रविवार, ६ जुलै, २०१४

पाऊस


गुंते सोडवत बसलेल्या मनाला पागोळ्यांत अडकायला होतं. पावसाची चाहूल लागली की धड इकडे ना तिकडे, ते बावरं होऊन धडपडायला लागतं. शरीर मोठं झालं, पण मन नि पाऊस लहानंच उरलेत. लहानपणी संध्याकाळी खेळायला बोलवायला येणाऱ्या मित्रांच्या हाकांकडेच सतत लक्ष असायचं आणि अभ्यासाचं वाचन दिखाव्यापुरतं. ते मित्र संसारात बुडाले. काही तळाला गेले, काही गटांगळ्या खात राहिले. अभ्यासही प्रचंड न संपण्याएवढा, आणि स्वत:च्या उत्कर्षासाठीची कामं, भारताच्या सध्याच्या लोकसंख्ये एवढी. अनंतात विलीन होणारी कमी, जन्मणारी जास्त. संध्याकाळ थोड्या-फार फरकाने बदलली तरी तिच्यावरचा विश्वास ढळला नाही. आजवर ज्या-ज्या ठिकाणी फिरलो, त्या-त्या सर्व ठिकाणी ती स्वत:च असं एक वैश्विक अस्तित्व घेऊन प्रगटली. किर्रर्र जंगलं असो, समुद्र-किनारे असोत, ट्राफिकाळलेले रस्ते असोत, शांत घर असो की कॅफेटेरियातल्या गप्पा असोत. ती सतत तिचं देवीत्व घेऊन पसरली, तास-दीड तास का असेना. मनाला खात राहिली. असण्या-नसण्याचे प्रश्न उपस्थित करत राहिली. लिहायला भाग पाडत राहिली. ती दररोज येत होती, तशी भिती वाटत राहिली की सवयीची तर होऊन जाणार नाही ना? ती दररोज येत राहिली, तरी दररोजच काही प्रश्न, कविता, गाणी, लेख नव्हतो लिहीत मी. काही वेळा वाटलं की सकाळी उठून ब्रश करत बसण्यासारखं आहे हे. फार पुर्वीपासूनच नस्ती सवय लावली, तर आज एक दिवस ब्रश चुकवला तर वाटणारी घाण नस्ती वाटली. लहानपणीही संध्याकाळच्या हाकेला ‘ओ’ नस्ती दिली, तर आज वाटणारी आपुलकी नि प्रेम नस्तं वाटलं कदाचित. पाऊस येतो, तेव्हा पाऊस येतो. एकटाच. संध्याकाळ नुस्ती रंगापुरती मर्यादित राहते किंवा तिच्या नेहमीच्या घडण्याच्या वेळेनुसार इकडे मनात चल-बिचल होत असते, तेवढंच. जेव्हा पाऊस येतो, तेव्हा मनाची समाधी भंग पावते. ते त्याच्या मांडी घालून बसलेल्या वैचारिक मुद्रेतून अगदीच कोलमडून जातं. गारठा जाणवतो, गरम चहा-कॉफीची जाणीव होते. खिडकीत उभं राहून कितीतरी वेळ मोकळे झालेले रस्ते, तुरळक माणसं बघत राहतो. तांत्रिकदृष्ट्या पाऊस म्हणजे आभाळातून पडणारं पाणी. पण या पाण्यात सोडवायला मन असंख्य गुंते हुडकून काढतं. त्यात आठवणी असतात, जन-माणसांचे प्रश्न असतात, जगाचे प्रश्न असतात, प्राणी-पक्ष्यांचे प्रश्न असतात, पाण्याचे प्रश्न असतात. एका अखंड चालणाऱ्या चक्राचा माझं आयुष्य म्हणजे एक मोजताही न येण्याइतका छोटा भाग. किती पावसाळे पाहिले असतील या पॄथ्वीने? माझी झेप ती किती? त्या माझ्या आयुष्यातही, अजून कितीक लहान भाग. भूतकाळाचा पट़्टा, अगदी कालपासून किंवा अगदीच या गेलेल्या सेकंदापासून सुरू झालेला; गल्ल्या-गल्ल्यांतून जाणारा. थोडं मागं वळून पाहिलं तरी आता दिसत नाही, इतका काळोखा. त्यातही पाऊस कोसळणारा. त्या पट़्ट्यावर कित्येक ठिकाणी जवळपास वर्षभराच्या अंतरावर उभ्या असलेल्या माझ्या छब्या आणि थोडा-फार तोच पावसाचा निनाद आणि मनात घोळणारे विचार…मोकळे झालेले रस्ते, तुरळक माणसं, शांत होत चाललेलं जंगल, पागोळ्यांचे आवाज, बेडकांचे आवाज, जोर-जोरात किनाऱ्यावर कोसळणाऱ्या लाटा. संध्याकाळ मनाला फार मोकळं करून सोडते, पाऊस त्यावर आरूढ होतो. संध्याकाळ खेळायला बोलवते, पाऊस त्याला स्तब्ध राहून विचार करायला भाग पाडतो. एरव्ही स्वत:चा विस्तार आणि महत्त्व वाढवत चाललेल्या मनाला, पाऊस स्वत:च जखडून टाकतो. तो परिस्थितींना जखडून टाकतो. मग कधी मी जंगलात अडकतो, कधी समुद्रानं भरत आलेल्या बेटावर, कधी स्वत:च्या छानश्या घरात किंवा कधी कॅफेटेरियात नुक्त्याच प्रेमात पडलेल्या मैत्रिणीबरोबर. पाऊस म्हणतो, मला हवं तोपर्यंत तुझी सोडवणूक नाही!
पंकज कोपर्डे
६ जुलै २०१४

