बुधवार, २१ जुलै, २०१०

सांच्याला लई पाय दुखत व्हते. का कुणास ठावं? मरेस्तोवर चाललो व्हतो; तेवढंच. ते बी रोजच घडतंय की. आजच का दुखू राहिले कळंना. तालुक्याला खेटं आमचं रोजवार चालूयंत. हे ना ते; ते नाही तर हे! जीवाला भ्रांत अशी नाहीच. पेरलेलं उगावलंच नाही; आता परत पेरायला पैका नको? पैका आणायला तालुक्याला; बसवारीच पाण्यासारखा पैका जातुया! पेट्रोलबी महागलंय; तिकीटं बी वाढलीयंत! देवाला साकडं घालायला त्यो बी पुर्वीसारखा राहलाय कुटं? इथं जीवाला जीव राहिला नाई; देवळात देव कसा म्हंतो मी? मंडळीला बोललो म्या परवाच जगण्यात काय नाई; जीव देऊ एकजात! “अवं असं का वंगाळ बोलताय?” असं बोलली माजी बायको. आता या बाईलीला सांगणार तर काय? पोरगं नकळतंय; रडारड असतीय नुस्ती घरी; त्याला कसा समजिवनार? सगळाच गोपाळा झालाय! बाईली काल परत म्हटली की, “दोघांपुरतंच उंदराचं औषाध हाये शिल्लक” नि मुसमुसून रडली…

ठिय्या केला मी बी मनाचा. तालुका गाठला; मंगळसूत्र ठेवलं गहाण नि परतलो की पेरणीला; म्हटलं गड्या, आसं हारायचं नाई; कुणाच्या बापाला भ्यायाचं नाई! पावसाची खबरबात मिळतीय रेडूवरनं; पण आपल्या प्रदेशात नाई पडनार असंच लक्षान! झालं बरंच दिस झालं त्यालाबी; बाईलीनं कुठलं व्रत बी केलं; अन्न-पाणी सोडून; आता खायलाच काई नाई म्हटल्यावर उपासमारच व्रतं म्हणून म्हणायची!
आज माझी बायको गेली आबाळात…

रातभर पोरगं रडतंय; म्हणतंय “बा, पाऊस कोसळायलाय; म्हणतुया, इठ़ठल, इठ़ठल! त्याला सांग ना गपायला!”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: