाली! हत्तीणबाईच्या पोटात मळमळ झाली! आता मळमळ म्हणजे सोप्पी का ती? हत्तीण बाईंचं पोट लागलं की ओरडू आणि दुर्वा दिल्या, नारळं दिली; तरी काही शांतच होईना मुळी! मग आता उपाय काय यावर? चिंगी लागली विचार करू…गेली घुबड आजोबांकडे म्हटली, “चहत्तीणताईंच्या चोपोटात चुदुखूच चालागलंय चाफार! चाकाय चुउपाय चकरावा?” घुबड आजोबा कुठले ऐकायला? ऐकायला उठायला नको झोपेतून. आणि उठले तरी कानांतले वॉकमनचे गोळे काढणार कोण? चिंगी बघत बसली घुबड आजोबांकडे. घुबड आजोबा हलले नाहीत की डुलले नाहीत, मुळात काहीच काही बोलले नाहीत! “छे! असले कसले हो आजोबा तुम्ही?” चिंगीच्या मनात हा विचार आला खरा, पण करणार काय? हत्तीणबाई तर गडाबडा लोळू लागल्या नि नंतर-नंतर तर जोरजोरात चित्कारू लागल्या; हत्तीदादाची पंचाईतच किनई! त्या नकट्या नाकांच्या वटवाघळांनी तर बिबट्या-फुकट्या पोलीसांनाच आणलं नि F.I.R. फाईल केला झोपमोड केली म्हणून हत्तीदादांच्या विरोधात! आता मात्र चिंगी चिडली. घुबड आजोबांच्या कानांतले बोळे काढून त्यात ती जोरात किंचाळली. घुबड आजोबा खडबडून जागे झाले नि घाबरून दुसऱ्याच झाडावर जाऊन बसले; मान इकडं-तिकडं फिरवत डुलक्या घेऊ लागले. तेवढ्यात चिंगीनं आजोबांना सगळा प्रकार सांगितला… “चाकाय चुउपाय चकरावा?” घुबड आजोबा पण पडले संभ्रमात. असे कधी पुर्वी घडलेच नाही!

घुबड आजोबांनीही समोर घडणारा प्रकार पाहिला. हत्तीणबाईंची जीभ बघितली, कान तपासले, नाडी तपासली…पण काही थांग नाही. पोट तर भरधाव धावणाऱ्या मोटारसायकलीसारखं आवाज करत होतं. घुबड आजोबा पण घाबरले, त्यांनी त्यांच्या खापरपणजोबांनाही consult केलं आणि मग येऊन म्हटले, “उपाय आहे यावर एक. पण तो तोड मिळणं अवघडंय!”
चिंगी म्हटली, “चांसांगा, चपटकन चासांगाना!”
आजोबा म्हटले, “शोधा असे पाखरू, जे रूसलंय फार, आणि का कुणास ठाऊक विसरून गेलंय उडणं-फिरणं; अगदीच शांतही नाही, त्रागा करत बसलंय गप्पगार! त्या पाखराच्या नाकावर एक लाल टिकली रागाची, त्या टिकलीनेच शांत होईल भूक हत्तीणबाईंची!”

चाआता चुकुठे चिमिळेल चेते चापाखरू चीकी चाकाय चोहोणार चुपुढे?

(अशाच एका चिंगीला)
;-)

रविवार, ६ जून, २०१०

सुजलाम सुफलाम, सगळंच लुटलाम!!

मी सध्या या Conferences ला वैतागलोय! या conferences म्हणजे वैतागवाडी. अन्न-धान्याची, पैशाची प्रचंड नासाडी! तीन दिवस conference होती, बंगळूरात. पहिला दिवस आनंदात गेला. इकडे-तिकडे भटकत राहिलो; खेड्याची पोरं पिराच्या उरसात बोंबलत फिरतात तसा! याच्याकडे जा (biocon, eppendorf etc.); त्याच्याकडे जा; याच्या खोड्या काढ; त्याच्या खोड्या काढ. माकडचेष्टा सगळ्या. कामधंदे तर काही नाहीत; फुकटची उठाठेव. जे काम करायला तिथे गेलो होते; त्यातला स्वत:चा interest तर कधीचाच फिक्कट झालेला; नि मी केलेलं काम इतरांना सांगणं हे मला कपडे धुवायच्या पावडरी विकणाऱ्या salesman पेक्षा जास्त काही thrilling वाटलं नाही. माझ्यासारखेच इतरही काही लोक होते; ज्यांचं काम कपडे धुवायच्या पावडरींइतकही उपयोगाचं नव्हतं; पण बिचारी लोकं dedicatedly आपापल्या poster शेजारी उभी होती हॅलोजन लॅम्पखाली ac मधे! मी तीन दिवस खा-खा-खाल्लं…नि timepass केला. त्यासाठी एवढ्या लांबून (अवघे १६00 कि.मी.) (पुणे-बंगलोर) प्रवास केला. पैसे वाया घालवले; श्रमही! बौद्धिक म्हणाल तर काही increment नाही. एवढं सगळं सुरू असताना, विचार करायला मस्त वेळ मिळाला!