मंगळवार, १ जुलै, २०१४

स्थलांतर


हे कित्येकदा घडलंय की मी किंवा ती लांबच्या प्रवासाला निघतो-अमर्यादित काळासाठी आणि निघताना मन आक्रंदून जातं. भिती दाटून येते. आतल्या आत गलबलतं, तोंडावर फारसं येत नाही. अंगातलं पुरूषी स्वत्व सर्वकाही दाबून टाकायचा अतोनात प्रयत्न करत राहतं. एक अशी सुटी-सुटी भावना उरत नाही. सगळा कल्लोळ माजतो. प्रवास पुढचा सगळा एकट्यानं करायचा असतो. यापुर्वीही सतत एकट्यानंच प्रवास होता; पण प्रवासाला निघण्यापुर्वी तिनं मारलेली मिठी क्षणार्धातच मनाला विरघळून टाकणारी. शरीरानं एकटं असणं अनुभवलंय, पचवलंय कित्येकदा; पण मनानं एकटं असण्यासारखी वेदनादायक गोष्ट नसावी. एकलकोंड्या शरीराला मनानच समजूत घातली होती आजवर परिश्रमाची, प्रसंगांची आणि प्राण जपून ठेवण्याची. मन ज्या-ज्यावेळी एकटं पडलं, त्या-त्यावेळी शरीर निश्चल बसण्याव्यतिरिक्त विशेष काही करू शकलं नव्हतं.
मैत्रिणीला रस्त्यावर सोडून ज्या-ज्यावेळी प्रवास सुरू होतो, त्या-त्यावेळी शरीर निश्चल बसून राहतं. तिच्याबरोबर घालवलेल्या वेळात कधी वाटलं नव्हतं-न उलगडणाऱ्या कविता होत्या, तळ्यात-मळ्यातच्या गोष्टी होत्या आणि हट़्टी भांडणांचा पसारा होता. माणूस जवळ असताना किंमत हरवत जाते की काय त्याची? आणि ही मनाला एकटं पाडणारी माणसं, आयुष्यातली खरंच फार-फार महत्त्वाची असतात की काय? असावं-असेल. माझ्या सतत कामांत डुंबलेल्या मनाला एकाकी करून सोडणारी गोष्ट खरंच काहीतरी अतिमहत्त्वाची असावी. प्रवास जरी काही किलोमीटर्सचा असला तरी स्थलांतर फार मोठं होतं. मी माझ्या जगातून खूप-खूप दुरून पुण्यात येतो. ती तिच्या जगातून माझ्याजवळ येते. तुझ्या-माझ्या म्हणत दोघांच्या झालेल्या घरात दोघांच्या बनलेल्या जगात पुढचे कित्येक दिवस जातात. तिथून निघता येत नाही…निसटावं लागतं. त्या प्रेमाच्या वर्तुळात रमलेलं मन मग गटांगळ्या खाऊ लागतं. गाडी सुरू होते, ती हात हलवत राहते, हवा सारवत राहते, तिला डोळे भरून पाहून घेतो. पन्नास किलोमीटर्समधे आणि आठशे किलोमीटर्समधे फारसा काही फरक उरत नाही. पुढच्या भेटी ठरलेल्या नसतात. दोन चिकटलेली आयुष्यं सुटी होऊ लागतात. मन एकटं पडतं. या प्रवासाला सरावलेल्या दगडासारख्या प्रवाशांकडे बघून अजूनच खटटू होतं. अटळ प्रवासाला सुरूवात झालेली असते. निरोप देताना मैत्रिण हात हलवून झटक्यात वळून निघालेली असते. वेडीय ती. डोळ्यातली आसवं दिसू नयेत म्हणून किती काळजी घेते. एकमेकांना समजावणारी मनं दोन दिशांना लांब-लांब जात राहतात. मनाचा गहिवरलेला जड ढग होतो, जांभळसर रंग आभाळभर होतो. हे कित्येकदा घडलंय.
पंकज कोपर्डे
१ जुलै २०१४ 

