शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

Self Realization


ब्रुजेल्स हे फक्त त्या छोट्या लघवी करणाऱ्या माणसाबद्दल (Manneken Pis) वेडं आहे. बघाल तिकडे त्याचाच फोटो. आणि मुर्ती लहान, किर्ती महान असं वर्णन अगदीच जुळतं याला. लोकं वेड्यासारखी गर्दी करून याला एवढ्या लांबवर पहायला येतात. त्याच्या लघवीतूनच बीअर आणि वाईन पितात. सेल्फ़ी काढतात आणि सेल्फ़ीमधे स्वत:ही तशीच पोज देतात. भारतातून एवढ्या लांबवर मी हा वेड्यांचा बाजार बघायला नव्हतोच आलो मुळी, पण एक गोष्ट लक्षात आली की, असा वेड्याचा बाजार आपल्याकडे नाक्या-नाक्यावर आणि दररोजच पहायला मिळतो. बेल्जिअन लोकांसाठी हा निव्वळ एक टाईम-पास असावा कदाचित.
माझा आजवरचा प्रवास काही उल्लेखणीय नाहीये, पण आत्मचिंतन करायला लावण्याएवढा तरी नक्कीच झालाय. मी फार ऐकलं होतं की युरोपिअन लोकं फार डिसीप्लिन्ड असतात, पाहिलंही ते. त्यांची शहरं, त्यांची रचना, रस्ते, वाहतूक, जेवण, संस्कृती, भाषा, वेष. आपल्यात आणि यांच्यात प्रचंड फरक आहे. एवढा मी नव्हता विचार केला खरंच. भारतातही राज्या-राज्यांमधे बराच फरक आहे, तो वेगळाच. पण भारत आणि बेल्जिअम किंवा इतर कोणताही युरोपिअन देश…यांत स्पष्टपणे जाणवावं इतकं अंतर आहे. मला पुण्याहून बंगलोरला कामासाठी आलेली, नि बंगलोर मानवलं नाही, म्हणून परत पुण्याला गेलेली लोकं माहिती आहेत! हा tolerance कित्येक गोष्टींवरती अवलंबून असावा, पण तो दिसतो. एक गोष्ट खरी आहे, की आता जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, भारतीय लोकं दिसतील. ते पण इतरांना शोधत असतील एखांदवेळेस…
मी भारतातून निघालो तो देशाभिमानाचा मोठा फुगा घेऊन. तो फुगा थोडा अहंभावात रुपांतरित झालेला. पण जसा इथे आलो आणि इकडचं जग पाहिलं; त्या फुग्यातली हवा हळू-हळू सुटत गेली. मग नंतर आपल्या देशाची लाजही वाटू लागली. आपल्या एवढ्या मोठ्या आणि जुन्या देशात आपण काय मुर्खपणा चालवलाय असं वाटू लागलं. हे realization होणं माझ्यासाठी फार गरजेचं होतं. कारण, जोपर्यंत मी स्वत:हून जग बघणार नाही, तोवर मला ते कळणार नाही. स्वत:च्या देशाबद्दल अभिमान असणं साहजिक आहे, पण तो आंधळा नसावा. माझ्यासाठी आजवर तो आंधळा अभिमान होता आणि जरी मी बऱ्याच ठिकाणी फिरलो नसलो तरी, तरी मला आता कळतंय की आपण जगाच्या शंभर वर्षे मागं जगतोय. आपण आपल्या अंधश्रद्धांना देवत्व बहाल करून, देशाला खड़्ड्यात ढकललंय. दीडशे वर्षं इंग्रजांचे गुलाम होतो, ते चांगलं होतं. अन्यथा, या राजांनी फक्त भोग-विलासात आयुष्य घालवून भारताला जगाच्या पाठीवरूनच नष्ट केलं असतं. फार अभिमान वाटावा असा आपला इतिहास नाहीये. या राजाच्या तावडीतून त्या राजाच्या पायाखाली असाच आपला देश चिरडला गेलाय आजवर. आपला देश हा कित्येक हालापेष्टांतून वर आलाय, येतोय…पण इथेही एवढा काही फरक नाहीये. जर्मनीतर दुसऱ्या महायुद़्धात नेस्तानाबूत झालेली, तरी आज मान वर करून उभीय. आणि हे सगळं घडलंय मागच्या पन्नास वर्षांत. इथल्या सोयी-सुविधा भारतात येण्यासाठी निदान पन्नास वर्षांचा कालावधी जाईल…तोपर्यंत जग प्रगतीच्या वेगळ्याच मार्गावर असेल. अर्ध्या ज्ञानात माणूस सुखी असतो म्हणतात, ते काही खोटं नाही! आपण डोळे झाकले म्हणजे जगाला आपलं नागडेपण दिसत नाही, असं भारताला वाटतंय का? काय हे…किती दशकं अजून आपण मागास राहणार आहोत? मागसलेपणा पुरे झाला आता…कामाला लागा. आपला देशाभिमान फुकाचा आहे. आपल्या संस्कृतीबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. आपल्या भाषांची मर्यादा आपणास माहिती नाही. आपण काय केलं पाहिजे, हे आपण मनातल्या मनातच ठरवतो आणि आपल्या कृतींना आपण ऐतिहासिक किंवा पुराणातला काही पुरावा देऊन मान्यता देतो. कोण आहे हिंदू? काय आहे मुस्लिम? काय कळतंय काय आपल्याला या सर्व गोष्टींतून? मंदिरं