रविवार, २ मे, २०१०

गडगडाट

   दुपारीच गडगडू लागलं. झोपेतून उठलो; तसं आभाळ सोनेरी झालं होतं. गार वारा वाहत होता; झाडं त्यावर डोलत होती. मी खिडकीत उभा राहून एकटक तो सोहळा पाहत राहिलो…कुठेतरी पाऊस झाला होता नक्की. कुठे? इथेही झाला असेल. ओलेपणाचा एक विलक्षण गंध सर्वत्र भरून उरला होता. सुटसुटीत वाऱ्यावर डुलणारं पिवळं गवत; कुठेतरी काड्या-काड्या एकत्र बांधल्यासारखं वाटत होतं. डुलत होतं. मी डोळे चोळले. खिडकीतच अडकवलेल्या आरशात डोळे खोलवर पाहून घेतले. नुकताच एका असंबध्द स्वप्नातून उठलो होतो. खराच जागा झालोय ना; हे तपासून घेतलं. वातावरण छानच जमलं होतं. अशा वातावरणात ऐकलेली गाणी किंवा केलेली कुठलीही गोष्ट मनात आतवर कुठेतरी उमटत जाते…वातावरणच इतकं गडद असतं. हलकं, सहज वाऱ्यावर उडून जाईल असं काहीसं उरत नाही; सर्व काही बरसलेल्या थेंबांमुळे जडावलेलं नि विसावलेलं…
   मी खिडकी पुर्ण उघडून टेबल-खुर्चीवर बसलो. समोर लॅपटॉप. त्याला जवळ खेचून, स्क्रीन पुरेशी वाकवून मी माझं पुर्वीचं एक ललित त्यात टाईप करू लागलो…ते पुर्वीचं ललित आतमधे भिनू लागलं अक्षरश:! वाक्या-वाक्याचा अर्थ भिडू लागला हृद्याला! अशा गोष्टी सहसा होत नाहीत. एकदा लिखान झालं की, कागदावर साकारलेली कल्पना लेखकासाठी नवी रहात नाही. ती तशी जुनीही होत नाही; कारण एक कल्पना मांडताना तिचे इतर अब्जावधी भाऊ-बंध आपसूकच डोकावू लागलेले असतात. मग हे सगळं असं असताना, ते माझं पुर्वीचं लिखान माझं मलाच आतवर भिडू लागलं; याचं नवल वाटतं मला! त्यात मी भरही टाकली; याचंही आश्चर्य वाटलं. एकदा लिहीलं की संपलं; अशी माझी सवय; मग ते परिच्छेदापुरतं असू देत, नाहीतर मग लांबलचक वीसेक पानी कथा असू देत. ते जेवढं सुचलं – जसं सुचलं – तसं ते तितकंच – तेवढंच. जास्त नाही – कमी नाही. आता माझी ही सवय कितपत चूक – बरोबर हा वादाचाच मुद्दा आहे तसा; पण एक मात्र नक्की, एकदा का मी पानांवर शाई फरफटली की नंतर घडणाऱ्या चित्रात विचार करूनही मला मोठा असा काही बदल घडवता येत नाही. उगीच बारीक-सारीक वाक्यं, संवाद टाकू शकतो तेवढेच! पण या ललित लेखनात मी टाकलेली भर अगदी आपसूक, अल्लदपणे, कुठेही ताळतंत्र न सोडता हळूवार पडली. कुठेच आवाज झाला नाही. रूईच्या बिया जशा शांतपणे उडत उडत वारा थांबेल तिथे उतरतात ना; तशी!