भारतातील biotech industry मधील बरीच प्रतिष्ठित लोकं आली होती. काही foreign delegates होते. त्यांच्या जेवणा-खाण्याची कुत्र्यासारखी सोय केली होती. त्यापैकी आम्हीही Poster author या प्रकारात मोडणारे कुत्रे होतो. एकंदरीतच ती संपन्नता पाहून मन विषण्ण झालं. किती ती अन्नाची नासाडी. प्लास्टिकचे ग्लास, visiting cards, fliers कचरा सगळा. लाईट!! कित्तीतरी लाईट वाया. By the way “Climate change and role of biotech industry” असं एक मोठ्ठं session ही conference वाल्यांनी cover केलं होतं; हे त्या conference नि त्या बिचाऱ्या conference चं दुर्दैव! भर उन्हाळ्यात असल्या conferences हव्यातच कशाला? इथे इतकी पाण्याची, लाईटची बोंब असताना; कशाला दुष्काळात तेरावा महिना! माझे हे उद्वेग फक्त या particular conference पुरते मर्यादित नसून ते सगळीकडेच apply होतील! उदाहरणच द्यायचं झालं तर आताची कोपनहेगन परिषद. परिषद झाली; गाजावाजा झाला; निष्पन्न काही नाही; कुठल्यातरी groupने म्हणे कोपनहेगन परिषदेमुळे global warming वर कसा लोड पडलाय यावर पेपर लिहायला घेतलाय!! Recently परत त्यात ऎन मे महिन्यात विदर्भ पक्षी मित्र संमेलन झालं! निदान conservationists ने तरी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. उधळपट्टी करायची असली तर मला पैसे द्या यार!! मी काहीतरी चांगलं तरी करेन!! ;-)

मी काही anti conference नाहीये; पण scientific community जर जगाचं future ठरवण्याचं काम करत असेल तर तिला हे सामान्य norms तरी माहिती असलेले बरे! Conference चा उद्देश काय? तर लोकं एकमेकांना भेटावीत; knowledge exchange व्हावं; नविन संशोधन व्हावं, एकंदरीत सगळाच आनंदी आनंद व्हावा! Well…हा सगळाच आनंदीआनंद करायला आपल्याकडे सध्या बरेच पर्याय उपलब्ध आहेत. उदा. Online conference. अशी एक नुकतीच झाली. प्रवास नाही; फुकटंचं चहा-पाणी, सोललेल्या कोंबड्या नि उकडलेले बटाटे नाहीत; बिअर, शॅम्पेन पार्ट्या नाहीत. घरी बसा, इतरांशी गप्पा मारा. झोपा, मजा करा. Contacts वाढवा. कुणावर भार नाही, काही नाही! आपलं कोण ऐकतंय म्हणा? आपण आपलं वरून ऒर्डर आली की पोस्टर प्रिंट करायचं नि conference संपली की, जमिनीवर आंथरूण आडवं व्हायचं. काय माहिती पण स्वत:च्या फ्लेक्सवर झोप चांगली लागते; मी इतरांचेही try केलेत…I guess, I can write a paper on it!


6.06.10     

गुरुवार, २० मे, २०१०

विचार

      Fine focusची एक रेघ पुढं सरकवली आणि microscope खाली slide प्रगट झाली. स्लाईडवरचा जीव जिवंत chick embryo. नुकताच अंड्यातून काढलेला. अंड्यातून direct स्लाईडवर. धडधडणारं हृद़्य. केविलवाणे, मोठाले डोळे. स्लाईडवर तो आडवा. मायक्रोस्कोपमधून माझा आडदांड डोळा त्याच्या शरीरावरून फिरणारा.
      काय नशीब असावं ना? आत्ता-आत्ता जन्म आणि आत्ता आत्ता…एका फेऱ्यातून वाचला बाबा! आई कोणंय माहिती नाही! कुणाचाच स्पर्श झाला नाही. झोपेतून उठलेलं बाळ. अनभिज्ञ, अजाण, कोवळं… अंड्यातून direct स्लाईडवर. कोणत्याची biological systemला असं destroy करण्याचा अधिकारच नाहीये मुळात माणसाला! किती अवघड असतं हे…
      मायक्रोस्कोप स्टेजवर ते अजाण पिल्लू आणि binocular मधे माझे डोळे खुपसलेले…कुणीतरी धक्का दिला. गणेश होता. Classmate. Routine practicals. प्रत्येकाच्याच स्लाईडवर मरणारी पिल्लं, प्रत्येकाचेच डोळे मायक्रोस्कोपमधून त्यांच्यावर.
      “बघू तुझी स्लाईड?” तो.

      मी बाजूला झालो. Fine focusचा नॉब फिरवत तो म्हणाला, “हॅ! कुठं काय? Artefactय!” माझी स्लाईड बाजूला काढून त्यानं त्याची स्लाईड माऊंट केली. Focus केलं आणि तो त्या जीवाला पाहत राहिला.
      माझ्या स्लाईडवरचं पिल्लू मेलं होतं. हृद़्य बंद पडलं होतं. मेलं बिचारं. क्षणिक आयुष्य. मरणारच होतं.     ‘Artefact कुठून दिसली याला!’, मी विचार करू लागलो. ‘असेल बाबा!’ म्हणून त्याला तिथंच सोडलं!
      पाच-दहा मिनिटं गेली. तो बाजूला झाला. मी त्याचीच स्लाईड मायक्रोस्कोपमधे डोळा खुपसून पाहत राहिलो – कुठं काय?
      एवढा वेळ हा पोरगा Artefacts का पाहत बसला होता,याचंच कोडं सुटलं नाही. ढीगभर artefacts होत्या, त्याच्या स्लाईडवर.