बांधून घंटा वाजवणारा हिंदू का? एवढ्या समृद़्ध आणि माणसाला माणूस म्हणून जगायचं स्वातंत्र्य देणाऱ्या संस्कृतीचे बारा वाजवलेत आपण कर्म-कांडांना आणि साधू बाबांना महत्त्व देऊन. आंतर-राष्ट्रीय स्तरावर भारत काय आहे तर ‘नमस्ते’ आणि ‘योगा’! बाजार मांडलाय आपल्या दळभद्रीपणाचा. डोळे उघडा आता, देशासाठी काही करा. काय करतात आपले नेते, हे परदेश दौरे करून? काय शिकतात ते? की नुस्तीच गोरी कातडी बघण्यासाठी जनतेचा पैसा बुडवून येतात हे? हे सगळं ज्यावेळी जाणवतं, त्यावेळी खरंच frustrating वाटतं. मला इथे अजून पंधरा दिवसही नाही झालेले, आणि हे वाटतंय. मग विचार करा की जी लोकं वर्षानुवर्षे भारताबाहेर आहेत, त्यांची काय अवस्था असेल? ‘स्वदेस’ मुव्हीसारख्या घटना फार क्वचितच घडत असतील!
पुर्वी मी थोडा हा प्रयत्नही केला की चला अगदीच यांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या नाहीत. प्रगतीचे दुष्परिणामही पाहिले पाहिजेत. पण दुर्दैवाने यात फायदे-तोटे असं वर्गीकरण करणं अवघड आहे. ते शक्य नाही. इथल्या लोकांना शिस्त आहे. कुठून चालावं, कसं चालावं, कशी गाडी चालवावी, रस्त्याचा उपयोग कसा करावा…सर्वच गोष्टी systematic आहेत. बऱ्याच automated आहेत. आजूबाजूला क्वचितच कुणी पोलिस दिसतात...तिकीट चेकर्स दिसतात. जर सर्वांनीच नियम पाळले तर त्यांचीही गरज नाही भासणार. मशिन्सच जास्त काम करत असल्यामुळे लोकांची गरज नाही. जे लोक काम करतात त्यांचं salary structure ठराविक आहे. जास्त पैसे कमवणाऱ्या लोकांवर जास्त tax आहे. गरीब-श्रीमंतांमधली दरी खोल नाही. सर्वच लोक थोड्या-फार फरकाने सारखीच लाईफ-स्टाईल जगताहेत. मी दररोज बर्लिन मधे दोन तास travel करतोय…Institute ला ये-जा. पण या प्रवासात थकवा जाणवत नाही. मी दररोज जाताना दोन ट्रेन्स आणि एक बस बदलून प्रवास करतो. पण हे सर्व transitions फार सोयीस्कर आणि बिनात्रासाचे आहेत. एकच तिकीट सर्व माध्यमांसाठी (बस, ट्रेन, ट्राम) चालतं. तेच जर तुम्ही भारतात कोणत्याही शहरात प्रवास करत असाल, तर प्रवासाशेवटी थकवा जाणवतो. गर्दी असते, बस किंवा लोकल ट्रेनसाठी इकडून तिकडे पळावं लागतं. वेगवेगळ्या माध्यमांमधे ताळमेळ नाही.
लोक आपापल्या कामात बुडालेले असतात. कुणी कुणाचा वाली नाही. ट्रेनमधे प्रवास करताना गर्दीतही फार एकटेपण जाणवतं. लोक फोनमधे बघत असतात किंवा पुस्तक वाचत असतात. कुणी कुणाशी बोलत नाही. कुणी हसतही नाही. त्यांचे चेहरे सप्पक भासतात. कळत नाही की यांना झालंय काय? एखांदवेळेस स्वत:मधेच बुडालेले असतील, उद्याची काळजी असेल किंवा शून्यात गुंतले असतील. कामाचा ताणही असेल कदाचित. यांच्या कामाच्या वेळा फार defined असतात. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच. त्याआधी किंवा त्यानंतर एक मिनीटही काम नाही करणार. आणि आपण? एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे यांचं social structure. सगळेच स्वावलंबी लोकं…अति-स्वावलंबी. बरीच लोकं एकएकटी राहतात. कुटूंबसंस्था थोडी कालबाह्य झाल्यासारखी. बरीच एकएकटी म्हातारी लोक आजूबाजूला दिसतात. जर बस किंवा ट्रेनमधे त्यांना मुद्दामून स्वत:च्या जागेवरून उठून बसायला जागा दिली, तर त्यांना तो अपमान वाटतो…ते म्हणतात – ‘I am good.’ प्रत्येकाला आपापलं काम स्वत: करायची सवय आहे. बर्लिनमधे तरी जनसंख्या रोडावत चाललीय. शासन मुलं असणाऱ्या कुटूंबांना काही सवलती देतं. अवघडंय. आणि अगदी याच वेळेस लांबवर म्युनिकमधे ऑक्टोबर फ़ेस्ट सुरूय…या सिजनची शेवटच्या बिअरचा आनंद घेण्यासाठी लोक तिकडे गर्दी करताहेत. मी अगदीच योग्य वेळी आलोय बर्लिनमधे. सध्या हे त्यांचं २५ वर्षं आहे जर्मनी reunion चं. इतिहास दाहक आहे, पण त्यांनी केलेली प्रगती त्यांच्या सहनशीलतेचं प्रतिक आहे.  
पंकज 
२ ऑक्टोबर २०१५
Tierpark, Berlin