हे बरंच झालं. संध्याकाळचे पाच वाजलेले. पावसाचा काही पत्ता नाही. वाटलं, कॅफेटेरियात जाऊन वाट बघत बसू; कधी येतोय त्याची. तसा कॅफेटेरियात गेलो. ललित लेखांची वही घेऊनच गेलो बरोबर. कॉफीच्या घोटागणिक एकेक लेख मी स्वत:शीच वाचत् राहिलो. लिखानाला एक अनोखा गंध असतो, चव असते, आवाज असतो. कित्तीतरी वर्णनं आजूबाजूच्या परिसराची असतात; पण हे गुपित केवळ लेखकालाच माहिती असतं. वाचणारे सगळेच, स्वत:च्याच कल्पनाशक्तीने त्या-त्या वर्णनांची स्थळे निर्माण करतात! या माझ्या लेखांमधे आयुष्यात डोकावणाऱ्या कित्येक व्यक्तींच्या गड्डद आठवणी आहेत; मी खरंच हे पुर्वी इतक्या बारकाईनं पुन:पुन्हा वाचलं नव्हतं!
   कॉफी संपली. सव्वासहा वाजून गेले. पाऊस आला नाही. मग म्हटलं, आता पुन्हा लॅपटॉपसमोर ठाण मांडावी नि उरलेलं टाईपिंग करत बसावं. रूमवर परतून ते काम तेवढं सुरू केलं…मी टाईपिंगमधे एवढा गुंग झालो की अंधार कधी झाला कळलंच नाही…लख़लख प्रकाश आणि मग प्रचंड गडगडाट, असाच सगळा खेळ सुरू झाला. हे सगळं भयावह नव्हतं वाटतं, ते सगळं हवंहवंसं वाटू लागलं होतं मला. माझ्या कामाला या वातावरणामुळे गती मिळाली; म्हणून असेल कदाचित. पावसात थोडाफार भिजत रात्रीचं जेवणही करून आलो नि पुन्हा लिहीत बसलो.
   कसलं हे पावसाचं वेड? रात्रीचे दोन वाजताहेत…मी खिडकीपाशी उभाय. हा अंधार नि ते वातावरण फिक्कट होऊ नये, असंच वाटतंय…डोळ्यांसमोरून झुडूपांत शिरलेला वाघ जोपर्यंत पुर्णत: नजरेआड होत नाही; तोपर्यंत त्याला अप्रूपाने पाहत रहावं…असं वाटतंय. पाऊस थांबलाय. अंधारात दूरवर एकट्याच उभ्या असलेल्या स्ट्रीट-लॅम्पच्या प्रकाशात पावसाची काहीच हालचाल दिसत नाहीये…गार वारा वाहतोय…पावसाने कित्तीतरी आवाजांना जन्म दिलाय, आजूबाजूला ‘हे सगळं वातावरण साठवून ठेवता आलं पाहिजे; म्हणजे हवं तेव्हा वापरता येईल’ असा एक स्वार्थी विचार जन्माला आलाय आणि प्रबळ होत चाललाय…
२.०५.२०१०