०८.०९.०७

मंगळवार, ११ मे, २०१०

My my


   कित्तीतरी दिवसांपासून विचारांना खाद्य मिळालं नव्हतं. याला कारणं बरीच आहेत तशी, पण एक कारण जरा जास्तच ढोबळ वाटलं; ते म्हणजे आसपास विचारी माणसांची कमतरता! ती कशी निर्माण झाली, यालाही कारण बरीच आहेत; let’s not discuss it right now; पण जर गरज होतीच तर स्वत:च विचारी लोकांबरोबर का वेळ घालवला नाही? असा प्रश्न विचारू इच्छिणाऱ्या कित्तीतरी लोकांनी भुवया अगोदरच उंचावल्या असतील! असो.



   माझे तीन ब्लॉग्ज आहेत. माझ्या profileवर गेल्यावर ते लगेच दिसतात. मी सकाळी-सकाळी माझ्या PC (Personal computer) वर माझ्या google accountमधे जाऊन log in केल्यावर माझे picasa वरचे albums बघू शकतो; orkut किंवा facebook वरचं माझं account बघतो. Google buzz वर स्वत:ची मतं, लेखन, विचार मांडतो. आपण किती personalize करत जातो ना सर्व गोष्टी! माझं वेबपेज, माझा ब्लॉग, माझं account, माझा अल्बम, माझं कलेक्शन, माझा चष्मा, माझे कपडे, माझा deo, माझी hairgel, माझा ब्रॅण्ड, माझे प्रियजण, माझे आई-बाबा, माझा मोगरा, माझी जाई-जुई, माझा बगिचा, माझा बेंचमेट, माझे क्लासमेट, माझे टिचर्स; मी पाहिलेला वाघ, माझ्या स्वप्नातला गाव, आमची स्कूटर, माझं पुणं, माझा महाराष्ट्र, माझा भारत! माझं जग, माझ्या जगाभोवती गुंडाळलेला मी! मला उत्सुकता, माझ्या जगात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची आवक वाढवण्याची; त्यामुळे हा सारा खटाटोप?! ते मुळात माझ्यात आहेच; काय? हेच की, स्वत:च्या गोष्टींवर हक्क सांगणं; पण या अशा हक्क सांगण्याला या आभासी जगात मी निर्माण केलेल्या जगामुळे नि जागांमुळे प्रोत्साहन तर मिळत नाहीये ना?! अशी एक वेळ येण्याची शक्यता आहे की, personalize हा शब्दही personalize करू वाटेल, आपल्याला…(सध्यातरी वेबसाईटस़् personalize झालेल्या आहेतच!)

   गोष्टींवर स्वत:चा हक्क सांगण्याचा मुद्दा पटत नाही, असे नाही, ते साहजिकच आहे! वाघही त्याच्या प्रदेशासाठी, खाद्यासाठी लढतोच की! पण त्याच्यासाठी प्रश्न जगण्या-मरण्याचा असतो; आपल्यासाठी तो तितका गांभीर्याने घेता येण्यासारखा नक्कीच नसला पाहिजे; या प्रश्नाचे implications मात्र कितपत गहिरे होतील; हे ज्याच्या-त्याच्या prioritiesनुसार बदलत असले पाहिजे! लहानपणी हीच स्वत:ची गोष्ट, “माझी स्वत:चीssय!!” असं नविन आणलेलं खेळणं, बाहुली कवटाळत बसलेले तुम्ही, असं चित्र येतं का डोळ्यांसमोर? Well…मी बाहुली काही खेळायचो नाही (त्यावेळी ते वय नव्हतं!!:-०), मात्र G.I.Joe ची माणसं मात्र खेळायचो! मग आम्हा दोन मित्रांकडे एकच Quick-kick (G.I.Joe मधले एक पात्र) असला तरी माझा Quick-kick तुझ्यापेक्षा किती वेगळा आहे, हे दाखवण्याची चढाओढ असायचीच असायची! निर्जीव वस्तूंसाठी एकवेळ हे मान्य करता येईल; पण सजीव वस्तूंसाठीतरी (यात देश-प्रदेश पण आला; कारण ती फक्त जमीन नसते!!) ही चढाओढ नको! विषय जरा भरकटला…पण हरकत नाही; हे सारं बोलायला तर मिळालं मला!

