सोमवार, १३ जून, २०११

काहीतरी


   काहीतरी कमीय असं नेहमीच वाटतं; पण ते काय अजून कळलं नाही. “भाजीत मीठ कमीय गं” हे वाक्य कितीदा तरी कानांवर पडलं; पण ते मीठ काही कमी पडायचं थांबलं नाही! मला सतावण्यासाठी नि माझे तेच तेच शब्द पुन:पुन्हा ऐकण्यासाठी तिचे हात शांतपणे सतत तेच करत राहिले…सवय झालीय का आता?
   हा प्रश्न भयंकर आहे. हृद़्यात कळ मारावी; इतपत! सवय झालीय का? तिच्या हातांना मीठ कमी टाकण्याची की मला ते अन्न तसंच ग्रहण करण्याची!! आता चवीतही काही रस उरला नाही? असं म्हणावं का? माणसांना एकमेकांची सवय झाली की काय होतं पुढे? प्रयोग करून पाहण्यासारखा आहे…आहे; पण तो सुरू आहे का? हेच कळत नाहीये! सवय झाली असेल तर नाविन्य नाही; नाविन्य नसेल तर कुतूहल नाही; कुतूहल नसेल तर गोष्टी नजरेआड होतात. सवय लागते. आमच्या अपार्टमेंटच्या बाहेर सदाफुलीचं झाड नि शेजारीच एक मनीप्लांट; या दोहोंवर उडणारा शिंजीर. दिसतो न दिसतो; सकाळी दारातून बाहेर पडलं की नजर जातेच तिथे; कारण तो दिसतोच असं नाही ना! शोधावं लागतं त्याला! तो सवय लावू देत नाही…
   तिची सवय झाली; म्हणजे मग सगळ्याच गोष्टींची सवय झालीय की काय? हा दुसरा प्रश्न अजूनच भयंकर नाही का? एकापाठोपाठ एक वेस उपटत जावी; तसंय हे! उरणारा कोवळा-लुसलुशीत प्रेम नावाचा गाभा कितपत संरक्षित राहणार आता?