मंगळवार, २७ मे, २०१४

बेटाळ



जोराचा वारा आला तसा मी घरात येऊन कोपऱ्यात जाऊन बसलो. खिडक्या धडा-धडा हलू लागल्या नि समोरच्या झोपड-पट़्ट्यांमधले पत्रे फाड-फाड उडू लागले. कागद़्याच्या होड़्या बनवून वाऱ्यावर सोडाव्यात असं वाटलं. वाटलं की खिडकीच्या चौकटीतून त्या एकट्याच रडणाऱ्या कुत्र्यावर नेम धरून दगड फेकावा. समोरचं कारण नसताना उभं असलेलं निलगिरीचं झाडं पाठीत काड़्कन मोडून कुत्र्यासारखं पडावं. चौकात उगाच जगत असलेलं एक तीन पायांचं गाढव या वाऱ्याच्या भरात मरून पडावं. सगळाच घन कचरा वाऱ्याने उचलून दूर कुठेतरी नेऊन टाकावा किंवा गिळंकृत करून टाकावा. पाऊस आला की तुंबणारी गटारं नि रस्त्यांवरून बिनकामाची तोंड वर करून फिरणारी माणसं; एकजात प्रायव्हेट क्लासेसला जाणारी पोरं आणि तासनतास मोबाईलवर अडकून पडलेली शरीरं; भिकाऱ्यासारखं रस्त्यावर खात रस्त्यावरतीच प्लास्टीकचे ढीग टाकणारी मानव-जमात. एकसाथ सगळाच कचरा न्यावा त्यानं नि ओतावा जिथं कमीय तिथे. पाच-सहा वर्षांतून तरी एकदा केला पाहिजे निसर्गाने हा कार्यक्रम. मग वारा अचानकच थांबला नि पाऊस सुरू झाला. जोराचा लागला. पहिल्यांदा मातीचा सुगंध आला नि बाहेर पळत जाऊन रस्त्याकडेचं थोडं ओलं माळ जाऊन चाटण्याची अनिवार इच्छा झाली. उगाच मोठा झालो नाहीतर माती खाता आली असती. रडणारं कुत्रं भिजू लागलं म्हणून आडोश्याला जाऊन गप्प बसलं. निलगिरीचं झाड जिराफ़ाच्या मानेसारखं इकडून-तिकडून हलत राहिलं. रस्ते मोकळे होऊ लागले नि माणसं आडोश्याला जाऊन उभी राहिली. केर एका बाजूला केल्यासारखी. किती तो घन कचरा? शरीरांचा-मनांचा-आत्म्यांचा-आठवणींचा-विचारांचा-लिखानाचा नि त्यावरच्या मीमांसेचा-चित्रांचा-गाण्याचा-शब्दांचा! म्हटलं मरू दे, हे असं चार ओळी लिहून मनासारखं कधी घडत नाही. ते तसं लिहीणं सुरू केल्यापासून संपेपर्यंत आपल्याला काय म्हणायचं होतं, तेही नीटसं कळत नाही. आपल्याला जो अर्थ अभिप्रेत असतो, तो इतरांना कळतोच असं नाही आणि त्यांना जो कळतो, तो बहुधा आपल्या गावीही नसावा! कागदावर, आहेत चोरलेले मार्कर्स जवळ म्हणून, मारत बसलो रेघा नि वाटलं आपण अंदमानातल्या इंटरव्हिव आय-लॅण्डवरती जाऊ. त्याची रूपरेषा काढली, नि हवी नको ती ठिकाणं काढत राहिलो. समुद्राच्या पाण्याने आतवर मुसंडी मारलीय असं दाखवू, दोन छोटी-छानशी तळी दाखवू, एक सुंदरसा ओढा दाखवू, मानवी वस्ती दाखवू नि काय-काय. जेव्हा चित्र संपलं तेव्हा ते अगदीच माझ्यासारखं दिसू लागलं. मी शप्पथ सांगतो, मी असं ठरवून नाही बनवलं. अगदीच कचरा…एखादं रोगट तोंड असाव्ं असं काहीसं. चिडचिड झाली नि वाऱ्याने खिडकीतून आलेला कचरा झाडूने साफ करत राहिलो. बराचसा कचरापेटीत टाकला, थोडा बाजूला सारला. झाडू ठेवला. थोडा वेळ ते चित्र पाहिलं. काय असेल माझ्या मनात हे येण्यापुर्वी नि हे असं येताना? काय असेल त्या रडणाऱ्या कुत्र्याचं दु:ख नि त्या निलगिरीच्या अस्तित्वाचा अर्थ? का ते मोबाईलवर लटकलेले आत्मे अजूनही श्वास घेत आडोश्याला उभेत? का मी सतत बेटाळ होत चाललोय या माणसांच्या गर्दीत? उठलो, बाजूला सारलेल्या कचऱ्यात दोन रबर-बॅण्ड्स, यू-पिना नि एक पेन्सिल पडलेली. ते उचललं-झटकलं नि त्यांनाही त्यांच्या-त्यांच्या परिचयाच्या गर्दीत सोडून दिलं निवांत.
पंकज कोपर्डे
२७ मे २०१४   