  खरं तर discussion सुरू झालं ते ‘मेळघाटला वाघांचे फोटोज मिळाले नाहीत’ या विषयावरून…नि ते वळलं, ते photography करताना मी मुकलेल्या क्षणांवर. मी कॅमेऱ्याच्या view finder मधे डोळा घालून कितीतरीदा समोर जिवंत दिसणारी गोष्ट digitally का पाहतो? हे असे मौल्यवान क्षण का वाया घालवतो? हे समोर आलेले काही प्रश्न. यांचं मूळ कुठंय तर, जोपर्यंत मी फोटोज दाखवणार नाही, तोपर्यंत लोकांना पटणार नाही की, मी वाघ पाहिला हे! याचाच अर्थ स्वत:चं photos collection वाढवण्यासाठी हा खटाटोप! Well…इतकं साधं-सोप्पं नसेल…पण मग wildlife photography ही photography as an art राहण्यापेक्षा ती timing आणि distance या दोन गोष्टी विचारात घेऊन skillfully वापरलेली technique राहते फक्त! आणि असेही नाही की, मी वाघाचा फोटो काढून अख्ख्या जगाला जगबुडीपासून वाचवलं!! एकंदरीत काय, मी मेळघाटात वाघ बघितला नि फार खटाटोप करून का होईना, त्याचा फोटो मिळवला! व्वा, काय शौर्य!! याचा अर्थ photography करण्यात काही अर्थच नाही, असा नाही होत…याचा अर्थ असा होतो की, स्वत:च्या मेळघाटच्या tripच्या photos चा स्वत:चा album करण्यापेक्षा, आणि तो इतरांना दाखवून ही माझी मेळघाटची trip असं सांगण्यापेक्षा, अनुभव share करा! अनुभव हा काही capture करता येत नसतो! आणि तो मनात साठवताना, कोणत्या प्राण्याला किंवा वस्तूला इजा पोहोचत नाही आणि स्वत:ची व्यवस्थित जाहिरातही होते!

( हे असलं लिखान exclusively पंकज कोपर्डेच्या म्हणजे फक्त माझ्याच ब्लॉगवर सापडेल!)

11.05.2010             

गुरुवार, ६ मे, २०१०

शून्य

ठरवलेलं असं काही आयुष्याच्या सुरूवातीला, किती खितपत तो चाललाय प्रवास
ज्याच्यासाठी घडलो नाही, त्याच्यासाठी जीव टाकत-धडपडत तो चाललाय प्रवास
ध्येयं नावाचे पतंग हवेत भिरकावयाचे असतात का? ते काटले जातात का?
एका शून्याकडून दुसऱ्या शून्याकडे, किती अभिमानाने तो चाललाय प्रवास!

०६.०५.२०१०

रविवार, २ मे, २०१०

गडगडाट

   दुपारीच गडगडू लागलं. झोपेतून उठलो; तसं आभाळ सोनेरी झालं होतं. गार वारा वाहत होता; झाडं त्यावर डोलत होती. मी खिडकीत उभा राहून एकटक तो सोहळा पाहत राहिलो…कुठेतरी पाऊस झाला होता नक्की. कुठे? इथेही झाला असेल. ओलेपणाचा एक विलक्षण गंध सर्वत्र भरून उरला होता. सुटसुटीत वाऱ्यावर डुलणारं पिवळं गवत; कुठेतरी काड्या-काड्या एकत्र बांधल्यासारखं वाटत होतं. डुलत होतं. मी डोळे चोळले. खिडकीतच अडकवलेल्या आरशात डोळे खोलवर पाहून घेतले. नुकताच एका असंबध्द स्वप्नातून उठलो होतो. खराच जागा झालोय ना; हे तपासून घेतलं. वातावरण छानच जमलं होतं. अशा वातावरणात ऐकलेली गाणी किंवा केलेली कुठलीही गोष्ट मनात आतवर कुठेतरी उमटत जाते…वातावरणच इतकं गडद असतं. हलकं, सहज वाऱ्यावर उडून जाईल असं काहीसं उरत नाही; सर्व काही बरसलेल्या थेंबांमुळे जडावलेलं नि विसावलेलं…