सोमवार, २० जुलै, २०१५

धरपकड

रानात आता काहीच झाड्ं उरलीहेत, हे माहिती होतं रामूला. पाऊस पण लांबणीवर पडत चालला होता कातरपाड्यात. मागच्या दोन महिन्यात दोनेक दिवस दोनेक थेंब गळल्यासारखे झालेले, की ती ही अफवा होती हे त्या दोनशे वस्तीच्या जुळ्या गावांना माहितीही नव्हते! कातरपाड्यात नि पातरपाड्यात एक छानसं भरगच्च जंगल तेवढं जिवंत राहिलेलं मागच्या दोनशेक वर्षांपासून. दोन पहाडांनी बोटांनी चिमट करून वाहणारी नाजूक नदी गांडूळ पकडावी तसं या दोन पाड्यांनी चिमटलेलं ते सदाहरित जंगल. चिमट घट्ट होईल तसं ते आंधळं गांडूळ फुटणार किंवा पिचकणार. रानाचा पट्टा रूंदीला कमी पण लांबीला अजून शाबूत राहिलेला. जांभळाची नि वडाची उंचच उंच झाडं जंगलाची उंची त्याच्या रूंदीच्या दुप्पट ठेवण्याचा कसा-बसा प्रयत्न करत राहिलेली.

रामू कातरपाड्याचा राहणारा नि लामू पातरपाड्याचा. रामू लाकूडतोड्या नि लामू होता सुतार. रामू नि लामू मिळून काम करायचे, रामूच्या लाकडाचं मोल लामू करायचा. हा त्यांचा धंदा मागल्या दहा वर्षांत चांगलाच भरभराटीला आलेला. जंगल बारीक होत चाललेलं नि रामू-लामूचं कुटूंब रोज त्याच्या जिवावर जगत होतं. खात होतं-पित होतं-वाढत होतं. जांभळाच्या त्या एका उंच झाडावर जंगलातलं शेवटचं एक शेकऱ्याचं कुटूंब तग धरून राहिलेलं. शेकऱ्यानं अजून सहा वृक्षांवर घरटी बांधून ठेवलेली नि पिल्लं अधनं-मधनं वेगवेगळी घरटी फिरत रहायची. शेकऱ्याचं कुटूंब आजू-बाजूच्या झाडांची पानं खात-जांभळं खात-जगत होतं-वाढत होतं. पावसाची त्याला काही कल्पना नव्हती आणि जंगलात अफवा पसरवायला कुणी हुशार प्राणी शिल्लक नव्हतेच.

पाऊस नसल्यामुळे शेतीतूनही काहीच उत्पन्न नव्हतं दोन्ही पाड्यांत. लोक निराश चेहरा करून आभाळाकडे पाहत राहिलेले. लामूच्या दुकानावर गिऱ्हाईक नव्हतं. अगोदरच बनवलेल्या लाकडी वस्तू कुणी घेतल्या म्हणजे मग नविन बनवणार ना. लामूच्या मनात होतं की पाड्यांत कुणाचं लग्न लागलं तर बरं…रामूला सांगून जांभळाचं लाकूड बेडसाठी वापरता येईल. पण सध्यातरी थोड्याफार भरभराटीशिवाय लग्नकार्यही कुणी लवकर उरकणार नाही, असं एकंदरीत चित्र झालेलं. मरणाची रटाळ धरपकड चाललेली दोन्ही पाड्यांत आणि त्या अर्धमेल्या जंगलात.
पंकज

२०.०७.२०१५   

रविवार, १४ जून, २०१५

अजगर

…वाट सोनेरी होती. जंगल गुणगुणत होतं. जंगलाची वर्दळीची वाट. मधेच एक अजगर आडवा. पोट ट्म्म. सुस्त शरीर. अधून-मधून तोंडातून बाहेर पडणारी लवलवणारी जीभ. दोन दिवस होऊन गेले, तसाच तो तिथे. हलू वाटत नाही, चालू वाटत नाही. एक-दोनदा रात्रीच्या वेळी अस्वलानं डिवचलं, तसा त्याच्या अंगावर चालून गेला. मुंगसानं दुपारी फार त्रास दिला…
      पोटातलं चिंकाऱ्याचं पिल्लू जळत होतं आत हळू-हळू. एखाद दिवस आणखीन आणि ते पचून गेलं असतं सगळं…वन्यजीव छायाचित्रकारांची एक जीप अंगावरून गेली; डोकं वेगळं, शेपूट वेगळं; मधलं टम्म पोट चिकाऱ्याला विरघळवत एकटंच उरलं.
      मेला अजगर तरी त्याचे फोटो प्रदर्शनभर कौतुकास्पद ठरले; “A sad roadkill” या नावानं छायाचित्रकार टम्म फुगले.

