शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

Untitled note#01


हे लिहीण्या-न-लिहीण्याचं प्रकरण कधीतरी अंगलट येणार असं फार पुर्वीपासून वाटायचं मला. ते घडलं नाही म्हणून लिहीत गेलो. आता अचानकच काहीच लिहू वाटत नाही. आता एकेका अंगलट आलेल्या गोष्टीची उशी करून छानसं झोपू वाटतं. तिच्याच कुशीत, स्वप्नांच्या गावांत, शांतपणे. धावपळ झाली, झटाझट झाली, टकराटकरी झाली, नजरेचे बाण छेदून गेले हृद़्यांना, ती अगदी घराचं माप ओलांडूनही आली नि मग गोष्टच संपली. या गोष्टी अशाच संपणार होत्या, हे माहिती असतं तर लिहायलाच घेतल्या नसत्या ना! पण हे सगळं असंच असावं! लिहीताना तरी काय भान असतं म्हणा. कुठे? काय? लिहू वाटेल ते! वाटलं लिहीलं…वाटलं बदललं. जे लिहीलं, ते घडलं. माझी लागली वाट. एक वाट, वाटलेली साधी-सोपी-सरळ, तीच निघाली मुळात नागमोडी नि अस्ताव्यस्त. काय गरज होती? कशाचीच? म्हणजे अगदी लहानपणापासून सांगायचं तर पत्त्याचा बंगला, मग तो मोडला, मग परत बांधला, मग तो मोडला, मग तो परत बांधला (जरा विचारपुर्वक), मग तो मोडला…मग आता मी लिहीतोय. पत्त्याचा बंगला नाही बांधायचा मला, घर बांधायचंय…माझं घर. मजबूत नि गोंडस.
मी हाक मारली, तेव्हा ती फार दूर पोहोचली होती. किंवा मी हाक उशीरा मारली! नुस्ताच वारा वाहत राहिला नि मला रात्रभर स्वप्नं पडत राहिली. सुंदर स्वप्नं. जाग आल्यावर अंगावर आलेला काटा. भिती. ती इतकी दूर पोहोचलेली की, घाबरण्याशिवाय माझ्याजवळ काहीच उरलेलं नव्हतं. माणसांत घडणारी स्थित्यंतरं भयानक असतात. काहीच्या काही. वाईट वाटतं. वाटणारच. कथाकाराच्या हातून कथा निसटत चालली की वाईट वाटणारच…त्रागा होणारच. आणि त्या कुरवाळत बसाव्याशा वाटणाऱ्या आठवणी. किती त्या नाजूक-गोंडस नि romantic. मेंदूतला तो दरवाजा उघडला की श्वास घेणं मुश्कील होऊन जातं. सगळंच मनभर पसरतं. स्वत:चाच विसर पडतो नि घरभर कचरा होतो. झाला होता, आता आवरून ठेवला. आता त्यांना मुस्क्या बांधून कोंडून ठेवलंय आत कुठेतरी, चावी गिळून टाकलीय शेजारच्यांच्या कुत्र्याने. कुत्रं नुकतंच मेलंपण. जलपऱ्या आहेत या आठवणी. गाणं गातात नि भोळसट माझ्या विचारांना काबूत करत जातात. आतल्या आत किती घडामोडी घडताहेत, कुणाला माहिती. कधी-कधी जळजळतं नि त्रास होतो, तेवढाच जाणवलाय आजवर. सध्या तब्येत छान आहे, त्यामुळे असेल लिहू वाटलं. पण ते अंगलट येणार असं वाटलं होतं…ते येऊन गेलं कधी तेच आता आठवेनासं झालंय़. देवा (असलास तर), एकच गोष्ट कर…सगळ्यांना आनंदात ठेव. कथाकारांना दु:खीच ठेव आणि तू स्वत: डळमळू नकोस. तू डळमळलास तर माझ्याकडून काय अपेक्षा ठेवशील?   
- पंकज कोपर्डे
३० नोव्हेंबर २०१३

