बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

तिशीचे तत्त्वज्ञान

मागच्या काही दिवसांपासून मी माझ्या आयुष्याबद्ल, वयाबद्दल, जगण्याच्या पद्धतीबद्दल, चुकांबद्दल, आणि एवढ्या वर्षांत पक्व झालेल्या विचारांबद्दल विचार करतोय. याला निमित्त एकच आहे ते म्हणजे मी नावाच्या या पोरकट कथेला आज तीस वर्षं पुर्ण होत आहेत. तीस वर्षं! केवढा हा काळ! कदाचित आज मी जे लिहीतोय ते कित्येकांना त्यांच्या-त्यांच्या तिशीत वाटलं असेल-नसेल; काहींना प्रकर्षानं जाणवलं असेल; काहींनी शब्द-बध्दही केलं असेल. मला माहितीय त्यांचं शेवटचं वाक्य असेल - सरतेशेवटी आपणच आपल्या आयुष्यात मुर्ख ठरलो!

येणारे येत गेले, गाणारे गात गेले, जाणारे जात राहिले. आपण वर्णभेद केला, जातीभेद केला, धर्मभेद केला; देवापुढे टाळ्या वाजवल्या, नाच-गाणी केली, ठिक-ठिकाणी डोकं टेकवलं; जोरजोरात फटाके फोडले, मुर्खागत सण साजरे केले; लाळघोटेपणा केला, छेडछाड केली, नसली तरी विकृत विचारांनी शरीरांना स्पर्शलं-उपभोगलं; स्त्रीवादाच्या गर्जना केल्या; शाळेत, कॉलेजात, मनात राजकारण खेळलो; आणि बरंच काही छोटं-मोठं जे जगाच्या डोळ्यांत, आज, माझ्या स्वत:च्या डोळ्यांत खुपलं असतं असं बरंच-बरंच सारं काही केलं. छोट्या-मोठ्या चोऱ्या केल्या, अधनं-मधनं फसवा-फसवी केली, आणि असं बरंच काही. हो केलं हे सगळं! मान्य आहे. हे ही केलं! सगळं-सगळं मान्यही केलं! पुढे हे घडेल की नाही याची स्वत:ला हमी देण्याची हिम्मत तेवढी होत नाही. कशी होईल? जगाच्या चक्रात एक नाहीतर दोन-तीन गोष्टी होतीलच हातून, वाटत राहतं. आपण आपल्या आयुष्याच्या सोयीस्कर फाका करून घेतल्या. मनात ठरवलेल्या वेळेच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचेपर्यंत दमछाक केली नि हात-पाय कसेबसे ताणत त्या-त्या रेषा स्पर्शल्या. ‘केलं हे एकदाचंअशा आवेशात उभे राहिलो तेव्हा सारं जग गालांत हसताना दिसलं. मग आपणही हसत वेळ मारून नेली नि मनावर चाकूने एकेक रेघोटी ओढत गेलोच! मनावरच्या रेघोट्या शरीरावर ठिकठिकाणी उमटल्या नि त्यावर मग आपण आयुर्वेदीक औषधांचे लेप लावत गेलो. ते लेप लावणारे हातही बदलत राहिले एवढी वर्षं, जखमा अजूनही पोरक्या. वेळेप्रमाणे, वयाप्रमाणे गृहस्थाश्रमाकडे पावलं वळवली, पण वानप्रस्थाच्या वाटा खुणावत राहिल्या. कधी थांबून मागे वळून पाहिलं तर ती एक ओळखीची परतीची वाटही खुणावत राहिली. पाय उलटे वळवले तर पडून शरीराचा पाचोळा होणार हे ही जाणवलं जेव्हा पळायचा आव आणला; आयुष्याला नाही म्हटलं तरी गती असते याची जाणीव पदोपदी होत राहिली.
       