   मी खिडकी पुर्ण उघडून टेबल-खुर्चीवर बसलो. समोर लॅपटॉप. त्याला जवळ खेचून, स्क्रीन पुरेशी वाकवून मी माझं पुर्वीचं एक ललित त्यात टाईप करू लागलो…ते पुर्वीचं ललित आतमधे भिनू लागलं अक्षरश:! वाक्या-वाक्याचा अर्थ भिडू लागला हृद्याला! अशा गोष्टी सहसा होत नाहीत. एकदा लिखान झालं की, कागदावर साकारलेली कल्पना लेखकासाठी नवी रहात नाही. ती तशी जुनीही होत नाही; कारण एक कल्पना मांडताना तिचे इतर अब्जावधी भाऊ-बंध आपसूकच डोकावू लागलेले असतात. मग हे सगळं असं असताना, ते माझं पुर्वीचं लिखान माझं मलाच आतवर भिडू लागलं; याचं नवल वाटतं मला! त्यात मी भरही टाकली; याचंही आश्चर्य वाटलं. एकदा लिहीलं की संपलं; अशी माझी सवय; मग ते परिच्छेदापुरतं असू देत, नाहीतर मग लांबलचक वीसेक पानी कथा असू देत. ते जेवढं सुचलं – जसं सुचलं – तसं ते तितकंच – तेवढंच. जास्त नाही – कमी नाही. आता माझी ही सवय कितपत चूक – बरोबर हा वादाचाच मुद्दा आहे तसा; पण एक मात्र नक्की, एकदा का मी पानांवर शाई फरफटली की नंतर घडणाऱ्या चित्रात विचार करूनही मला मोठा असा काही बदल घडवता येत नाही. उगीच बारीक-सारीक वाक्यं, संवाद टाकू शकतो तेवढेच! पण या ललित लेखनात मी टाकलेली भर अगदी आपसूक, अल्लदपणे, कुठेही ताळतंत्र न सोडता हळूवार पडली. कुठेच आवाज झाला नाही. रूईच्या बिया जशा शांतपणे उडत उडत वारा थांबेल तिथे उतरतात ना; तशी!
हे बरंच झालं. संध्याकाळचे पाच वाजलेले. पावसाचा काही पत्ता नाही. वाटलं, कॅफेटेरियात जाऊन वाट बघत बसू; कधी येतोय त्याची. तसा कॅफेटेरियात गेलो. ललित लेखांची वही घेऊनच गेलो बरोबर. कॉफीच्या घोटागणिक एकेक लेख मी स्वत:शीच वाचत् राहिलो. लिखानाला एक अनोखा गंध असतो, चव असते, आवाज असतो. कित्तीतरी वर्णनं आजूबाजूच्या परिसराची असतात; पण हे गुपित केवळ लेखकालाच माहिती असतं. वाचणारे सगळेच, स्वत:च्याच कल्पनाशक्तीने त्या-त्या वर्णनांची स्थळे निर्माण करतात! या माझ्या लेखांमधे आयुष्यात डोकावणाऱ्या कित्येक व्यक्तींच्या गड्डद आठवणी आहेत; मी खरंच हे पुर्वी इतक्या बारकाईनं पुन:पुन्हा वाचलं नव्हतं!
   कॉफी संपली. सव्वासहा वाजून गेले. पाऊस आला नाही. मग म्हटलं, आता पुन्हा लॅपटॉपसमोर ठाण मांडावी नि उरलेलं टाईपिंग करत बसावं. रूमवर परतून ते काम तेवढं सुरू केलं…मी टाईपिंगमधे एवढा गुंग झालो की अंधार कधी झाला कळलंच नाही…लख़लख प्रकाश आणि मग प्रचंड गडगडाट, असाच सगळा खेळ सुरू झाला. हे सगळं भयावह नव्हतं वाटतं, ते सगळं हवंहवंसं वाटू लागलं होतं मला. माझ्या कामाला या वातावरणामुळे गती मिळाली; म्हणून असेल कदाचित. पावसात थोडाफार भिजत रात्रीचं जेवणही करून आलो नि पुन्हा लिहीत बसलो.
   कसलं हे पावसाचं वेड? रात्रीचे दोन वाजताहेत…मी खिडकीपाशी उभाय. हा अंधार नि ते वातावरण फिक्कट होऊ नये, असंच वाटतंय…डोळ्यांसमोरून झुडूपांत शिरलेला वाघ जोपर्यंत पुर्णत: नजरेआड होत नाही; तोपर्यंत त्याला अप्रूपाने पाहत रहावं…असं वाटतंय. पाऊस थांबलाय. अंधारात दूरवर एकट्याच उभ्या असलेल्या स्ट्रीट-लॅम्पच्या प्रकाशात पावसाची काहीच हालचाल दिसत नाहीये…गार वारा वाहतोय…पावसाने कित्तीतरी आवाजांना जन्म दिलाय, आजूबाजूला ‘हे सगळं वातावरण साठवून ठेवता आलं पाहिजे; म्हणजे हवं तेव्हा वापरता येईल’ असा एक स्वार्थी विचार जन्माला आलाय आणि प्रबळ होत चाललाय…
२.०५.२०१०