      मेला अजगर.
Pankaj
24.05.2010

शनिवार, २५ एप्रिल, २०१५

लाल-शेपट्याच्या गोष्टी

टाचण्यांच्यामागे फिरायला नक्की कधी सुरू केलं ते आठवत नाही मला आता ठीकसं. कधीतरी २००९-२०१० मधे. त्यापुर्वीही चतूर पहायचो, टाचण्या पाहिल्या होत्या, पण त्या ओळखता यायच्या नाहीत. तिथेच गाडं अडायचं. एखादया सजीवाचं नाव माहीत नसेल, तर आपण नक्की काय पाहिलं-ते काय करत होतं-ते किती सुंदर होतं, हे सगळं सांगणार कसं? पक्ष्यांची नावं तर लहानपणापासून, छोट्या-मोठ्या मराठी पुस्तकांपासून ते मोठ-मोठ्या ईंग्लिश ग्रंथांतून चाळून काढली होती. पण चतूरांपासून मी आवड असूनही बराच अनभिञ राहिलो. कारण ओळखणार कशा त्यांच्या नानाविध प्रजाती? २००९ मधे सुब्रमनिअन सरांचं एक छान पुस्तक हातात पडलं. आणि मग हे-दणादण चतूर आणि टाचण्या पहायला-अगदी जवळून पहायला मी सुरूवात केली. सुरूवात केली खरी, पण कीटकांनाही मी पक्ष्यांना बघतो, तसंच बघू लागलो. त्यांची बैठक बघावी, ते कसे उडतात ते बघावं, त्यांचे रंग बघावेत, त्यांचे आकार बघावेत आणि या सगळ्यांतून त्या एकमेव पुस्तकात जो फोटो जवळचा वाटतो, तो फोटो म्हणजे ती प्रजात. असं माझं सुरू झालं. त्यात बऱ्याच चुका केल्या. दोन मजेशीर गोष्टी आठवतात. सिंधुदुर्गातल्या आंबोलीत एक नाजूक पारदर्शी, पण चांगलीच मोठी टाचणी पाहिली. टाचणी कसली? सुईच ती! २०११ मधे. ती नुकतीच पाण्यातल्या किड्यापासून पंख ल्यालेली टाचणी बनली होती. मी तिला पाहिलं, फोटो काढले. पुस्तकात पाहिलं आणि म्हटलं की ही आहे Great Emerald Spreadwing. खरं तर ही प्रजात सापडते उत्तर भारतात, मग ती आंबोलीत कशी? दुसरी मजेशीर गोष्ट म्हणजे पुण्याजवळच्या कवडीच्या अतिप्रदुषित पाण्यात पाहिलेली Malabar Torrent Dart. ही प्रजात पश्चिम घाटात, स्वच्छ ओढयांच्या प्रवाहात सापडणारी. मग ती पुण्याजवळ कशी? या दोन्ही मजेशीर गोष्टी म्हणजे चुकीचं identification. Great Emerald Spreadwing खरं तर Clear-winged Forest-Glory होती आणि Malabar Torrent Dart खरं तर Black-winged Bambootail होती! मग हळूहळू कळू लागलं, की चतूर आणि टाचण्या हे पक्ष्यांपासून भिन्न आहेत. त्यांना बऱ्याचदा पकडावं लागतं आणि सुक्ष्मदर्शीखाली न्याहाळावं लागतं. बऱ्याच लोकांनी सांगितलं की फ्रेझरची पुस्तके वाचा. मग हळू-हळू त्या पुस्तकांचा अभ्यास करून काय योग्य-काय अयोग्य ते सुद्धा कळू लागलं.

कवडीच्या अतिप्रदुषित नदीच्या काठाने बरीच बाभळीची झाडं-झुडपं आहेत. तिथे पहिल्यांदा Coral-tailed Cloud-Wing (नभपंख?) पाहिला. फार सुंदर चतूर. दोन्ही पंखांवर त्यानं सुंदरसे दोन निळे ढग पेललेले. शांत बसलेला. सरळ अगदीच काठीसारखा. आणि मग थोडं अजून पुढे गेल्यावर Asiatic Blood-tail (लाल-शेपट्या?). या लाल-शेपट्याची समाधी अवस्था मला फार प्रिय आहे. शांत, एके ठिकाणी बसून राहणार आणि अचानकच झपाट्यात किडे पकडून पुन्हा त्याच काठीवर. उत्तर अंदमानात, चालीस एक मधे मी २०११ मधे काम करायचो. तिथे दररोज संध्याकाळी आमच्या कॅम्पच्या थोड्या वरच्या अंगाला थोडी मोकळी जागा होती. आजूबाजूला गुहाच गुहा. त्या मोकळ्या जागेत सुर्य मावळू लागला की मी येऊन बसायचो. दिवस संपत आलेला असायचा. मी बाजा हातात धरून ठेवायचो आणि वारा वाहू लागला की वाजवायचो. घर दूर होतं. तिथे एक लाल-शेपट्या यायचा, दर संध्याकाळी. त्याच जागी, दररोज. त्याची बसण्याची जागा ठरलेली. छानशी लाल शेपूट होती त्याची. एकटाच नर होता. यायचा-बसायचा-उडायचा-जेवढं शक्य असेल तेवढं खाऊन घ्यायचा. अंधार पसरू लागला की अचानक गायब व्हायचा. हे सलग पंचवीस दिवस चाललं. मधे एक-दोन दिवस फार पाऊस झाला, त्यावेळी डोक्यावरचं छत सोडून जायची इच्छा नव्हती. पंचवीस दिवसांनंतर मी दुसऱ्या कॅम्पवरती गेलो. आठवड्याभरानंतर परत आलो, तेव्हा तो कॅम्पच्या अगदीच जवळ दिसला. त्याच्या बरंच जवळ जाऊन फोटो काढले. एवढ्या साऱ्या दिवसांत मी त्याला एकट्याला सोडलं तर इतर कुठलाच लाल-शेपट्या नाही पाहिला त्या बेटावर कधी!