मंगळवार, २७ एप्रिल, २०१०

अंधार

अंधाराचं चित्र कुणी काढलंय का कधी? मला पहायचंय ते. अंधार कसा रेखाटला असेल त्या कलाकाराने? भविष्यातला अंधार, अंधारातलं भविष्य की भूतकाळ अंधाराचा अमर्याद गोळा बनून भविष्याकडे झेपावणारा! ओसाड अंधार, नि:शब्द अंधार, कोरडा अंधार, रखरखीत अंधार, क्रूर अंधार, निर्दय अंधार…कुजका अंधार. आयुष्य हरवलेली लोकं ल्यालेला अंधार!
अजून कसं असू शकतं हे चित्र? विज्ञान या प्रश्नाची लाखो उत्तरे शोधेल खरे…पण दृष्टीला बरे दिसेल ते चित्र खरे म्हणणारे सामान्य-जन आम्ही! आम्ही ते अंधाराचे चित्र पाहू; खरेच जाणकार असू तर म्हणू Brightness थोडा वाढवायला हवा…काहीच स्पष्ट दिसत नाहीये…ना काळ, ना चित्र, ना त्यातली लोकं, जनावरं, वस्तू आणि इतर जे काही रेखाटलंय ते!! यावरून आम्ही असे conclusion काढू की, कलाकाराला अंधार ही कल्पनाच मुळात स्पष्ट नसेल बहुधा…जर तसे नसते, तर अस्पष्ट असे चित्र त्याने घडवले नसते…किंवा मग सहज कल्पनेची बीजं पेरून कलाकार वेल कधी येईल या अपेक्षेने बसला असेल!!
मग या चित्राला काय गुण द्यावेत? द्यावेत की नाही? ‘अंधार’ नावाचं चित्र…गुण दिले काय किंवा नाही दिले काय, एवढा काय मोठा फरक पडणार आहे? गुणांच्या दृष्टीनेही अंधारच सगळा!
थोडे नीट निरखून पहाल, तर ते चित्र स्प्ष्ट होईल, मित्रांनो! त्या चित्रात अंधार ल्यालेली, अंधार गिळलेली लोकं दिसतील. त्यांचे रडवेले, उदास चेहरे दिसतील…स्पष्ट नाही होणार हे सर्व…मात्र ओठ, नाक, डोळ्यांवरून चेहऱ्यावरची उदासी मैलोऩ्मैल पसरलेली दिसेल! पाणी-पाणी करत आडवी झालेली अजाण बालके दिसतील…पाण्यासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या त्यांच्या ओठ सुजलेल्या नागड्या आया दिसतील…रडणाऱ्या त्या अंधारात, लंगडणाऱ्या तरसांचं हसू ऐकू येईल! पाण्यानं सुकून मरू लागलेल्या एखाद्या बच्च्याचा पाय गिधाडांच्या गर्दीतून दिसू लागेल. पाण्याच्या थेंबासाठी पोटात चाकू भोसकणारे दोन तरूण रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात दिसतील! अंधारात चाचपडणारी एखादी म्हातारी दिसेल नि तिचं इमानदार कुत्रं तिच्या पाठीमागे शेपूट हलवत उभं दिसेल! ती नेहमीची ओळखीची गल्ली भयाण दिसेल, रक्ताच्या गटारी दुथडी भरून वाहत असलेल्या दिसतील; एखादा संशोधक रक्तातून पाणी वेगळं करून वापरण्याच्या प्रयोगासाठी त्या गटारींतून रक्त भरून नेताना दिसेल…ओंजळभरून रक्त पिणारेही कित्येक लोक दिसतील!
दररोजचा ओळखीचा वाटणारा अंधार इतका भयाण होऊन समोर उभा ठाकेल याचं भविष्यही वर्तू न शकलेला तो कलाकारही, हा काळोख पाहून, त्या विचारांनीच दडपून चित्राच्या शेवटी शांत मेलेला दिसेल…अगदी शांत, अजिबात गोंधळ न करता, हातातला कॅनवास, हाताशी प्रामाणिकपणे पकडून…चित्रावर त्याची कुठेच सही दिसणार नाही…स्वत:च शव चित्रावर झोपवलं, यापेक्षा काय अधिक काय हवं, चित्राचे अधिकार बाळगायला…म्हणूनच मी विचारतोय, अंधाराचं चित्र कुणी काढलंय का या चित्रकाराव्यतिरिक्त? मला पहायचंय ते, अंधार कसा रेखाटला असेल त्या कलाकाराने??                            २६.०४.१०            

शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

फांदीवरचे निवांत पक्षी उठले ,
आकाशात काळे ठिपके.
ढगाळ गर्दीत धक्काबुक्क्की
हरवले काळे ठिपके...

‘ती’ ही सखी गेली,
रात्री, तू ही निघ बिगीबिगी...
तोडत रहा दोघी मनसोक्त
उरले-सुरले माझे लचके!

बुधवार, ७ एप्रिल, २०१०

चिंगीच्या पुढ्यात...

