शनिवार, १५ मार्च, २०१४

एकांत


एकाचा अंत. किनाऱ्यावर चालणारे असंख्य पाय नि त्यातही वेगळीच उमटलेली एक ओळ. तिला तुडवून गेलेले कित्येक गोरे-काळे तळवे नि आजूबाजूला पसरलेली वाळू. त्यात रांगणारे खेकडे. चिखल चाळणारे नि किडे खाणारे. मला आता रस नाही. वाट एकटी नि माणूस एकटा. गाठ पडली तरी नकोय नि गाठ पडलेली पण नकोय. छातीत खोलवर घुसलेला सुरा अगदी आतून पाठीपर्यंत टेकलेला. त्यावर आता रक्तवाहिन्यांचं किती जंजाळ पसरलंय, देवच जाणे. पडक्या-उघड्या देवळांवर वेली चढतात न जंगलात. आणि जगतात ना. जगतात ना…निवांत का कसं ते!
खरं तर एकांतात मजा आहे की कसं, ते कळत नाही, मैत्रिणी.
एक तो समुद्र एकटा नि उगाच अवास्तव वाढलेला. एक ते आभाळ एकटं नि उगाच अवास्तव वाढलेलं. मग आपणही वाढवावा आपला विस्तार…की कसं? सगळं जगच घ्यावं व्यापून नि ठरवावं की हेच अखंड…मग कुठून येतील वाटा नि कुठल्या पडतील गाठी? उदाहरणच द़्यायचं झालं तर वेळेकडं पहावं. तो एक माणूस समुद्र नि आकाशापलीकडचा. थोर. अखंड, अथांग नि पसरत चाललेला अगणित. त्याचे तुकडे वाटतात लोक, आयुष्यांसाठी, आयुष्यांतून. नि मग बसतात उगाच रडत किंवा हसत. एकांताला गहिरा अर्थ आहे. मी ज्या-ज्यावेळी समुद्राकडे पाहतो, तेव्हा मनात लाटा सुरू होतात. येतात-जातात, माती घेऊन जातात, कचरा घेऊन येतात. मनाचं क्षरण सुरू होतं नि समुद्राला मी शरण येतो. हे आपसूकच घडतं. मी कधी एकांतात रमेन का? स्वत:ला तेवढा अवाढव्य बनवू शकेन का? नाही वाटत…पण करावं वाटतं. जो हे करू शकेल तो जग जिंकला. स्वत:ला इतकं मोठं करावं की जग व्यापून घ्यावं. माझा फुगा कितपत फुगेल, नाही माहिती. फुगला जास्त तर फुटेल याची भिती मात्र जास्तंय.
मला जिवांचा संग हवाय, निर्जीव वस्तूंचा हवाय नि माझ्या मनाचा हवाय. जीव कसा जोडू मी दुसऱ्या जिवाबरोबर? प्रश्न अवघडंय पण आहे! गाठी मारून सोडल्या तर त्रास…सोडताना तुटल्या तर अजून त्रास. माझी वाट कुणी तुडवली तर त्रास, नाही तुडवली तर अजून त्रास! निर्जीव वस्तूंचा संग हवा तेवढा उपभोगता येईल; पण मनाचं काय? तेच नसलं तर कसचं काय?
डोळे मिटून घ्यावेत नि विलीन व्हावं अंधारात. मी प्रयत्न केला फार, पण जमलं नाही कधीच. देवळं शोधली, प्रसन्न गाभारे शोधले, ध्यान-धारणेची स्थळं शोधली नि उरलो अख्खा मी. पाच फुट सहा इंच. नुसतं सांगून उपयोग नाही, मनाला वाटलं, पाहिजे एकांत. स्वत:वरतीच विश्वास नाही, तर पसरणार कसा मी आभाळभर नि होणार एकसंध!
हिशोब आहे माझ्याकडे वेळेच्या तुकड्यांचा, नि मिळालेलं प्रेम मी जपून ठेवलंय बंद एका लिफाफ्यात. वाटतं ते उडून जाऊ नये, घाबरतो मी. जीवच गुंतून बसलाय त्यात की सुटणार नाही, झालंच तर तुटेल ती गाठ. आणि अशा कित्येक गाठी गच्च बांधून ठेवल्यात मी वस्तूंशी, माणसांशी नि स्वत:शी. कशी मिळेल मुक्ती? कसा मिळेल एकांत?
मी तुडवल्यात कित्तीतरी वाटा नि उघडल्यात कित्येक समाध्या. जगावं मी ही बहुधा इतर जगतात तसं…जगण्यासाठी.
वेळेला नमस्कार.
पंकज कोपर्डे
८ सप्टेंबर २०१३