मंगळवार, २७ एप्रिल, २०१०

अंधार

अंधाराचं चित्र कुणी काढलंय का कधी? मला पहायचंय ते. अंधार कसा रेखाटला असेल त्या कलाकाराने? भविष्यातला अंधार, अंधारातलं भविष्य की भूतकाळ अंधाराचा अमर्याद गोळा बनून भविष्याकडे झेपावणारा! ओसाड अंधार, नि:शब्द अंधार, कोरडा अंधार, रखरखीत अंधार, क्रूर अंधार, निर्दय अंधार…कुजका अंधार. आयुष्य हरवलेली लोकं ल्यालेला अंधार!
अजून कसं असू शकतं हे चित्र? विज्ञान या प्रश्नाची लाखो उत्तरे शोधेल खरे…पण दृष्टीला बरे दिसेल ते चित्र खरे म्हणणारे सामान्य-जन आम्ही! आम्ही ते अंधाराचे चित्र पाहू; खरेच जाणकार असू तर म्हणू Brightness थोडा वाढवायला हवा…काहीच स्पष्ट दिसत नाहीये…ना काळ, ना चित्र, ना त्यातली लोकं, जनावरं, वस्तू आणि इतर जे काही रेखाटलंय ते!! यावरून आम्ही असे conclusion काढू की, कलाकाराला अंधार ही कल्पनाच मुळात स्पष्ट नसेल बहुधा…जर तसे नसते, तर अस्पष्ट असे चित्र त्याने घडवले नसते…किंवा मग सहज कल्पनेची बीजं पेरून कलाकार वेल कधी येईल या अपेक्षेने बसला असेल!!
मग या चित्राला काय गुण द्यावेत? द्यावेत की नाही? ‘अंधार’ नावाचं चित्र…गुण दिले काय किंवा नाही दिले काय, एवढा काय मोठा फरक पडणार आहे? गुणांच्या दृष्टीनेही अंधारच सगळा!
थोडे नीट निरखून पहाल, तर ते चित्र स्प्ष्ट होईल, मित्रांनो! त्या चित्रात अंधार ल्यालेली, अंधार गिळलेली लोकं दिसतील. त्यांचे रडवेले, उदास चेहरे दिसतील…स्पष्ट नाही होणार हे सर्व…मात्र ओठ, नाक, डोळ्यांवरून चेहऱ्यावरची उदासी मैलोऩ्मैल पसरलेली दिसेल! पाणी-पाणी करत आडवी झालेली अजाण बालके दिसतील…पाण्यासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या त्यांच्या ओठ सुजलेल्या नागड्या आया दिसतील…रडणाऱ्या त्या अंधारात, लंगडणाऱ्या तरसांचं हसू ऐकू येईल! पाण्यानं सुकून मरू लागलेल्या एखाद्या बच्च्याचा पाय गिधाडांच्या गर्दीतून दिसू लागेल. पाण्याच्या थेंबासाठी पोटात चाकू भोसकणारे दोन तरूण रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात दिसतील! अंधारात चाचपडणारी एखादी म्हातारी दिसेल नि तिचं इमानदार कुत्रं तिच्या पाठीमागे शेपूट हलवत उभं दिसेल! ती नेहमीची ओळखीची गल्ली भयाण दिसेल, रक्ताच्या गटारी दुथडी भरून वाहत असलेल्या दिसतील; एखादा संशोधक रक्तातून पाणी वेगळं करून वापरण्याच्या प्रयोगासाठी त्या गटारींतून रक्त भरून नेताना दिसेल…ओंजळभरून रक्त पिणारेही कित्येक लोक दिसतील!
दररोजचा ओळखीचा वाटणारा अंधार इतका भयाण होऊन समोर उभा ठाकेल याचं भविष्यही वर्तू न शकलेला तो कलाकारही, हा काळोख पाहून, त्या विचारांनीच दडपून चित्राच्या शेवटी शांत मेलेला दिसेल…अगदी शांत, अजिबात गोंधळ न करता, हातातला कॅनवास, हाताशी प्रामाणिकपणे पकडून…चित्रावर त्याची कुठेच सही दिसणार नाही…स्वत:च शव चित्रावर झोपवलं, यापेक्षा काय अधिक काय हवं, चित्राचे अधिकार बाळगायला…म्हणूनच मी विचारतोय, अंधाराचं चित्र कुणी काढलंय का या चित्रकाराव्यतिरिक्त? मला पहायचंय ते, अंधार कसा रेखाटला असेल त्या कलाकाराने??                            २६.०४.१०            

शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

फांदीवरचे निवांत पक्षी उठले ,
आकाशात काळे ठिपके.
ढगाळ गर्दीत धक्काबुक्क्की
हरवले काळे ठिपके...

‘ती’ ही सखी गेली,
रात्री, तू ही निघ बिगीबिगी...
तोडत रहा दोघी मनसोक्त
उरले-सुरले माझे लचके!

बुधवार, ७ एप्रिल, २०१०

चिंगीच्या पुढ्यात...

चिंगीच्या पुढ्यात तळ्याकाठची मुंगी! हलत नाही, चालत नाही…शीss बाई, काहीच करत नाही! तळ्याकाठी बसलाय एक हत्तोबा, कोठारभर जेवण करून झालाय त्याचा पोटोबा! हलत नाही, चालत नाही…शीss बंबच आहे मुळी! तळ्यात पोहताहेत बदकांची पिल्लं, कुणी काळं-कुणी गोरं, गोल गोल चकरा मारतात, एकमेकांना येऊन धडकतात…तोच-तोच खेळ पुन्हा पुन्हा खेळतात, त्याशिवाय काही नाही..शीss बाई, कसली मॅड आहेत, झालं! तळ्याचं पाणी निळंशार, त्यातली बेडकं हिरवीगार, चिंगीकडे पाहून करतात डराव-डराव, पण याव्यतिरिक्त त्यांच्याकडे शब्दच नाहीत! चिंगी बघते ती निळी फुले, आकाशाचे तुकडे कापून झाडावर लावलेले, नि असा येतो गार वारा…शीss बाई पुढे काही होत नाही…
चिंगीच्या स्वप्नात तळ्याकाठचा वाघोबा, गुहेत असतो झोपलेला, घोरतो फार, खुर्रर्र, खुर्रर्र, गुरगुरतो मात्र कुठला?? चिंगी असते बिचकून त्याला, आईने सांगितलंय उठवू नको त्याला, उठला की तो डरकाळी फोडेल नि क्षणात तुला गट्टम करेल! चिंगी असते बिचकून त्याला, पण जायचंय एकदा भेटायला त्याला…त्याचा काय तो रंग, काय ती शेपूट, कसले डोळेsss, कसले काssन, कसले दाssत…नि कसले पाssय!! चिंगीच्या स्वप्नात वाघोबाला मन! मनातून वाघोबा चिंगीचा आजोबा! “ये ना, ये ना” म्हणतो नि दाढी खाजवत बसतो, कुणी त्याच्याकडे जात नाही; लडदू हत्ती बोलत नाही, नि ढिम्म मुंगी हलत नाही…निळी फुलं वाऱ्यावर डोलतात, तळ्याचं पाणी थरथरतं, तळ्यातलं आभाळ वर-खाली होतं, बदकाची पिल्लं नुसत्या चकरा मारत राहतात…