शनिवार, १५ मार्च, २०१४

एकांत


एकाचा अंत. किनाऱ्यावर चालणारे असंख्य पाय नि त्यातही वेगळीच उमटलेली एक ओळ. तिला तुडवून गेलेले कित्येक गोरे-काळे तळवे नि आजूबाजूला पसरलेली वाळू. त्यात रांगणारे खेकडे. चिखल चाळणारे नि किडे खाणारे. मला आता रस नाही. वाट एकटी नि माणूस एकटा. गाठ पडली तरी नकोय नि गाठ पडलेली पण नकोय. छातीत खोलवर घुसलेला सुरा अगदी आतून पाठीपर्यंत टेकलेला. त्यावर आता रक्तवाहिन्यांचं किती जंजाळ पसरलंय, देवच जाणे. पडक्या-उघड्या देवळांवर वेली चढतात न जंगलात. आणि जगतात ना. जगतात ना…निवांत का कसं ते!
खरं तर एकांतात मजा आहे की कसं, ते कळत नाही, मैत्रिणी.
एक तो समुद्र एकटा नि उगाच अवास्तव वाढलेला. एक ते आभाळ एकटं नि उगाच अवास्तव वाढलेलं. मग आपणही वाढवावा आपला विस्तार…की कसं? सगळं जगच घ्यावं व्यापून नि ठरवावं की हेच अखंड…मग कुठून येतील वाटा नि कुठल्या पडतील गाठी? उदाहरणच द़्यायचं झालं तर वेळेकडं पहावं. तो एक माणूस समुद्र नि आकाशापलीकडचा. थोर. अखंड, अथांग नि पसरत चाललेला अगणित. त्याचे तुकडे वाटतात लोक, आयुष्यांसाठी, आयुष्यांतून. नि मग बसतात उगाच रडत किंवा हसत. एकांताला गहिरा अर्थ आहे. मी ज्या-ज्यावेळी समुद्राकडे पाहतो, तेव्हा मनात लाटा सुरू होतात. येतात-जातात, माती घेऊन जातात, कचरा घेऊन येतात. मनाचं क्षरण सुरू होतं नि समुद्राला मी शरण येतो. हे आपसूकच घडतं. मी कधी एकांतात रमेन का? स्वत:ला तेवढा अवाढव्य बनवू शकेन का? नाही वाटत…पण करावं वाटतं. जो हे करू शकेल तो जग जिंकला. स्वत:ला इतकं मोठं करावं की जग व्यापून घ्यावं. माझा फुगा कितपत फुगेल, नाही माहिती. फुगला जास्त तर फुटेल याची भिती मात्र जास्तंय.
मला जिवांचा संग हवाय, निर्जीव वस्तूंचा हवाय नि माझ्या मनाचा हवाय. जीव कसा जोडू मी दुसऱ्या जिवाबरोबर? प्रश्न अवघडंय पण आहे! गाठी मारून सोडल्या तर त्रास…सोडताना तुटल्या तर अजून त्रास. माझी वाट कुणी तुडवली तर त्रास, नाही तुडवली तर अजून त्रास! निर्जीव वस्तूंचा संग हवा तेवढा उपभोगता येईल; पण मनाचं काय? तेच नसलं तर कसचं काय?
डोळे मिटून घ्यावेत नि विलीन व्हावं अंधारात. मी प्रयत्न केला फार, पण जमलं नाही कधीच. देवळं शोधली, प्रसन्न गाभारे शोधले, ध्यान-धारणेची स्थळं शोधली नि उरलो अख्खा मी. पाच फुट सहा इंच. नुसतं सांगून उपयोग नाही, मनाला वाटलं, पाहिजे एकांत. स्वत:वरतीच विश्वास नाही, तर पसरणार कसा मी आभाळभर नि होणार एकसंध!
हिशोब आहे माझ्याकडे वेळेच्या तुकड्यांचा, नि मिळालेलं प्रेम मी जपून ठेवलंय बंद एका लिफाफ्यात. वाटतं ते उडून जाऊ नये, घाबरतो मी. जीवच गुंतून बसलाय त्यात की सुटणार नाही, झालंच तर तुटेल ती गाठ. आणि अशा कित्येक गाठी गच्च बांधून ठेवल्यात मी वस्तूंशी, माणसांशी नि स्वत:शी. कशी मिळेल मुक्ती? कसा मिळेल एकांत?
मी तुडवल्यात कित्तीतरी वाटा नि उघडल्यात कित्येक समाध्या. जगावं मी ही बहुधा इतर जगतात तसं…जगण्यासाठी.
वेळेला नमस्कार.
पंकज कोपर्डे
८ सप्टेंबर २०१३