या चतूर-टाचण्यांचं वेड हळूहळू लागलं मला. बरेच मजेशीर अनुभव आहेत. २०११ मधे उत्तर अंदमानातल्या इंटरविव्ह बेटावरती पाहिलेल्या सुंदर टाचण्या. तिथे वाहणारा एक गोड्या पाण्याचा ओढा, समुद्राला अगदीच लागून. त्या ओढ्याच्या आजूबाजूला हत्तींचे ठसे, अगदीच ताजे. माझे डोळे कॅमेऱ्यात, पाय निदान गुडघ्या-एवढ्यातरी चिखलात रूतलेले. जस्टिन- माझा field assistant ओरडून-ओरडून थकलेला, “सर, चलो. हाथी आयेगा!”. कसेबसे तिथून बाहेर पडलो आणि नावेत बसलो, तर बहाद्दर सांगतो मला की त्यानं हत्ती अगदीच तीसेक फुटांवरती पाहिला. झुडूपामागून पाहत होता तो मला नि जस्टिनला. २०१३ मधे पारपोलीला एका छानशा ओढ्याच्या मध्यभागातून चालत होतो. आजूबाजूला Malabar Torrent Darts उडत होत्या. ओढ्याला चांगलाच प्रवाह होता आणि गळ्यात दुर्बिण नि मोठाला कॅमेरा घेऊन चालणं कठीण झालं होतं. सॅण्डल्स किनाऱ्यावरतीच सोडल्या होत्या. चालता-चालता पाय सटकला आणि पाण्यातल्या दगडावर आपटलो. दुर्बिण भिजली, पण कॅमेरा वाचला! २०१३ मधेच कोयनेच्या काठी वसलेल्या अरव गावात सर्व्हे करत होतो. कोयनेच्या धरणाच्या पाण्याच्या काठाकाठाने फिरत होतो. एक अगदीच वेगळी टाचणी दिसली. वाटलं, हे काहीतरी खास आहे. दुर्बिण नि कॅमेरा घेऊन हळूहळू तिच्याकडे सरकू लागलो. अगदीच उतार होता आणि बराच चिखल होता. अचानकच पाय घसरला आणि मी अख्खाच्या अख्खा धरणाच्या पाण्यात. पाणी गार होतं आणि चांगलंच खोल होतं (20 फुट?). सुदैवाने घसरताना मी दुर्बिण काठावर ठेवू शकलो, पण कॅमेरा माझ्यासकट पाण्यात गेला. बाहेर लगेच येता आलं नाही. काठावर कुठे धरायला काही दगड-धोंडे नव्हतेच. फक्त चिखल होता आणि जिथे जिथे पकडायचा प्रयत्न करायचो तिथे-तिथे सटकायचो. कसा-बसा कॅमेरा काठावरच्या एका झाडाला लटकवला आणि चिखलातून सरपटत काठावर आलो नि मग तसाच सरपटत तो सगळा चढ पार केला. एक लांब काठी आणली आणि झाडावरचा कॅमेरा मिळवला. ती गूढ टाचणी काही मिळाली नाही, कॅमेरा मात्र त्यादिवशी उन्हात वाळवत टाकावा लागला! 

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४

यमास

प्रिय यम-देवा,

तसं प्रिय म्हणण्याएवढा आपला-माझा संबंध नाही. कधी भेटही नाही झाली नि झाली तरी कळणार नाही असं वाटतं. पत्रास कारण की, मनात दडवून ठेवलेली भिती सतत आज-काल स्वप्नांतून खरीखुरी समोर येत राहते. आपण आसपासच कुठेतरी फिरत आहात असा भास होतो. कितीही निर्जीव असले आमचे दगडाचे देव, तरी अंधारात डोळे आंधळे झाले असताना मनाच्या अंदाजानेच प्रवास करावा लागतो. असा प्रवास करत असताना, दररोज मी आपल्याच सहवासात डोळे बंद करून स्वप्नं पाहत राहतो असंच वाटत राहतं. प्रयोजन काय आहे नक्की? माझ्या जवळच्यांचे नि माझे धागे तोडायचे आहेत की आयुष्याची किंमत पटवायची आहे मला?