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

ललित


            संध्याकाळ वादळलेली होती तेव्हा मी पावसाची वाट पाहत एकटाच बसून होतो. समोरची रस्त्या दुतर्फ़ाची भरगच्च झाडं एकाच माळेत विणलेल्या सुरांसारखी वर-खाली, आडवी-तिडवी होत राहिली आणि जमिनीवरची धूळ आकाशाला भेटायला गेल्यासारखी पाण्याबाहेरच्या मासळीसारखी तडफडत राहिली. दिवस संपायला आला की सुरूवात होतेय सकाळची या इतक्या अवकाशाचा पत्ताच लागला नाही. झोपाळ्यासारखा मी पुढे-मागे झुलत राहिलो, तितकाच काय तो वेळ पुढे-मागे सरकत राहिला! चित्र विस्कटल्यासारखं नि रंग हवेसारखे पातळ…काय म्हणतात याला?
            ती काळीभोर चकाकणाऱ्या रंगाची चिमणी आली. गॅरेजच्या पत्र्यावरच्या दगडावर बसली. मी घड्याळात पाहिलं, १८० अंशाचा फेरा होता काट्यांना, सहा वाजताचा. ती चिवचिवली…टॅव टॅव टॅव…मग थोड्या वेळाने हिस्स्स हिस्स्स हिस्स…मग अजून एक चिमणी आली, भुरकट रंगाची, तांबूस बुडाची… टॅव टॅव टॅव. दिवस संपला का? त्यांनी थोडं इकडे तिकडे पाहिलं! जायचं घरी? की थांबायचं थोडं? भुरी मादी उडाली, तसा काळा नर तिच्यामागे सुळ्ळकन…घरातली लाईट फट़्कन बंद झाली, मी घरात वाकून पाहतो इतक्यात मैदानात आभाळातून क्षणात जमिनीपर्यंत वाढलेली एक चमक आदळली! नंतरच्या गडगडाटात मेलेल्या गुरा-ढोरांच्या, मनुष्यांच्या, झाडं-वृक्ष-तरूंच्या किंकाळ्या ऐकू आल्या नाहीत! दु:ख कुणाला जास्त होतं? मरणाऱ्यांना की मारणाऱ्याला?? अजून एक चमक नि गडगडाट…मग वारा…झाडाची एक फांदी खाड़्कन गॅरेजच्या पत्र्यावर नि मी ताड़कन उठलो! झोपाळा एकटाच हलला, आता त्याला सोबत नाही…
            काय ऐकावं? जॅझ? हं…जॅझच! ते छान आहे. साध्या साध्या नेहमीच्या गोष्टींना एका असामान्य अस्तित्वात गुंडाळण्याची पद़्धत आहे त्याची. मला आवडतं ते! गॅलरीतून समोरचं चित्र पुन्हा एकदा किती धूरकट, धुळेजलेलं नि बदामीसर रंगाचं भासू लागलं. झाडं हलताहेत, पाऊस आहे बारीक-सारीक नि विजा लखलखताहेत, त्या जमिनीपर्यंत पोहोचल्या की ढग गडगडताहेत! मी आत्ता सुरक्षित जागी आहे…घनदाट जंगलात असतो तर? जॅझ ऐकलं असतं? की दुसरं काही? झोपाळलेला असतानाही डोळे ताणत जागा राहिलो असतो! बचेंगे तो ओर भी लिखेंगे! हं…त्या पक्ष्यांसारखंच झालं असतं माझं! थांबूया का? नको! कसलं वादळ हे, चल; घरी जाउया! घरट्यात गुडूप बसून मी वारा थांबण्याची वाट बघितली असती? डोळे मिटून देवाची प्रार्थना केली असती?? माझ्या रमेची आठवण काढली असती? की तिची माफ़ी मागितली असती? हे सगळंच खवळलेल्या समुद्रात हेलकावणाऱ्या होडीसारखीच आहे ना! हवामान काही माझ्या हातात नाही; ते बदलू शकतही नाही…पण ते जसं बघतोय, ते तसंच रेखाटावं, शब्दबध्द करावं असंही नाही! त्या खवळलेल्या समुद्रात हेलकावणाऱ्या नावेवरती संथ जॅझ संगीत सुरू आहे…ते ऐकूही येतंय…माझी आठवण काढणारी रमा, अशा वादळी रात्री माझ्या राहत्या घरापासून समुद्राच्या पट़्ट्याएवढी दूर आहे…तिथे हवा काही वेगळीच असेल! ती नुसतीच बसून कागदावरती पाय रेखाटत असेल!
            माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती बोटांच्या एकेक ठोक्यागणिक अक्षरं पुढं सरकताहेत…वाऱ्याची दिशा कुणी ठरवावी? मनाने? लिहणाऱ्या हातांनी? गॅलरीतला झोपाळा उगाच स्वत:च हलतोय…वादळाचा शेवट कसा करायचा ते मला नीटसं समजत नाहीये; किंवा आता पुढचं काही सुचत नाहीये…मग हे इथेच बंद करावं का? डाव्या छातीच्या सातव्या बरगडीजवळ काहीतरी खुपतंय; वीज पडली असेल बहुतेक…

पंकज कोपर्डे
१६.०४.११  

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०११

ती शांत दुपार


ती शांत दुपार
आणि त्यात फोडणीचा वास;
घरात घर केल्यासारखी
चौकटांची खिडकी;
कर्ररकर आवाज करत
झाडांच्या फांद़्या,
वाऱ्यावरती सळसळ नुसती
पिकली पानं गळकी.
ऊन नाही, नाही सावली,
उदासीनता आहे नुस्ती
थंड वारा वाहून आणिक
पापण्यांवरती सुस्ती.
पोटातूनही येते गुडगुड
ती तिथेच आपली बरी;
ती शांत दुपार
आणि त्यात फोडणीचा वास.