गुरुवार, १३ मार्च, २०१४

मोरपंखी


तिच्या-माझ्या आठवणी, कपाट उघडलं की अंगावर पडतात. मी अगदीच त्यांत गुदमरून जातो. मरून जातो. तिच्या कुर्त्या, तिचा वास. नदीकाठी वाळूवर उमटलेली तिची नाजूक पावले आणि जांभळं होत चाललेलं आभाळ…रातव्याचा एकसंध-निर्दोष आवाज नि तिनं माझा धरलेला हात…दूरवर डोंगरावर वणवा पेटलेला नि थंडीचे दिवस त्यात. तिच्या आठवणी वेचून कुणीतरी डोंगरभर पसरून ठेवलेल्या दिसतात. मी झटक्यात कपाट बंद करतो नि दीर्घ श्वास घेतो. जिवंत उरलो आणि जगत राहिलो…या दोन गोष्टींत किती अंतर? किर्रर्र जंगलात थंडगार ओढ्यात पाय सोडून बसलेलो आम्ही…
मी माझ्या खोलीत अस्वलासारखा फिरतो. जागा बदलून झाल्या, मित्र-परिवार वाढवला; पण मनाचा पिंजरा तुटला नाही. महिन्यातून एखाद दिवशी मी आपसूकच टेकडीवर तिच्याबरोबर बसलेला असतो किंवा ती ऐकत असते नि मी तिला गोष्ट सांगत असतो. सांगता सांगता संपून जाते नि ती हळूच तिचं डोकं माझ्या खांद़्यावर टेकवते. मी दूर क्षितीजाकडे पाहत राहतो. प्रेमाची जाणीव होण्यासारखा आनंदी क्षण नसावा जगात. मी ज्या विश्वासाने ओढ्यात पाय सोडलेले, तितक्याच विश्वासाने तिने डोकं टेकवलेलं माझ्या खांद़्यावर. आता जे होईल ते होईल. तू आहेस ना…
त्या कपाटात तिला आणलेली एक मोरपंखी साडी आहे. सुंदर रंगाची. सोन्याच्या तारांनी मढवलेली. त्याही इतक्या नाजूक की कळणारही नाहीत. मी तिला म्हटलेलं की हे सोनं आहे असं समज आणि ती ’हो’ म्हटली होती. मी तिला म्हटलेलं की ’माझं तुझ्यावर प्रेम आहे’ आणि ती ’हो’ म्हटलेली. कपाट पुन्हा-पुन्हा उघडू वाटतं नि सतत त्या पसाऱ्यात गुदमरून जाऊ वाटतं. मी बहुधा ओढा होऊ शकलो नाही. ओढ्यासारखी निरागसता आणि वडीलधारेपणा एकवटवू शकलो नाही. त्या पसाऱ्यात मला आज अचानक हव्या त्याच गोष्टी सापडतात नि वाटतं जे खरंखुरं होतं ते मी जग मी पाहिलंच नाही की काय? ती मोरपंखी साडी, सोन्याच्या तारांनी मढवलेली, ती नव्हतीच कधी तशी सोन्याची…पण फक्त गोष्टीपुरती. किती माझ्या आवडीच्याच गोष्टी त्या पसाऱ्यात सापडतात मला, कितीदाही तो उपसला ढिगारा! ती निळी रात्र, जेव्हा अंधार होता सभोवती नि माझी होती ती फक्त. ती निळी रात्र, जेव्हा अंधार होता सभोवती नि ओठांची झालेली भेठ. ती निळी रात्र, जेव्हा मला घट़्ट धरून ती झोपली होती नि निरखत होतो मी तिला! वाटतं मी उगाचंच तिला ओढत राहिलो नि ती ही माझ्यासोबत चालत राहिली अनवाणी…रस्ताभर उमटलेली लाल पावलं रक्ताची कधी मी, वळूनही पाहिली नाहीत! वाटतं मी माझ्याच बनवल्या संकल्पना, नि एकामागोमाग एक दरवाजे उघडत किती आतवर घेऊन गेलो तिला कुणास ठाऊक! परत येण्याचा रस्ताच ती विसरून गेली. भुलभुलैय्या. स्वत:चंच आभाळ इतकं विणत गेलो की तिला स्वत्वाचा विसर पडला. इतकं प्रेम केलं की तिचा जीव कंटाळला! आता आठवणीसुद्धा आहेत त्या माझ्यापुरत्याच असाव्यात. त्या आठवणी जशा कपाटात आहेत, तशा त्या कुणाच्याच नसतील. त्यांचे संदर्भ कुणालाच नसतील नि मी त्यांना ज्या आपुलकीने पाहतो, तसं कुणी पाहिलंय त्यांना? जीव असलेली माणसं कितेक फिरतात आजकाल आजूबाजूला, पण वाटत नाही कुणाला हाताला धरून घेऊन जावं त्या भुलभुलैयात आणि स्वत:च विसरून जावं स्वत:ला. त्या आठवणींत एक मोरपंखी साडीही आहे सोन्याच्या तारांनी मढवलेली. ती खरंच आहे सोन्याची, पण तिला नाही समजली! एकेक तार त्या साडीतली मी विकतोय आता मदिरेसाठी.
पंकज कोपर्डे
१३ मार्च २०१४