नश्वर जगात सध्यातरी अमर काहीच नाही. मला हे ही माहितीय की मृत्युची भिती सगळ्यांनाच असते, काठावर उभं राहून नदीपल्याड जळणारी चिता पाहून मन विचारांत गुंगणं हे ही विशेष नाही. स्वत: चिता होऊन जळू शकत नाही, ती जाणीव जिवंत राहू शकत नाही. रोज रात्री स्वप्नात मी जिवंतपणे ती एकाकीपणाची जाणीव जगत चाललोय. प्रयोजन काय आहे? माझ्या मनाची तयारी करायची आहे का तुम्हाला? कुणी म्हणतं उशीखाली सुरी घेऊन झोप; कुणी म्हणतं हनुमान-चालीसा म्हण. म्हटली असती, सुरी ठेवली असती आणि स्वप्नं पण बंद झाली असती कदाचित. मग जो अंधारात डोळे आंधळे झाले असताना तुमचा कानोसा लागायचा तो ही बंद झाला असता. देवाच्या कानोशावर माझी श्रद्धा आहे, ती जिथे सिद़्ध होते, ती माझी स्वप्नेपण मी कसा काय हिरावून जाऊ देऊ? मी चितेच्या ज्वाळांत माझ्या आवडीच्या देवांना यापुर्वीही बरेच प्रश्न विचारलेत. मी निर्जीव देहांवर बरसणाऱ्या अश्रूंबद्दल कित्येक देवांना मृत्युबद्दल उलट-सुलट प्रश्न विचारलेत. समुद्रावर एकट्याने प्रवास करताना आणि पर्वतांवर घोर जंगलात रात्र सारताना महादेवाला माझ्या जगण्याबद्दल जबाबदार धरलंय. मी मनाच्या आकुंचन-प्रसरणाबद्दल हनुमानाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलंय. मी आभाळात बघून अल्लाला असण्या-नसण्याचे प्रश्न विचारलेत. माझी श्रद़्धा तात्पुरती आहे, पण आहे. मी देवळांत जाऊन देव पाहिले नाहीत, पण गाभाऱ्यांना स्पर्श केला आहे. मी कीर्तनांतून देवाची कौतुकं ऐकली फार, पण विश्वास मनाच्या कर्ते-नाकर्तेपणावरच ठेवला आहे. माझ्या विचारांवर सध्या जे तुम्ही गारूड घातलंय, जे प्रश्न निर्माण केलेत, ज्या जाणीवांतून तुम्ही माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे पाट वाहवत आहात, त्या साऱ्याच गोष्टींचा जाब मी स्वप्नांत नाही विचारू शकत. तुम्ही त्या स्वप्नांत असता, पण समोर चालू असणाऱ्या घटनांच्या मी इतका जिवंतपणे स्वाधीन झालेलो असतो की तेव्हा तुमचा विचारही डोक्यात येत नाही. ज्यावेळी डोळे उघडून पाणी पितो नि घामेजलेल्या अंगाने बिछान्यावर जाऊन बसतो, तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली असते. बाल्कनीत जाऊन उभा राहतो, वारा थंड वाहत असतो. दूरवर घरात अजूनही दिवे सुरू असतात. स्वप्नांना घाबरणारी माणसं, झोपेला टाळत असतात. मी म्हणतो, स्वप्न होतं. स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या नसतात. जुने संदर्भ नि नवे रस्ते तयार झालेले असतात. कुणी कधी काळी भेटलेली लोकं, अचानक डोळ्यासमोर तरळून जातात. मनातल्या जखमांच्या खपल्या अधून-मधून निघत राहतात. काय करायचंय, स्वप्नात जगून?

स्वप्नात जे दिसतं ते सत्य मानलं, तर मग मला तुमचा सहवास प्रिय आहे. मला तुमच्या मनातला त्रयस्थपणा आदरणीय वाटतो. कोण माणूस जगापासून अलिप्त राहून असली कामं करेल. यम देवा, तुमचेही प्रिय-अप्रिय सारेच कधी ना कधी अनंतात विलीन होणारेत. झालेही असतील. तुमच्याही डोळ्यांतून अश्रूंचे पाट वाहिले असतील. तुमचा तसंच काही प्रयोजन असेल, तर धन्यवाद. तुम्ही जर मला माझ्या स्वप्नांतून सत्य दाखवत असाल, तर मी आपला आभारी आहे. आभारी या करिता कारण मृत्यु या वरवर फुटकळ वाटणाऱ्या विषयाची जाणीव जोपर्यंत तो स्वत:वर ओढवत नाही तोपर्यंत मला होणार नाही; आणि ती तुम्ही स्वप्नांमार्फ़्त करता आहात. आणि हे सर्व जर असत्य असेल, तर माझ्यात नि नदीपलीकडची चिता बघून मृत्युचा विचार करणा़ऱ्या एकट्या जीवात काहीच फरक घडणार नाही. मी उशीखाली सुरी ठेवून तुमचा अपमान करणार नाही, आता कितीही वेळा स्वप्नांत अश्रूंचे पाट वाहिले तरी. मनाच्या गाभाऱ्यातून माझ्या डोळ्यांसमोर जर तुम्ही माझेच विचार मांडता आहात, तर बघू बरं अजून कोणकोणत्या जाणीवा बाकी आहेत. काल मी पंधरा वर्षे वेळेच्या पुढे निघून गेलो होतो आणि त्याच्याही पुर्वी काही दिवसांकरिता. बघू बरं, वेळेच्या किती पुढे मनाची मजल जाऊ शकते. बघू बरं कितपत हे मन जोर धरू शकतं. बघू बरं, अजून मनाचे किती दरवाजे उघडायचे बाकी आहेत.
पत्रास उत्तर आज रात्री स्वप्नात देणे.