चिंगीच्या पुढ्यात तळ्याकाठची मुंगी! हलत नाही, चालत नाही…शीss बाई, काहीच करत नाही! तळ्याकाठी बसलाय एक हत्तोबा, कोठारभर जेवण करून झालाय त्याचा पोटोबा! हलत नाही, चालत नाही…शीss बंबच आहे मुळी! तळ्यात पोहताहेत बदकांची पिल्लं, कुणी काळं-कुणी गोरं, गोल गोल चकरा मारतात, एकमेकांना येऊन धडकतात…तोच-तोच खेळ पुन्हा पुन्हा खेळतात, त्याशिवाय काही नाही..शीss बाई, कसली मॅड आहेत, झालं! तळ्याचं पाणी निळंशार, त्यातली बेडकं हिरवीगार, चिंगीकडे पाहून करतात डराव-डराव, पण याव्यतिरिक्त त्यांच्याकडे शब्दच नाहीत! चिंगी बघते ती निळी फुले, आकाशाचे तुकडे कापून झाडावर लावलेले, नि असा येतो गार वारा…शीss बाई पुढे काही होत नाही…
चिंगीच्या स्वप्नात तळ्याकाठचा वाघोबा, गुहेत असतो झोपलेला, घोरतो फार, खुर्रर्र, खुर्रर्र, गुरगुरतो मात्र कुठला?? चिंगी असते बिचकून त्याला, आईने सांगितलंय उठवू नको त्याला, उठला की तो डरकाळी फोडेल नि क्षणात तुला गट्टम करेल! चिंगी असते बिचकून त्याला, पण जायचंय एकदा भेटायला त्याला…त्याचा काय तो रंग, काय ती शेपूट, कसले डोळेsss, कसले काssन, कसले दाssत…नि कसले पाssय!! चिंगीच्या स्वप्नात वाघोबाला मन! मनातून वाघोबा चिंगीचा आजोबा! “ये ना, ये ना” म्हणतो नि दाढी खाजवत बसतो, कुणी त्याच्याकडे जात नाही; लडदू हत्ती बोलत नाही, नि ढिम्म मुंगी हलत नाही…निळी फुलं वाऱ्यावर डोलतात, तळ्याचं पाणी थरथरतं, तळ्यातलं आभाळ वर-खाली होतं, बदकाची पिल्लं नुसत्या चकरा मारत राहतात…

चिंगीच्या स्वप्नात तळ्याकाठचा गाव, गावतल्या माळात हरणांची जोडी, जोडीच्यामधे हरिणीचं पिल्लू, आईला बिलगतं, गवत खातं, नाक फेंदारतं…बस्स! इतकंच करतं!! शीss, बाकी काहीच नाही…गवताची पाती हिरवीगार, भरल्या उन्हात चमकतात फार…उनही पडतं ते सोनसळी, भाजत नाही, चटका नाही, असलं कसलं बाई हे!! शीss, काही मज्जाच नाही…

चिंगीच्या घरात कित्ती आक्रोड खातात लोकं, इतके चविष्ट नि मोठ्ठे की एक खातानाच भरतं पोट तिचं…शीss बाई, मग काही मजाच नाही! चिंगीच्या आयुष्यात एक वडाचं झाड, वडाच्या ढोलीत तिच्या घराचा थाट, झोपायला कॉट नि जेवायला ताट!!

चिंगीच्या पुढ्यात तळ्याकाठची मुंगी! चावी दिली की कुई कुई करते, चावी बंद् की मग हलत नाही, चालत नाही…शीss बाई, माझ्याशी कुणी खेळतच नाही!!

शुक्रवार, २ एप्रिल, २०१०

सुरूवात

उध्दवस्त घर. मोजकेच श्वास उरलेले. पहिल्या पावसाने मात्र धुळीत काही अंकुर फुललेले. पाचही भिंती ढासळल्या; चारही दिशांनी घर नागडे. उत्तरेकडली एक भिंत तेवढी अर्धी-मुर्धी उभी. गुलाबीसर रंग फिकटसा; त्यावर पहिल्या पावसाचा फवारा. तिच्या डोळ्यांतल्या अश्रूधारा गुलाबी गालांवरून अंकुरांकडे चाललेल्या. त्या भिंतीचं नाव “सखी”…कारण आजूबाजूस कुणीच नसताना ती एकटीच माझ्यासाठी उरलेली! सखीच्या मनावर एक गडद केशरी हाताचा तळवा. माझं नि प्रियेचं लग्न झालं; त्यादिवशीचा उमटलेला…पहिल्या पावसाने अजूनही त्याचा रंग नाही ढळलेला.

या गावात आता कुणीच राहत नाही. बोलायला, लिहायला, वाचायला, गायला, जगायला माणसं नाहीत. रात्री लांडगे फिरतात…वाघाची कमजोर डरकाळी येते ऐकू…माझ्या शेकोटीशेजारी मी रग घेतो अंगावर ओढून! जिवंत असूनही मेल्यासारखा झोपतो. आता तर हे सोंग, सोंग उरलंच नाहीये!