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०१४

कारण अभ्यास...
भाळाला एक भोक पडलेलं. मगरी आणि सुसरी, पांढऱ्या मानेचे करकोचे, heartbreak झालेले बोके, चिकट गोगलगाया, आत्मा हरवलेल्या काया, कुत्र्यासारख्या पडत होत्या अंगावर! हे एकदा घडलेलं नव्हतं; सतत घडत राहिलेलं. भोकाची त्रिज्या कमी-जास्त आणि पडणारे प्राणी चित्र-विचित्र, इतकाच काय तो फरक. मी चुकीच्या जागी बसलोय किंवा बसवलो गेलोय अशी भिती तोंडावर सतत बाळगलेली. बाळगलेली बरी म्हणजे शंकेला वाव उरत नाही. कपाळावरचा घाम पुसला आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या फळ्यावरती रेघोट्या मारणाऱ्या पाठीकडे पाहिलं. शेजारच्याच स्क्रीनवरती काही आकडेमोड झालेली; ठळक शब्दांत काही सुविचार लिहीलेले; काही आकृत्या अबोल मेलेल्या आणि त्यांच्यामधून बाण इकडून तिकडे. लढाई संपल्यावर मेलेल्या-मारणाऱ्यांचा हिशोब सुरू असतो. किती वेळ गेला असेल मधे? मी एकदा पापण्या मिटून पुन्हा उघडेपर्यंत. दहा ते पन्नास वर्षांपैकी कितीही किंवा शंभरही. ज्ञान आणि वेळेच्या अक्षांवरचा एक बिंदू पकडून मी सुरू केला होता प्रवास पंधरा मिनीटांपुर्वी आणि पापण्या मिटल्या. मी ओढ्यात एक नाग बेडकाला पकडून बसलाय असं बघितलं. कितीतरी वेळ…पंधरा मिनीटांपेक्षा कमी…तो नाग त्या बेडकाला फक्त पकडून होता दातांत. आणि थकला की काय? सोडून दिलं त्यानं बेडकाला नि गेला कुठेतरी खड़्ड्यात! खुर्चीवरती मी जरा पसरलोच होतो; सावरून बसलो. आजूबाजूला पाहिलं आणि स्वत:ला वेळेचं भान आहे का? असं विचारलं. उघड्या जबड्यात माझ्या किती माशांनी interest घेतला असेल, काय माहिती! जेव्हा जबडा बंद केला होता, उठल्या-उठल्या, तेव्हा त्यात एक सोन्यासारखा केस सापडला होता. तो ओकू वाटला होता; पण सोन्यासारखा म्हटल्यावर ओके वाटला होता. सोन्यासारख्या केसांची एकच मुलगी होती वर्गात, आजूबाजूच्या चार बाकांपैकी एकावर बसलेली. म्हटलं, तो केस ठेवून द़्यावा लाकडी पेटीत आणि पेटी ठेवावी खोलीवर. जमलंच-झालंच तर होईल evolution!