कळावे,
एकटा

image from - http://www.reddit.com/r/Smite/comments/1yw0yv/god_concept_yamraj_god_of_death_summoner_tank/

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०१४

चंद्रकोर

अमावस्येच्या संध्याकाळची गोष्ट आहे. गोष्ट आहे, पण खरी आहे. गोष्टीच्या खरेपणाला अमावस्येच्या संध्याकाळची साक्ष आहे. तेव्हा बागेत गुलाब फुलले होते, होते ते लालजर्द होते नि नव्हते ते कळ्यांत फुलण्याची स्वप्नं घेऊन जगले होते. वारा मंद होता नि खिडकीत अडकवलेल्या विण्ड-चाईम्सना तासभर तरी छेडत राहिलेला. खिडकीशेजारच्या पलंगावर प्रियकराच्या कुशीत प्रेयसी झोपलेली नि तिच्या मनात खोलवर प्रियकराची असंख्य मनं गुंतून राहिलेली. दोघांच्याही अंगावर शहारे ताजे होते, जे होते ते सारेच प्रेमाचे नजारे होते. तिच्या केसांच्या घनदाट सुवासात प्रियकर हरवलेला नि त्याच्या हनुवटीच्या कड्यावर प्रेयसीचा माथा विसावलेला. किर पोपट थव्याने घरट्याकडे परतत होते, सुभगाच्या शिळा मंदावत चाललेल्या आणि. संध्याकाळ निळसर जांभळी केशरी होऊ पाहणारी, सुर्याच्या असंख्य मनात प्रेमाचे अविष्कार आणि. टेकड्या-टेकड्यांवरती फुलपाखरं झोपेला आलेली, चतुरांची अजूनही पाण्यावरती मुक्त क्रिडा चाललेली. गवता-गवतातून टाचण्या निजलेल्या, संध्याकाळ रानावरती पांघरूण ओढत चाललेली, लेकरांना निजवायला.

प्रियकराने प्रेयसीच्या गालावर फुंकर मारली, तेव्हा प्रेयसीची झोप चाळवली. तिने डोळे किलकिले करून रंगांचा अंदाज घेतला. मोगऱ्याचा मंद सुगंध नि सतारीचा नाद. तिने प्रियकराला अजूनच घट़्ट मिठी मारली. त्याला घट़्ट मिठी मारली तेव्हा गार वारा सुटला; मोगऱ्याचा सुगंध सैरभैर झाला; पक्षी एक-दोन भरकटले-गेले चित्रातून; खिडकीचे दरवाजे आणि तीन वेळा टाळ्या वाजवून सताड उघडे राहिले; संध्याकाळ गोठत गेली नि तिचे नानाविध रंग जाऊन ती काळ्या रंगाशी एकरूप होत गेली; शहारे मोजकेच उरले-पण उरले ते अंतरंगात उरले-विरले ते अंतरात विरले; पिंगळे बोलू लागले नि पिंपळ-पाने सळसळू लागली; पिंपळाच्या टोकावर एक दयाळ, श्याम होऊन एकटाच, वाजवत राहिला बासरी. डोळ्यात डोळे घालून प्रेयसी म्हणाली, प्रियकराला-“चंद्रकोर किती छान असते रे! तू लिहशील का चंद्रकोरेवर कधी? (माझ्यासाठी?)”

“रात्र गर्द होईल तेव्हा नि चंद्र हरवत जाईल-विसरत जाईल-हळवा होईल-आसुसत जाईल चांदण्यांसाठी तेव्हा तो ओढून घेईल रात्रीला अंगावरती नि तिच्या मिठीआडून पाहत राहील ब्रम्हांडाकडे अलिप्तपणे. त्याला नसेल इच्छा मोठं होण्याची, नसेल इच्छा झळाळून निघण्याची तेव्हा. तो रात्रीच्या मिठीत आक्रंदणार नाही, ती आई आहे, थंड असली तरी चंद्राएवढी शीतल नाही, तिच्या मिठीत मायेची ऊब आहे, पण हरवत चाललेल्या प्रेमाची कसर ती कितपत भरून काढणार? चंद्र तेव्हा एकटाच असेल नि चांदण्याही एकट्याच हरवलेल्या. तो म्हणेल, मी कुणासाठी होऊ मोठा? कितपत नि कसा होऊ मोठा? आपण तेव्हा पृथ्वीवरून चंद्रकोर पाहत राहू नि तिच्या केशरी किनाऱ्यावरती आपलं घर वसवत राहू. चंद्राला एक कळत नाही, ज्या पांघरूणाखाली-ज्या मिठीत तो सामावून गेलाय, त्यातच चांदण्याही हरवल्या आहेत. सगळेच बिलगून नसले, तरी जवळ आहेत. आज तू माझ्या जवळ असलीस-बिलगून असलीस तरी आहेस ब्रह्मांडातच तरूण. चंद्राला माहितीय आणि की, लपून-मनात जपून प्रेम मिळत नाही-वाढत नाही. ते शोधावं लागतं-ते मिळवावं लागतं-ते अनुभवावं लागतं-नि राखावं लागतं. आजची चंद्रकोर, उद़्या इतकी सुंदर नसणार; पण सुंदर नसली तरी चंद्राचं असं व्याकूळ होणं सुंदर आहे. जगात किती किंचीतसं प्रेम उरलंय-पण उरलंय त्यावर जग किती सुंदर सुरूय. चंद्रकोर बघताना तुझ्या डोळ्यांची चंद्रकोर आठवते-मी दूर जाताना, मी पाहिलंय तिला. तिला आजचा विरह नाही सहन होत-पण अजब आहे, ती दिसतेच मुळात सुंदर. ती दिसते तेव्हा तिला माहिती नसावं कदाचित की बोलून-लिहून जितकं प्रगट करता येत नाही तितकं प्रेम ती नुस्त्या एका चंद्रकोरीने उधळते. आणि चंद्रकोर पुढे जाऊन पौर्णिमा निर्माण करते, तेव्हा चंद्र उरतो एकटा नि चांदण्या हरवतात. हे दिसतं सगळं आपल्याला. विरह आहे, म्हणून प्रेम आहे. प्रेम आहे-म्हणून विरह सहन नाही होत. विरह सहन नाही होत, म्हणून चंद्रकोर तयार होते.”