गुरुवार, १३ मार्च, २०१४

मोरपंखी


तिच्या-माझ्या आठवणी, कपाट उघडलं की अंगावर पडतात. मी अगदीच त्यांत गुदमरून जातो. मरून जातो. तिच्या कुर्त्या, तिचा वास. नदीकाठी वाळूवर उमटलेली तिची नाजूक पावले आणि जांभळं होत चाललेलं आभाळ…रातव्याचा एकसंध-निर्दोष आवाज नि तिनं माझा धरलेला हात…दूरवर डोंगरावर वणवा पेटलेला नि थंडीचे दिवस त्यात. तिच्या आठवणी वेचून कुणीतरी डोंगरभर पसरून ठेवलेल्या दिसतात. मी झटक्यात कपाट बंद करतो नि दीर्घ श्वास घेतो. जिवंत उरलो आणि जगत राहिलो…या दोन गोष्टींत किती अंतर? किर्रर्र जंगलात थंडगार ओढ्यात पाय सोडून बसलेलो आम्ही…
मी माझ्या खोलीत अस्वलासारखा फिरतो. जागा बदलून झाल्या, मित्र-परिवार वाढवला; पण मनाचा पिंजरा तुटला नाही. महिन्यातून एखाद दिवशी मी आपसूकच टेकडीवर तिच्याबरोबर बसलेला असतो किंवा ती ऐकत असते नि मी तिला गोष्ट सांगत असतो. सांगता सांगता संपून जाते नि ती हळूच तिचं डोकं माझ्या खांद़्यावर टेकवते. मी दूर क्षितीजाकडे पाहत राहतो. प्रेमाची जाणीव होण्यासारखा आनंदी क्षण नसावा जगात. मी ज्या विश्वासाने ओढ्यात पाय सोडलेले, तितक्याच विश्वासाने तिने डोकं टेकवलेलं माझ्या खांद़्यावर. आता जे होईल ते होईल. तू आहेस ना…
त्या कपाटात तिला आणलेली एक मोरपंखी साडी आहे. सुंदर रंगाची. सोन्याच्या तारांनी मढवलेली. त्याही इतक्या नाजूक की कळणारही नाहीत. मी तिला म्हटलेलं की हे सोनं आहे असं समज आणि ती ’हो’ म्हटली होती. मी तिला म्हटलेलं की ’माझं तुझ्यावर प्रेम आहे’ आणि ती ’हो’ म्हटलेली. कपाट पुन्हा-पुन्हा उघडू वाटतं नि सतत त्या पसाऱ्यात गुदमरून जाऊ वाटतं. मी बहुधा ओढा होऊ शकलो नाही. ओढ्यासारखी निरागसता आणि वडीलधारेपणा एकवटवू शकलो नाही. त्या पसाऱ्यात मला आज अचानक हव्या त्याच गोष्टी सापडतात नि वाटतं जे खरंखुरं होतं ते मी जग मी पाहिलंच नाही की काय? ती मोरपंखी साडी, सोन्याच्या तारांनी मढवलेली, ती नव्हतीच कधी तशी सोन्याची…पण फक्त गोष्टीपुरती. किती माझ्या आवडीच्याच गोष्टी त्या पसाऱ्यात सापडतात मला, कितीदाही तो उपसला ढिगारा! ती निळी रात्र, जेव्हा अंधार होता सभोवती नि माझी होती ती फक्त. ती निळी रात्र, जेव्हा अंधार होता सभोवती नि ओठांची झालेली भेठ. ती निळी रात्र, जेव्हा मला घट़्ट धरून ती झोपली होती नि निरखत होतो मी तिला! वाटतं मी उगाचंच तिला ओढत राहिलो नि ती ही माझ्यासोबत चालत राहिली अनवाणी…रस्ताभर उमटलेली लाल पावलं रक्ताची कधी मी, वळूनही पाहिली नाहीत! वाटतं मी माझ्याच बनवल्या संकल्पना, नि एकामागोमाग एक दरवाजे उघडत किती आतवर घेऊन गेलो तिला कुणास ठाऊक! परत येण्याचा रस्ताच ती विसरून गेली. भुलभुलैय्या. स्वत:चंच आभाळ इतकं विणत गेलो की तिला स्वत्वाचा विसर पडला. इतकं प्रेम केलं की तिचा जीव कंटाळला! आता आठवणीसुद्धा आहेत त्या माझ्यापुरत्याच असाव्यात. त्या आठवणी जशा कपाटात आहेत, तशा त्या कुणाच्याच नसतील. त्यांचे संदर्भ कुणालाच नसतील नि मी त्यांना ज्या आपुलकीने पाहतो, तसं कुणी पाहिलंय त्यांना? जीव असलेली माणसं कितेक फिरतात आजकाल आजूबाजूला, पण वाटत नाही कुणाला हाताला धरून घेऊन जावं त्या भुलभुलैयात आणि स्वत:च विसरून जावं स्वत:ला. त्या आठवणींत एक मोरपंखी साडीही आहे सोन्याच्या तारांनी मढवलेली. ती खरंच आहे सोन्याची, पण तिला नाही समजली! एकेक तार त्या साडीतली मी विकतोय आता मदिरेसाठी.
पंकज कोपर्डे
१३ मार्च २०१४