॒॒॒(@ IISc. sometime in September)

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

आवर्तन


ती येण्याचे काळ-ऋतू नि येतानाच्या लाटा,
कधी हरवत, कधी सापडणाऱ्या हरवलेल्या वाटा;
सुळकत जाणारे किरमिजी पक्षी पाण्याकडे,
परतून माघारी-माघारी पुन्हा परत, डोळे वाटेकडे!
धुळेजलेल्या वाटांवरून एकटीच पळणारी फुलपाखरं,
त्यामागून नि एक सावली पळतीय खरं…
अशा नाजूक वेळी किती घडावीत आवर्तनं,
भेट-ताटातूट, पुन्हा परत सारंच जीवघेणं!

बुधवार, २७ जुलै, २०११

एकट्या वाहणाऱ्या दुपारीत सळसळणाऱ्या झाडाची कळकळ ऐकायला कोण उभंय कुठे?
एक तो गाणारा कवी होता, त्याचा नाही पत्ता!! 

शनिवार, २३ जुलै, २०११


कागदावर एक रेघ ओढायला निमित्त लागत नाही.
पाऊस पडला – तुझी आठवण आली
किंवा तुझी आठवण आली (नि पाऊस पडला!)
इतकंही अमाप होतं.
आभाळातून कोसळणाऱ्या थेंबांचा कैक सेकंदांचाच प्रवास!
गर्भ – जन्म – उत्साह – आनंद – वेग आणि अकस्मात मृत्यु – दफन!
ही सारी गोष्ट जेवढी मी उपभोगतो; तेवढीच क्लेषदायक?
जीव कातरत जाणारी बासरी, निळ्या रात्रीत पागोळ्यांचं पाणी!
दूरदूरवर दिसायला प्रकाश नाही; थंडीला सारायला ऊब नाही!
ऊब नाही, पण खूप घट़्ट आहे तुझ्या आठवणींची मिठी!
गात्र-गात्र थंड करणारी…

सोमवार, १३ जून, २०११

काहीतरी


   काहीतरी कमीय असं नेहमीच वाटतं; पण ते काय अजून कळलं नाही. “भाजीत मीठ कमीय गं” हे वाक्य कितीदा तरी कानांवर पडलं; पण ते मीठ काही कमी पडायचं थांबलं नाही! मला सतावण्यासाठी नि माझे तेच तेच शब्द पुन:पुन्हा ऐकण्यासाठी तिचे हात शांतपणे सतत तेच करत राहिले…सवय झालीय का आता?
   हा प्रश्न भयंकर आहे. हृद़्यात कळ मारावी; इतपत! सवय झालीय का? तिच्या हातांना मीठ कमी टाकण्याची की मला ते अन्न तसंच ग्रहण करण्याची!! आता चवीतही काही रस उरला नाही? असं म्हणावं का? माणसांना एकमेकांची सवय झाली की काय होतं पुढे? प्रयोग करून पाहण्यासारखा आहे…आहे; पण तो सुरू आहे का? हेच कळत नाहीये! सवय झाली असेल तर नाविन्य नाही; नाविन्य नसेल तर कुतूहल नाही; कुतूहल नसेल तर गोष्टी नजरेआड होतात. सवय लागते. आमच्या अपार्टमेंटच्या बाहेर सदाफुलीचं झाड नि शेजारीच एक मनीप्लांट; या दोहोंवर उडणारा शिंजीर. दिसतो न दिसतो; सकाळी दारातून बाहेर पडलं की नजर जातेच तिथे; कारण तो दिसतोच असं नाही ना! शोधावं लागतं त्याला! तो सवय लावू देत नाही…
   तिची सवय झाली; म्हणजे मग सगळ्याच गोष्टींची सवय झालीय की काय? हा दुसरा प्रश्न अजूनच भयंकर नाही का? एकापाठोपाठ एक वेस उपटत जावी; तसंय हे! उरणारा कोवळा-लुसलुशीत प्रेम नावाचा गाभा कितपत संरक्षित राहणार आता?