चिंगीच्या स्वप्नात तळ्याकाठचा गाव, गावतल्या माळात हरणांची जोडी, जोडीच्यामधे हरिणीचं पिल्लू, आईला बिलगतं, गवत खातं, नाक फेंदारतं…बस्स! इतकंच करतं!! शीss, बाकी काहीच नाही…गवताची पाती हिरवीगार, भरल्या उन्हात चमकतात फार…उनही पडतं ते सोनसळी, भाजत नाही, चटका नाही, असलं कसलं बाई हे!! शीss, काही मज्जाच नाही…

चिंगीच्या घरात कित्ती आक्रोड खातात लोकं, इतके चविष्ट नि मोठ्ठे की एक खातानाच भरतं पोट तिचं…शीss बाई, मग काही मजाच नाही! चिंगीच्या आयुष्यात एक वडाचं झाड, वडाच्या ढोलीत तिच्या घराचा थाट, झोपायला कॉट नि जेवायला ताट!!

चिंगीच्या पुढ्यात तळ्याकाठची मुंगी! चावी दिली की कुई कुई करते, चावी बंद् की मग हलत नाही, चालत नाही…शीss बाई, माझ्याशी कुणी खेळतच नाही!!

शुक्रवार, २ एप्रिल, २०१०

सुरूवात

उध्दवस्त घर. मोजकेच श्वास उरलेले. पहिल्या पावसाने मात्र धुळीत काही अंकुर फुललेले. पाचही भिंती ढासळल्या; चारही दिशांनी घर नागडे. उत्तरेकडली एक भिंत तेवढी अर्धी-मुर्धी उभी. गुलाबीसर रंग फिकटसा; त्यावर पहिल्या पावसाचा फवारा. तिच्या डोळ्यांतल्या अश्रूधारा गुलाबी गालांवरून अंकुरांकडे चाललेल्या. त्या भिंतीचं नाव “सखी”…कारण आजूबाजूस कुणीच नसताना ती एकटीच माझ्यासाठी उरलेली! सखीच्या मनावर एक गडद केशरी हाताचा तळवा. माझं नि प्रियेचं लग्न झालं; त्यादिवशीचा उमटलेला…पहिल्या पावसाने अजूनही त्याचा रंग नाही ढळलेला.

या गावात आता कुणीच राहत नाही. बोलायला, लिहायला, वाचायला, गायला, जगायला माणसं नाहीत. रात्री लांडगे फिरतात…वाघाची कमजोर डरकाळी येते ऐकू…माझ्या शेकोटीशेजारी मी रग घेतो अंगावर ओढून! जिवंत असूनही मेल्यासारखा झोपतो. आता तर हे सोंग, सोंग उरलंच नाहीये!


इथे आलो तेव्हा होतं तरी काय? जंगल…बाकी काही नाही. मग मी एक वीट आणली…मनात जिद्द होती; अंगात बळ होतं; सोबत “ती”ही होती! घर वसवलं-रंगवलं! घरासारखं घर केलं. माझं पाहून इतरही आले. चला, गावच वसवू म्हटले. “हो” ला “हो” केलं आणि टुमदार गावही वसवलं…त्याचं काही दिवसांपुर्वीच पाणी-पाणी झालं! दुष्काळ पडला…युध्द झालं…नको-नको ते घडलं! असंच मरण येण्यापेक्षा; लोकांनी स्वत:च स्वत:ला संपवलं. मी सांगत राहिलो – “वारा थांबेल वहायचा कधीतरी; जरी आज झोंबतोय अंगाला! वादळ येईल अशी भिती का बाळगताहात; भित्र्यांनो! सूर्यही थंड होईल…जळून नष्ट करेल सगळं, हा विचारच का मुळात! मित्रांनो, बासरी वाजवा ना…गाणं गा…कविता म्हणा…घाबरू नका मात्र!” मात्र कुणीच ऐकलं नाही.

सारेच मेले. “ती” ही गेली. तेवढी एकच भिंत नि तेवढा हात सोडून गेली. उरलेल्या धान्याचे मी अंकूर घडवलेत…त्यातून उगवेल अजून धान्य; मग मोठीमोठी शेतं होतील तयार! घर बांधू लागेन परत…सुरूवात केलीय तशी मी…ही गुलाबी फिकट भिंत नि हा हाताचा ठसा…हे काय! सुरूवात केलीय मी!

बुधवार, २४ मार्च, २०१०

नीलमोहोर


रणरण उन्हात सुर्य कपाळावर आला की एक फुलपाखरू बाहेर पडतं....इतका वेळ ते नील-मोहरातच दडून बसलेलं असतं...ते कसंय माहितीय? जांभळसर हिरवं, गुलाबीसर निळं! मी मख्खासारखा म्हशीवर बसून म्हैस जाईल तिथं हिंडत राहतो; डोळ्यासमोरचा तो नील-मोहोर आणि त्याच्या मखमली जांभळ्या सड्यावरून तिची नाजूक गुलाबी पाऊले हळूवार पडू लागली की माझ्या मनात फुलणारा गुलमोहोर; हे दोघेही कधीकाळी पुन्हा विभक्त न होण्यासाठीच जन्माला आलेत असा प्रश्न मला पडतो. म्हैस मात्र तेवढ्यात उन्हाची काहिली शमविण्यासाठी आरामात चिखलात घुसते; तिच्या पाठीवरचा मी ही आपसूक...