प्रियकर उठला नि दाराकडे निघाला. खोलीभर तेव्हा अंधार गडद झालेला नि चंद्रकोर एक आभाळात नि दोन खोलीत, केशरीसर कडा लेवून अवतरलेल्या…
पंकज कोपर्डे

२ नोव्हेंबर २०१४       

रविवार, २७ जुलै, २०१४

स्वप्नदशा


फडफडणाऱ्या डोळ्यांमागे अनंत विश्वं गोठून राहिलेल्या गोष्टी पावसाळी संध्याकाळी बाहेर येऊ लागल्या. चाहूल लागली की, अस्पष्टशा हाका ऐकू येताहेत आणि स्वत:चं भैतिक अस्तित्व विसरून गेलेल्या शरीराला दचकवणारे स्पर्श होताहेत. वीण घट़्ट होती नि अंतर फार होतं. बाहेर पडायचा रस्ता आत शिरणाऱ्या रस्त्यापेक्षा अगदीच वेगळा होता. शेवटी घट़्ट अंधार दिसला नि मिट़्ट डोळे खाडकन उघडले तेव्हा स्थळ-काळाचा संदर्भ पावसासारखाच तोही विसरून गेला होता. जुनाट टेलीफोनची घंटी वाजत होती. अंग चिंब झालं होतं. तो झोपलेला तिथेच वरती दांडीवर वाळत घातलेली पॅण्ट सटकून त्याच्या पोटावर पडलेली. तो उठून बसला. एकामागोमाग एक असे कितीतरी दरवाजे उघडत आत-आत जायचा प्रयत्न होता. रंग नसलेली स्वप्नं होती, होती ती खरोखर घडलेली. भूतकाळात जवळची असणारी ठिकाणं, वास्तू, रस्ते, प्राणी, लोक. त्यात काही नव्याने बनवलेली आणि मागे कित्येक दिवसात दिसलेली ठिकाणं. झोपलेल्या शरीरात स्वत:ची अशी समांतर चालत असणारी गोष्ट. अगदीच समांतर. त्या स्वप्नांत अगदी आतून वाटणारं सुख आणि दु:ख. त्या घेऱ्यात अडकून राहण्याची त्याला झालेली इच्छा आणि एका क्षणात त्या साऱ्या जगांशी आणि जागांशी तुटलेली नाळ आणि आलेली जाग. हे झालं तेव्हा कुणीतरी आपल्याला धरून बाहेर ओढून काढतंय असं वाटलं त्याला. कुणीतरी प्रचंड शक्तीच्या व्यक्तीने बखोट धरून कुणालातरी विहीरीतून खेचून काढावं तसं. प्रचंड तहान लागलेली, त्यानं पाणी घटाघटा पिलं आणि तो दरवाजा उघडून घराबाहेर आला. पाऊस मुसळधार. संध्याकाळ गडद. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ओहोळ आणि कौलारू घरं पावसात चिंब. त्यानं हात पुढे केला आणि पावसाचं पाणी हातावर. ओंजळ केली नि तो तसाच पावसाचं पाणी पिऊ लागला, मघाची तहान शमल्यासारखी वाटत नव्हती. त्यानं तोंडावरून हात फिरवला. घरात आई आहे का याची चाहूल घेतली त्याने, त्याला बांगड्यांचा आवाज ऐकू आला. मग तो निवांत दाराच्या चौकटीवर रेलून पाऊस बघत उभा राहिला. आई काहीतरी छानसं खायला बनवत होती. भजी? त्या वासानं त्याला फार प्रसन्न वाटलं. स्वयंपाकघरात रेडिओ चालू होता. तो स्वयंपाकघरात शिरला आणि आईजवळ जाऊन उभा राहिला. तिनं वळून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटली, “काय रे तहान लागलीय का?” टेलिफोनची घंटी अजूनही वाजतच होती. त्याचं वीस वर्षांपुर्वीचं आई हयात असतानाचं कोकणातलं घर ठिकठिकाणी गळू लागलं होतं.
पंकज कोपर्डे
२७ जुलै २०१४