समोरची पाठ अजूनही खरडत होती equations आणि दगडासारख्या डोक्यात माझ्या कसलाच नव्हता mention! आजूबाजूलाही काही मेणासारखे पुतळे बसलेले. काही हलणारे-डुलणारे, काही डुगडुगणारे, काही वितळणारे. वावटळ यावं तशी एक जांभई अचानकच स्फुरली. असेल थोडा घाण वास, बिचारी आली तशीच विरली. विरली न विरली तोच बाका-बाकांवर जांभयांची लाट उसळली. ती लाट तशी घाटावर बसून बघायला मजा आली. त्या सोन्यासारख्या केसांच्या मुलीच्या नाजूक ओठांची उघडझाप, घाटावरची पाकोळी झाली! मी lecturer कडे लक्ष देण्यासाठी position घेतली. तो जे जे बोलला, ते ते मी मनातल्या मनात पडताळलं. कारण मोठा होत गेलो तसा विश्वास उडत गेलेला. लोकांवरचा, प्रेमावरचा, विज्ञानावरचा. स्वत:ला मतं पटल्याशिवाय विश्वास ठेवू नको विज्ञानावर, असे मोठे सांगून गेले. या विधानावर कसा ठेवणार विश्वास? पण तेवढा मी विचार नाही केला. आता जे जे बोलतं कुणी, ते ते पडताळावं लागतं आणि पटत असेल तरच खिशात ठेवाव्ं असं. त्या equations च्या घाईगर्दीत मेंदू कुठेतरी टेकला - थकला बिचारा - कलंडला. म्हटला, त्याच्या ध्यानात नाहीत सगळीच मुळाक्षरं…त्यामुळे शब्द वाचता येत नाहीत-उच्चारता येत नाहीत-कळत नाहीत. असा टेकलेला मेंदू, मला थकलेला शेतकरी भासला. बाभळीच्या झाडाला टेकून बिचारा घाम पुसणारा. त्याची कीव आली; तो माझा आहे म्हणून माझीही कीव आली. पंधरा मिनीटांच्या समाधीत काही ज्ञानप्राप्ती नाही झाली. किती वर्षांचं ज्ञान मी हरवून बसलो, त्याची तर गणतीच नाही. कुणी युरोपात १९५० साली असा-असा विचार मांडला. तर १९५९ मधे अमेरिकेमधील शास्त्रज्ञांनी त्याचे विधान खोडून काढले आणि नवी थिअरी मांडली वगैरे वगैरे. माझा मेंदू टेकलेला कुठेतरी १९८० साली आणि उठला तो २०१३ ला. आता मधलं काहीच महिती नाही…तर जोडणार कसा बांध, ठेवणार कसा विश्वास? वाटलं डोळे मिटावेत नि पहावं आभाळाच्या भोकातून पडली तर एखादी सोन्यासारख्या केसांची मुलगी…पण हे तेवढंच शक्य होतं जेवढे त्यातून पडणारे heartbreak झालेले बोके नि मेंदूविरहीत डोके! मला त्या एका lecturer चं कौतुक वाटलं. १९५० पासून २०१४ पर्यंत तो टिकला. असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास, तुका म्हणे. या माणसाने अभ्यास केला खरा, मी हुकलो. मुकलो-भरकटलो-कलंडलो-लवंडलो. एक डुलकी, एक अपघात. झाला अपघात, मग घट़्ट केलं मन आणि बसलो मुर्खासारखं उरलेल्या lecture भर…त्या केसाशी खेळत. घरी जाऊन अभ्यास केला मात्र…
पंकज कोपर्डे. २० फेब्रुअरी २०१४ 