मंगळवार, २३ मार्च, २०१०

Network


शक्य आहे ही वेदना;  ती जाणवणे आणि भोगणे; दोन्ही अशक्य! आज अचानक मला या गोष्टीचा साक्षात्कार झाला; तसं पुर्वीही बऱ्याचवेळा वाटून गेले; पण बोध झाला नाही! आज बोध झाला. एवढ्या मोठ्या जगात हा मी इतकुसा! जग काय घेऊन बसलात? ब्रम्हांड! ब्रम्हांडात मी इतकुसा! जगातल्या सर्वात शक्तिमान भिंगातून पाहिलं तरी दिसणार नाही; इतकुसा! आणि माझं जग! माझ्या जगाचं काय? माझं ते इवलुसं जग… “आम्ही दोघे, आमचे दोघे; आई-वडिल, मामा-मावशी, भाऊ-बहिण आणि इतर. माझी नोकरीची जागा. माझं घर. माझं वाहन. माझे कपडे-कपाट-बॅंक-क्लिनीक-मित्र-मैत्रिणी-favourite hotel- outingची ठिकाणं-काय-काय नि काय-काय? जन्मल्यापासून हे जाळं मी विणत राहिलो; लोकांशी भेटलो की, वाढवत राहिलो…माझ्या ओळखीच्या सर्वच लोकांची अशी स्वतंत्र जाळी; अशी शेकडो-हजारो-करोडो-अब्जावधी-परार्ध आणि जास्तच जाळी…या सर्व जंजाळाच केद्र-बिंदू “मी”!!

जाळ्यांचा कुठला बिंदू कुठे खपेल आणि कुठे वाढेल? याचा काय थांग! आणि असे जर झाले; तर माझे केंद्र ढळणार तर नाही ना…याचा तरी काय थांग!!

रविवार, १० जानेवारी, २०१०

चार थेंब


अंगावरून झुळझुळतं रेशीम हळूवार ओढत न्यावं आणि भुर्र…भुर्र…करत ते वाऱ्यावर असंच सहज, फुंकर मारत पसरून द्यावं…पुन्हा ते उडून जातंय म्हणून आधाशी डोळ्यांनी, हुरहुरल्या मनाने दूर जाईपर्यंत पाहत रहावं…पाहत रहावं…

काही दिवस जातात असेच, दररोज सकाळी दात घासत असल्यासारखे…ठरवल्यासारखे…आणि मग संगणकासमोर बसून कंटाळलेला जीव म्हणतो, “चल काड्या करू…” स्वत:च ठरवलेल्या स्वत:च्याच परिघात एक सहज फेरी मारू! तो कुठेतरी गडावर किंवा जवळपासच्या गर्दीने किचडलेल्या चौपाटीवर जीव रमवण्याची साधनं शोधत फिरतो…दिवस संपतो, तसा तोही internet वरल्या web album मधे photos post करून झोपी जातो…पुढे आठवडाभर त्याचे तसलेच सगळे संगणकाभोवती वायरींसारखे गुंडाळले गेलेले मित्र… “अरे वा! भारी! मस्त! कुठे गेला होतास? Nice…” वगैरे वगैरे comments टाकून मोकळे होतात…तो ही थोडा खुश होतो, स्वत:च्याच नादात थोडावेळ रम-माण होतो! आणि मग परत ते दात घासण्याचं रूटीन वगैरे.

“हवा थोडी वाहते गं गोड…संथ चालतात आणि ढग…कधी-मधी पिसाळल्यासारखे आणि कधी अगदीच डंबांसारखे माठ होऊन उघडे-बंब…हिरवाई अशी नटून रूसून बसलेल्या अगदीच तुझ्यासारखी…आणि तू अगदीच काळ्याभोर कोसळायला पुरेपूर तय्यार माझ्यासारखी!” असली रचना कुठून जन्माला येते, ते त्या लिहीणाऱ्या हातांना माहिती की संगणकाभोवती गुंडाळलेल्या मनाला माहिती…कुणास ठाऊक?

काही दिवस असेच जातात, संगणकाभोवती गुंडाळल्यासारखे, चष्म्याच्या काचेवर उठणाऱ्या क्लिष्ट रंगांसारखे आणि चष्म्याआड अडकलेल्या थकलेल्या, भागलेल्या, खोबणीत लपून बसलेल्या डोळ्यांसारखे! तेही ठरवलेल्या थिअटरात एखाद्या वीकेण्ड्ला खपतात!!

आकाशात चार थेंब दाटून येतात यार, आज-काल…पाऊस काही पडत नाही; ठरवलं आहे बरंच काही, मनाप्रमाणे होत नाही! जपून-जपून वापरले तरी थोड्या दिवसांचं सोबती…चार थेंब संपत आले आणि मनाचं मनाला मनच सांगत नाही! घुटमळतं, घोटाळतं, पदर पकडून हट़्टही करतं…जिच्याकडे हट़्ट करतं, तिच्याकडेच दाणा नाही. माठात उरलेले चार थेंब अशेच संपतात, काही-काही दिवसांनी…त्याची आई कधीतरी नसतानाही रडून आणि दिवसापाठी साठलेले थेंब एकाग्रतेने गोळा करून माठात ठेवते भरून…मुलाला कसलाच पत्ता नाही!

आयुष्य चाललंय कुठे…संगणकाला चिकटलेल्या मनाला कसलीच सुतराम कल्पना नाही!