इथे आलो तेव्हा होतं तरी काय? जंगल…बाकी काही नाही. मग मी एक वीट आणली…मनात जिद्द होती; अंगात बळ होतं; सोबत “ती”ही होती! घर वसवलं-रंगवलं! घरासारखं घर केलं. माझं पाहून इतरही आले. चला, गावच वसवू म्हटले. “हो” ला “हो” केलं आणि टुमदार गावही वसवलं…त्याचं काही दिवसांपुर्वीच पाणी-पाणी झालं! दुष्काळ पडला…युध्द झालं…नको-नको ते घडलं! असंच मरण येण्यापेक्षा; लोकांनी स्वत:च स्वत:ला संपवलं. मी सांगत राहिलो – “वारा थांबेल वहायचा कधीतरी; जरी आज झोंबतोय अंगाला! वादळ येईल अशी भिती का बाळगताहात; भित्र्यांनो! सूर्यही थंड होईल…जळून नष्ट करेल सगळं, हा विचारच का मुळात! मित्रांनो, बासरी वाजवा ना…गाणं गा…कविता म्हणा…घाबरू नका मात्र!” मात्र कुणीच ऐकलं नाही.

सारेच मेले. “ती” ही गेली. तेवढी एकच भिंत नि तेवढा हात सोडून गेली. उरलेल्या धान्याचे मी अंकूर घडवलेत…त्यातून उगवेल अजून धान्य; मग मोठीमोठी शेतं होतील तयार! घर बांधू लागेन परत…सुरूवात केलीय तशी मी…ही गुलाबी फिकट भिंत नि हा हाताचा ठसा…हे काय! सुरूवात केलीय मी!

बुधवार, २४ मार्च, २०१०

नीलमोहोर


रणरण उन्हात सुर्य कपाळावर आला की एक फुलपाखरू बाहेर पडतं....इतका वेळ ते नील-मोहरातच दडून बसलेलं असतं...ते कसंय माहितीय? जांभळसर हिरवं, गुलाबीसर निळं! मी मख्खासारखा म्हशीवर बसून म्हैस जाईल तिथं हिंडत राहतो; डोळ्यासमोरचा तो नील-मोहोर आणि त्याच्या मखमली जांभळ्या सड्यावरून तिची नाजूक गुलाबी पाऊले हळूवार पडू लागली की माझ्या मनात फुलणारा गुलमोहोर; हे दोघेही कधीकाळी पुन्हा विभक्त न होण्यासाठीच जन्माला आलेत असा प्रश्न मला पडतो. म्हैस मात्र तेवढ्यात उन्हाची काहिली शमविण्यासाठी आरामात चिखलात घुसते; तिच्या पाठीवरचा मी ही आपसूक...

मंगळवार, २३ मार्च, २०१०

Network


शक्य आहे ही वेदना;  ती जाणवणे आणि भोगणे; दोन्ही अशक्य! आज अचानक मला या गोष्टीचा साक्षात्कार झाला; तसं पुर्वीही बऱ्याचवेळा वाटून गेले; पण बोध झाला नाही! आज बोध झाला. एवढ्या मोठ्या जगात हा मी इतकुसा! जग काय घेऊन बसलात? ब्रम्हांड! ब्रम्हांडात मी इतकुसा! जगातल्या सर्वात शक्तिमान भिंगातून पाहिलं तरी दिसणार नाही; इतकुसा! आणि माझं जग! माझ्या जगाचं काय? माझं ते इवलुसं जग… “आम्ही दोघे, आमचे दोघे; आई-वडिल, मामा-मावशी, भाऊ-बहिण आणि इतर. माझी नोकरीची जागा. माझं घर. माझं वाहन. माझे कपडे-कपाट-बॅंक-क्लिनीक-मित्र-मैत्रिणी-favourite hotel- outingची ठिकाणं-काय-काय नि काय-काय? जन्मल्यापासून हे जाळं मी विणत राहिलो; लोकांशी भेटलो की, वाढवत राहिलो…माझ्या ओळखीच्या सर्वच लोकांची अशी स्वतंत्र जाळी; अशी शेकडो-हजारो-करोडो-अब्जावधी-परार्ध आणि जास्तच जाळी…या सर्व जंजाळाच केद्र-बिंदू “मी”!!

जाळ्यांचा कुठला बिंदू कुठे खपेल आणि कुठे वाढेल? याचा काय थांग! आणि असे जर झाले; तर माझे केंद्र ढळणार तर नाही ना…याचा तरी काय थांग!!