रविवार, २ फेब्रुवारी, २०१४


रवी
छातीत थोडी धडधड अजून जिवंतशी वाटते. सतत कालची रात्र आठवते...काहीच आठवत नाही...चष्म्याच्या काळ्या फ़्रेमवरच्या विस्तीर्ण वांझोट्या कपाळावरती पसरलेले घर्मबिंदू तेवढे आठवतात. तेव्हा ती आली होती, मीच स्वेच्छेने नदीत उडी मारली होती नि गटांगळ्या खात छाती मागे-पुढे होत होती. पोट मागच्या दोन-चार वर्षांपेक्षा जास्त वाढलंय माझं आणि म्हणावं तसं काही खासही गोड घडलेलं नाहीये. इतकं आणि एवढंच मी माझ्या कामाव्यतिरिक्त बोलू शकलो तिला. छंदाचं रूपांतर कामात झालं की तसं माणसाकडे पोरी पटवण्याएवढं भांडवल उरत नाही बहूधा. घरचे सगळेच नि बाहेरचेही सतत सांगत राहतात की एवढा स्पेसिफ़िक इंटरेस्ट नसवा माणसाचा...पण छंद तो छंद, त्याला कुठला घालणार बांध म्हणा. माझ्या कामाव्यतिरिक्त माझा छंद म्हणजे लिखान...पण ते ही मराठीमधलं. आणि अशा कितीशा पोरी मराठी लेखकांना भाळणाऱ्या? त्या ज्या कॉलेजात नाटकांत रमून लेखकाच्या गळ्यात पडायच्या त्या एकतर दर सहा महिन्यांनी वेगळ्याच नटाबरोबर बागेत चरत बसायच्या किंवा मग एकच मोठ्ठं पॅकेज गळ्यात अडकवून नऊ महिने रजेवर जायच्या. फारच उत्साही काही एक-दोन दिवस फक्त...इस्पेशिअली जेव्हा त्यांना लेखक हा एक माणूस आहे याचा साक्षात्कार व्हायचा! पण माझ्यातला लेखक सतत रडकं काहीतरी लिहून स्वत:च डिप्रेस झाला होता आणि तो तिच्यामुळे खाड़्कन जागाही झाला. ती तितकीच नाजूक आणि त्याच त्या गणेशवेलीसारखी लपेटून घेत चालल्यासारखी. रस्त्यावरून घरी येताना एका खड़्ड्यात जोरात आदळलो तसा कपाळामागचा मेंदू थोडा हलल्यासारखा झाला. म्हटला, “का बरे तुझा तो लेखक असा धारातिर्थी पडलेला?” आणि मग पाऊस सुरू झाला; त्यात रस्ता दिसेनासा झाला; हेल्मेटच्या काचेवरती वाफ़ांचा पडदा झाला. वर्षं सरत गेली तसे शब्द परत गेले; पानगळीचे दिवस उलटूनही पाऊस आला नाही; कवितांच्या झाडांवरती फुले फुलली नाहीत; घोंगावणारे सारे शब्द गेले माघारी मधाविना; खरडून खरडून काही केल्या एक वाक्य घडले नाही. सोप्याच होत्या गोष्टी किती, वेळच लागत गेला...तो एक धारातिर्थी आणि दुष्काळात जीव सांडत चाललेला.
मला वाटलं मी एक नाटक लिहावं आणि घुसून जावं कलेत आतवर. उगाच हात मारल्यासारखे करावेत नि पोहोल्यासारखं वाटून घ्यावं मस्त! तेच नाटक उभं करावं आणि नुस्तं तेच करत बसावं. मग परत ते दिवस आल्यासारखे वाटतील का? सहा महिने...दोन दिवस किंवा सतत आयुष्यभर! नाटक लिहावं, कलेत घुसावं, घुसळून आणि प्रेम करावं. मी हसताना मला वाटलेलं पडला एक दात...खालच्या बत्तिशीमधला डावीकडून सातवा! उजव्या हाताच्या दोन बोटांनी कपाळावरचा नि नाकावरचा घाम पुसण्यात वेळ गेला. तेव्हा ती शांतपणे कितीतरी वेळ माझ्या एकाच उत्तराची वाट पाहत थांबलेली...“आणखीन काय नविन?” मी मुर्खासारखा संशोधनाबद्दल बरळत राहिलो नि त्याहून हाईट म्हणजे वाघांचे पट़्टे किती असतात वेगवेगळे, हात लावता भासे गुबगुबीत नि कोवळे! मी मधेच टाईल्सकडे पाहिलं तर त्यात फक्त पोटाचा घेर दिसला, तेव्हा कुठे छाती वर काढली...तेव्हा कुठे तिचा पुढचा एक दात दुसऱ्यावर चढलेला दिसला...बिलगून बसलेला.
तो एक पडदा हेल्मेटच्या काचेवरचा उडून गेला भुर्र्कन नि उलगडलं सारं रहस्य. एक पाऊस काय आला, ती फुलं फुललेली-डोलणारी...नि एक दिसला वेडा, ते शब्द पकडत निघालेला...दूर मेघाळलेल्या दरीकडे. पण प्रॉब्लेम आहे साला मला. आता हे सहा महिने की दोन दिवस की सतत आयुष्यभर?

पंकज कोपर्डे (२०-०७-२०१३)