आता मागे वळून बघताना, निदान थोडे-थोडेके जे निबंध, पत्रं, -संदेश, -मेल्स इत्यादींचा पसारा उचकल्यास दिसतात या सर्व गोष्टींचे तुकडे. उरल्या-सुरल्या, अर्धमेल्या, केविलवाण्या प्रेमाचे तुकडे लाकडाच्या शेकोटीपुढे उडणाऱ्या काळ्या कपट्यांसारखे आणि अशा थंडीतही तिचे गुलाबी ऊबदार हात माझ्या केसांमधे फिरणारे! मन खिन्न होऊन जातं. हे सर्व काही केलं आणि आज या सर्वं आठवणींचं ओझं घेऊन जगायची शिक्षाही मिळतीय. हे जाणवून अजूनच दु:. जगानं त्याच्या-त्याच्या तत्त्वज्ञानानं आपल्याला वेड्यात काढलं. आपल्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे आपल्या आयुष्याची थोड्याफार फरकाने वाट लावली. जिथे थोडी लावली ती भेग आपण मजा म्हणून फाकवत गेलो नि आता पडलेल्या भगदाडातून एक पाय तिकडे, एक इकडे अशी अवघडल्यासारखी अवस्था करून बसलोय.

आपण किती मनं दुखवली, किती थोडक्यांना आपण सुख देऊ शकलो? दु:खाचं पारडं जडच होतं दरवेळेस. एका व्यक्तीला सुख दिलं की दुसरी दुखावते आणि आपल्या मनाचा पावा आपणच वाजवत फिरतो गल्लीभर. त्यातून रडक्या मनाचे सूरही इतके मधुर की कळतंच नाही कुणाला की याला जखम झालीय खोलवर. वाजतोय पावा गोड, हसतंय जग, रडतंय मन! मग किती मनं दुखावली? एक स्वत:चं आणि अनेकशी दुसऱ्यांची! या सर्व गोष्टींमध्ये किती वर्षं वाया घालवली, किती घालवणार पुढे? भगदाडात पाय एक पाय इकडे-तिकडे, हातात पावा, मनात जखम, मेंदूत गोंधळ! या सर्वांत पैसा आला परत

जेव्हा कळलं की पैसाच सर्वश्रेष्ठ तेव्हा आयुष्याची गणितं एका चुटकीत बदलून गेली! तेव्हा शिक्षणाचा अर्थ बदलला, जगण्याचं समीकरण बदलंल! मध्यम-वर्गीय प्रवाहात एका झटक्यात कुणीतरी उचलून फेकून दिलं आणि तेव्हापासून उलटं पोहून पोहून स्वत:ची कातडी सोलवटली, कोपरं-ढोपरं फुटली, पण अजून कुणी सोबतीला भेटलं नाही, एखादी नावही दिसत नाही टप्प्यात कधी, काठावर जाण्यात नाही अर्थ!       

स्वत:च्या पाच-पाच वर्षांमागच्या छब्या तयार करून रात्रीत पावसात उभ्या करून कल्पनेतच त्यांचे हावभाव बघून आलो. एकाहून एक मुर्ख लेकाचे. स्वत्वाचा पत्ता नाही, स्वाभिमान सोयीस्कररित्या उफाळणारा, जगाची कल्पना नाही, जगण्याची आस नाही, हाती कौशल्य नाही, मनात कसली आग नाही. हे सगळं नाही तर नाहीच, पण मनाला स्थेर्यही नाही. वजनाने झुकलेल्या गाडीसारखी यांची मनं. आपण तारे होऊन चमकलो नाही, निदान काळं आकाश व्हावं पोकळ नि अथांग, तर तसंही नाही! हे सर्वं घडलं आणि एवढ्या उशीरा जाणवलं. माणूस हा खरंच इतका मुर्ख प्राणी आहे का?

हसू येतंय मला. खरंचभगदाड!!! कुणाकडे बोट दाखवावं की यांनी गंडवलं मला म्हणून? सरतेशेवटी आपणच आपल्या आयुष्यात मुर्ख ठरलो!
- पंकज
२४ नोव्हेंबर २०१७, दौंड